Get it on Google Play
Download on the App Store

धृतराष्ट्र निधन

धर्मराजाने धृतराष्ट्राला विदुराचे निधन झाल्याचे सांगितले. हे वृत्त कळताच धृतराष्ट्र, कुंती, गांधारी व पांडवांना अतिशय वाईट वाटले. व्यास त्यावेळी तेथे आले व त्यांनी विदुर यमाचा अंशधारी होता असे सांगितले. नंतर त्यांनी सर्वांशी सुसंवाद केला व त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या. या सर्व आप्तांना आपल्या मृत स्वजनांना पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा होती. ती इच्छा व्यासांनी आपल्या तपोबलाने पूर्ण केली. कौरव, कर्ण, सौभद्र, द्रौपदीपुत्र इत्यादी सर्व पृथ्वीवर अवतरले व आपल्या प्रियजनांना भेटले व परत गेले. नंतर पांडवांनी वृद्ध धृतराष्ट्राचा निरोप घेतला. धृतराष्ट्र आपल्या आश्रमात होमहवन व तपाचरण करीत असे; तसेच गांधारी, कुंतीही व्रतवैकल्यात मग्न असत. संजय त्यांची दक्षतेने देखभाल करीत असे. तिघेही वृद्ध तपाचरणाने व उपवासाने कृश झाले होते. एके दिवशी धृतराष्ट्राने होम आटोपला व तो त्या दोघींसह बाहेर पडला. गंगातीर थोडे अंतर चालल्यावर त्यांणा दावानल जवळ येत असल्याचे जाणवले. अग्नीचा लोळ वेगाने पुढे येत होता. धृतराष्ट्राने त्या अग्नीत आपली आहुती देण्याचे ठरविले. तिघेही वृद्ध खाली बसले. संजयाला मात्र धृतराष्ट्राने अग्नीपासून दूर जाण्याची आज्ञा केली. त्या अग्नीत तिघांचा अंत झाला. संजयाने हे नारदाला सांगितले व नारदांनी पांडवांना हे वृत्त दिले.

धृतराष्ट्र-निधन

उजाड झाले वनी तपोवन

वृत्त ऐकले दुःखद दारुण ॥धृ॥

नित्य करी धृतराष्ट्र तपाला

आहाराविण कृश तो झाला

जलाहार तो सुबलसुतेला

संजय त्यांचे करि प्रतिपालन ॥१॥

मासाचा उपवास पृथेला

नेत्र जणु ती गांधारीला

दुःख सांगती परस्पराला

येत सुतांची त्यांना आठवण ॥२॥

उग्र तपाची ती दिनचर्या

वृद्ध नृपाची झिजली काया

व्रते आचरित कुंती, भार्या

संजय राहि न त्यांना सोडुन ॥३॥

गंगेवरुनी ते येताना

दावानल दिसला वृद्धांना

अग्निज्वाळा चहू दिशांना

सुसाट वारे पेटविती वन ॥४॥

क्षीण क्षीण ती पडति पावले

लोट अग्निचे समीप आले

नृप सूताशी निक्षुन बोले

"दूर निघून जा अग्नीपासून" ॥५॥

नृपे ठरविले स्त्रियांबरोबर

अग्नी घ्यावा हा अंगावर

योग-युक्त तो बसे भूमिवर

तीन आहुती घेत हुताशन ॥६॥

राजकुळीच्या या श्रेष्ठांचा

अंत असा हा करुण जाहला

प्रिय पुत्र ते दूर नगरिला

सूत वाचला दैवे त्यातुन ॥७॥

संजय तेथुन शीघ्र निघाला

जाह्नविच्या तो काठी आला

मुनिगण तिथला वेढि तयाला

तये नारदा दिले निवेदन ॥८॥

नारद आले राजमहाली

दुःखद वृत्ते ही सांगितली

शोकाकुल ती प्रजा बोलली

शून्य भासते नगर नृपाविण ॥९॥

बाहु उभारुन रडे युधिष्ठिर

इतर पांडवा शोक अनावर

माता गेली अशी दुरवर

करु न शके कोणीही सांत्वन ॥१०॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया