Get it on Google Play
Download on the App Store

सत्यवतीची चिंता

शंतनू राजाला मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवतीपासून दोन मुलगे झाले; चित्रांगद व धाकटा विचित्रवीर्य. चित्रांगद ज्येष्ठ असल्याने तो राजा झाला. तो फार पराक्रमी होता. अनेक राजे त्याने अंकित केले. पण चित्रांगद नावाच्या गंधर्वाशी लढताना तो मारला गेला. त्याच्यानंतर वयाने लहान असूनही विचित्रवीर्याल राज्याभिषेक झाला. काशीराजाने आपल्या तीन कन्यांचे राजनगरीत स्वयंवर मांडले होते; भीष्म तेथे विचित्रवीर्यासाठी गेले व त्यांनी त्या कन्यांचे अपहरण केले. साहजिकच उपस्थित राजांनी विरोध केला. त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. पण त्यांचा टिकाव लागला नाही. आपले शाल्व राजावर प्रेम आहे असे अम्बा नावाच्या ज्येष्ठ कन्येने सांगितल्यामुळे भीष्मांनी तिला त्याच्याकडे जाण्याची अनुमती दिली. अम्बिका व अम्बालिका या दोघी बहिणींचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण विवाहानंतर सातच वर्षांनी त्या राजाला क्षयरोग होऊन तो निधन पावला. कुरुकुलाच्या राजगादीला कुणी वारस राहिला नाही. विचित्रवीर्य निपुत्रिकच वारला. सत्यवतीला या समस्येने पुरते घेरले. ती चिंतामग्न राहू लागली. तिने भीष्माची भेट घेऊन त्याला विधवा सुनांशी विवाह करण्याचा व राजा होण्याचा आग्रह केला.

सत्यवतीची चिंता

राजकुळिचा दीप भीष्मा, पुत्र माझा लोपला

तूच हो आधार आता, वंश आपुला खुंटला ॥धृ॥

जाहले चित्रांगदाचे युद्ध गंधर्वासवे

त्यात झाला अंत त्याचा दुःख मज ते आठवे

धाकटा बाल्यात होता तो परी नृप जाहला ॥१॥

काशिराजाच्या दुहीता आणिल्या भ्रात्यास्तव

जिंकले तू सर्व राजे भासला तू भार्गव

शोभल्या राण्या नृपाला, भव्य झाला सोहळा ॥२॥

सात वर्षे राहिल्या दोघी नृपाच्या संगती

राजयक्ष्मा होउनी गेला अकाली भूपती

ग्रासतो अंधार चित्ता धैर्य राही ना मला ॥३॥

पट्टराण्या त्या परी मातृत्वहीनच राहिल्या

वंशजाच्या ह्या घडीला सर्व आशा संपल्या

तूच हो भर्ता तयांचा, प्रार्थना माझी तुला ॥४॥

सोडुनी दे रे प्रतिज्ञा वंशजासाथी सुता

दोष नाही यात कुठला ब्रह्मचर्या त्यागता

धर्मनिष्ठा, जाणसी तू धर्म आपत्तीतला ॥५॥

हस्तिनापुरची प्रजाही पोरकी राजाविना

पाहुनी हित या प्रसंगी घेइ बा सिंहासना

तू जरी माझ्या पित्याला शब्द आहे रे दिला ॥६॥

तूच ज्ञानी अन् प्रतापी थोर तू वीराग्रणी

तूच घ्यावे सुत्र हाती हे हिताचे या क्षणी

मान तू कर्तव्य ह्यासी, शपथ घालू का तुला ? ॥७॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया