Get it on Google Play
Download on the App Store

अश्वत्थाम्याचा कट

दुर्योधनाचे निधन झाले तेव्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली व गंधर्वांची वाद्ये ऐकू आली. दुर्योधनाने त्यांच्यावर केलेली खरमरीत टीका ऐकून पांडव विचारमग्न झाले, त्यांना अपराध्यासारखे वाटू लागले. महाभारतात धर्म व अधर्म यावर बरीच चर्चा असून सूक्ष्मधर्माचा विचार मांडला आहे. सत्य बोलणे हा धर्म खरा पण एखाद्या प्रसंगी आपल्या सत्य बोलण्याने जर हजारो माणसांची हत्या होणार असेल तर अशा वेळी खरे बोलणे पातक ठरते. सर्व प्राणिमात्रांच्या जे हिताचे असते तेच सत्य होय. कृष्णाने पांडवांना हेच सांगितले की या चार रथींना असे विविध उपाय योजून मारावेच लागले. त्यानेच पृथ्वीवरची दुष्ट प्रवृत्ती नष्ट झाली व धर्मप्रवृत्तीचे रक्षण झाले. हे ऐकल्यावर पांडवांचे समाधान झाले पण त्यांना गांधारी शाप देईल की काय याची भीती वाटू लागलि. म्हणून कृष्ण तिचे सांत्वन करण्याकरिता नगरात गेला व पांडव त्या रात्री नदीतीरावर राहिले. इकडे अश्वत्थामा, कृतवर्मा व कृपाचार्य हे घायाळ दुर्योधनाला भेटले. दुर्योधनाची अवस्था पाहून त्यांना फार दुःख झाले. अश्वत्थाम्याने सूड घेण्याचा निर्धार केला. दुर्योधनाने त्याला त्याक्षणी सेनापतीपद दिले. हे तिघे रथी त्या रात्री पांडवशिबिरात गेले व त्यांनी पांडवांकडील झोपलेल्या वीरांची, राजांची, धृष्टद्युम्नासहित द्रौपदीपुत्रांची निर्दयपणे हत्या केली; सर्व शिबीर पेटवून दिले. महायुद्धाचा शेवट हा असा भयानक झाला.

अश्वत्थाम्याचा कट

रात्र ही राक्षसीच ठरणार

करिन मी शिबिरी नरसंहार ॥धृ॥

बघवेना मज राजा विव्हळ

पडे एकटा वनी भूमिवर

किती पातके करिल वृकोदर

घात अह नाही मी सहणार ॥१॥

धर्म डावलुन रथी मारिले

शस्त्रविहिन कर्णासी वधिले

भीष्मांनाही रणी फसविले

अशांचा सूड आज घेणार ॥२॥

उत्तम विद्या विप्राचा गुण

प्रताप मोठा क्षत्रिय-लक्षण

पित्याप्रमाणे क्षत्रिय मी पण

शत्रुचा खुपतो हा जयकार ॥३॥

धर्मच माझा शौर्य दाविणे

शक्य न कोणा मला आवरणे

रिपू तोडिती नीतिबंधने

कशाला करु मी धर्मविचार ? ॥४॥

संतापाची आग अंतरी

उसळे क्रोधित सागरापरि

जिवंत पांडूपुत्र जोवरी

तोवरी नाही ती शमणार ॥५॥

क्षत्रवृत्तिचा मी अभिमानी

अस्त्रनिपुण हे हात असोनी

पाहि द्रोणवध या डोळ्यांनी

कसे मी मुख दावू शकणार ? ॥६॥

नृपे मला केले सेनानी

उपकाराते त्याच्या स्मरुनी

निर्दयतेने मारिल द्रौणी

एकही सुटेल ना पाञ्चाल ॥७॥

नराधमा त्या धृष्टद्युम्ना

ज्याने वधिले द्रोणगुरुंना

स्वस्थ रथी बसले असतांना

मारतो घालुन भीषण वार ॥८॥

कृपाचार्य कृतवर्म्या ऐका

माझ्यासोबत पाउल टाका

पहा आज अग्नीचा भडका

छावणी नाहि उद्या दिसणार ॥९॥

अंधाराचा आश्रय घेउन

वज्रासम मी खङ्‌ग चालविन

निजलेल्यांची शिरेच उडविन

ढीग तो प्रेतांचा पडणार ॥१०॥

उरि मावेना दुःख पित्याचे

स्मरण सदा घायाळ नृपाचे

करुन कंदन पांडुसुतांचे

फेडतो राजाचा ऋणभार ॥११॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया