Get it on Google Play
Download on the App Store

स्वर्गाकडे प्रयाण

यादव कुळाचा नाश व विशेषतः कृष्णाचे निधन झाल्याचे ऐकताच पांडवांना फार दुःख झाले. अर्जुनाचे ह्रदय विदीर्ण झाले. पर्वत हालावा, सागर शोषला जावा तसे हे अघटित घडले आहे असे त्याला वाटले. व्यास प्रकट झाले व त्यांनी सर्वांचे सांत्वन केले. त्यांनी सांगितले कृष्णाला विधिलिखित माहीत होते; पृथ्वीला झालेला पापाचा भार नष्ट करून व जगाला पीडेतून सोडवून कृष्ण स्वस्थानला गेला. व्यास परतले पण पांडवांचा शोक शमला नाही. त्यांनी आवराआवर केली. दान धर्म केला! वारसांना राज्ये सोपविली व स्वर्गासाठी प्रयाण करण्याचे ठरविले. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला व उत्तर दिशेच्या मार्गाने द्रौपदीसहित ते चालत राहिले. योगबलाने वनातून, डोंगरातून मार्ग काढले. सर्वच पांडव क्षीण झाले. सर्वप्रथम त्यांच्या मागून चालणारी द्रौपदी गतप्राण होऊन पडली. भीमाने युधिष्ठिराला विचारले - 'हिने अधर्माचरण मुळीच केले नाही. तरी ही कशी गेली?' धर्म म्हणाला- 'हिने पक्षपात केला. पाच पती असून हिने अर्जुनावर जास्त प्रेम केले.' अशी प्रश्नोत्तरे सर्वांबद्दल झाली. एकेक पांडव गतप्राण झाला. शेवटी फक्त युधिष्ठिर व त्याचा कुत्रा एवढेच पुढे जात राहिले. युधिष्ठिर आपल्या पुण्यबळावर स्वर्गलोकात सदेह जाऊ शकत होता.

स्वर्गाकडे प्रयाण

योगेश्वर कृष्णाचे निधन ऐकले

स्वर्गप्रवासास व्यथित पार्थ निघाले ॥धृ॥

कालगती धर्मासी उमजली मनी

परिक्षिता हस्तिपुरि राज्य देउनी

वल्कल नेसून स्वये नगर सोडिले ॥१॥

धर्म पुढे श्वानासह पार्थ मागुती

शिणलेली पाञ्चाली असे शेवटी

चार दिशांचे सगळे तेज लोपले ॥२॥

दाट वनी योगबळे मार्ग काढती

मेरूवर नक्षत्रे जणू चालती

द्रौपदिची मंदमंद झालि पावले ॥३॥

पांचाली गतप्राण पडे भूवरी

पार्थांच्या दाटतसे शोक तो उर

काळाने एक एक पाश टाकले ॥४॥

पतिव्रता का पडली भीम पुसतसे

धर्म म्हणे "दोष तिच्या वर्तनीअसे

प्रेम तिने अधिक सदा अर्जुना दिले" ॥५॥

माद्रीचे जुळे पुत्र पडत भुवरी

का पडले सच्छिल हे, भीम विचारी

युधिष्ठीर सांगे "त्या दोष भोवले ॥६॥

सहदेव ज्ञानाचा गर्व तो असे

रूपगर्व नकुलाच्या मनी वसतसे

पाहिजेत अवगुण हे दूर ठेविले' ॥७॥

पराक्रमी सत्यनिष्ठ इंद्रसुत पडे

मृत्यूचे उल्लंघन का कुणा घडे?

प्रश्न तोच, उत्तर ते पांडव दिले ॥८॥

"सैन्य-नाश करण्या मज एक दिन पुरे

वचन इंद्र-पुत्राचे फोल हे ठरे

पतनाला कारण हे शब्द जाहले" ॥९॥

शेवटचे श्वास घेत भीम विचारी

देहपात का झाला सांग तू परी

क्षणार्धात धर्माचे वाक्य ऐकले ॥१०॥

"अन्नाचे अतिभक्षण तू करायचा

शक्तीचा गर्व धरुन दुःख द्यायचा"

हे दोष वृकोदरा तुजसी भोवले ॥११॥

कसातरी जात पुढे श्वान घेऊनी

चकित होय इंद्राच्या रथा पाहूनी

स्वर्गासी त्या नेण्या इंद्र अवतरे ॥१२॥

बंधुंना मृत बघता कंठ दाटला

गुण त्यांचे आठवता येइ उमाळा

शोकाकुल धर्माचे पाय थबकले ॥१३॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया