Get it on Google Play
Download on the App Store

द्रौपदीस्वयंवर

भीमाने बकासुराचा वध केला व सर्वांना संकटातून सोडवले. त्या ब्राह्मणाकडे ते ब्राह्मणवेशानेच राहात होते. तेथून निघाल्यावर प्रवासात त्यांना एक ब्राह्मणसमुदाय भेटला. त्या ब्राह्मणांनी द्रौपदी-स्वयंवराची माहिती दिली. त्या पाचांचे तेज पाहून त्यांनीही स्वयंवरात जरुर भाग घ्यावा असे सुचविले. द्रौपदी व धृष्टद्युम्न ही दोन अपत्ये द्रुपदाला यज्ञवेदीतून लाभली होती. द्रौपदीचे लावण्य अप्रतीम होते. यज्ञसेन राजाची मनातून इच्छा होती की द्रौपदी अर्जुनासारख्या विख्यात धनुर्धराला द्यावी. पण पांडवांबद्दल काहीच नीट कळत नव्हते. अर्जुनासारख्यालाच जिंकता येईल असा लक्ष्यवेध करण्याचा कठीण पण त्याने जाहीर केला. देशोदेशीचे राजे समारंभाला उपस्थित झाले. कर्णशल्यादींनी प्रयत्‍न केला पण लक्ष्यवेध कोणालाच करता आला नाही. अर्जुनाने मात्र असामन्य कर्तृत्व दाखवले, लक्ष्यवेध केला; त्याचा जयजयकार झाला. त्याच्यावर इंद्राने दिव्य पुष्पवृष्टी केली. क्षत्रिय राजे मात्र नाराज झाले. ब्राह्मणाला कन्या देता येणार नाही असा वाद होऊन युद्ध उभे राहिले. अर्जुनाने सर्वांचा पराभव केला.

घरी परतल्यावर कुंतीने आपल्या कक्षातूनच ’आणलेली भिक्षा वाटून घ्या’ असे म्हटले. नंतर तिने आपली चूक झाल्याचे धर्मास सांगितले. धर्माने अर्जुनाला तिचे प्राणिग्रहण करण्यास सांगितले. पण अर्जुन म्हणाला आधी ज्येष्ठ भावाचा विवाह झाला पाहिजे. द्रौपदीच्या रुपामुळे पाचही पांडव तिच्याकडे आकृष्ट झालेले पाहून व कुंतीचे बोलणे लक्षात घेऊन युधिष्टिराने ती पाचांची भार्या होईल असे ठरविले.

द्रौपदीस्वयंवर

पांडवांना वृत्त कळले विप्रवर्यांच्या मुखे

द्रुपकन्येचे स्वयंवर भूपतीने योजिले ॥धृ॥

जन्मली वेदीतुनी ती द्रौपदी तेजस्विनी

देवकन्येचे जणू ते रुप मोहक आगळे ॥१॥

विस्मये ऐकून सारे धर्मसुत ठरवी मनी

जाउ या बघण्यास तेथे ते अलौकिक सोहळे ॥२॥

दूरदुरुनी विविध राजे मंडपी त्या पातले

मञ्चके त्यासी पुरेना दाटिने ते बैसले ॥३॥

अर्जुनासी द्यावि कन्या यज्ञसेनाच्या मनी

शोध घेण्याला तयाचा विविध मार्गा चिंतिले ॥४॥

लाविला पण अर्जुनाविण शक्य कोणा जो नसे

घोषणा होताच याची स्तिमित मंडळ जाहले ॥५॥

"यंत्र फिरते ठेविले वर, लक्ष्य त्यासी जोडिले

लक्ष्यवेधास्तव इथे हे भूवरी धनु ठेविले ॥६॥

वीर जो लक्ष्यास वेधिल वरिल त्यासी यज्ञजा"

मंडपी हे शब्द घुमले, लक्ष्य जो तो न्याहळे ॥७॥

पाहुनी ते पाच ब्राह्मण तेज त्यांचे दिव्यसे

विप्र नच हे हेच पांडव खास कृष्णा वाटले ॥८॥

रुक्म-कर्णा शल्य-शाल्वा कार्य ना ते साधले

येत अर्जुन विप्रवेषी भाग्य बघण्या आपुले ॥९॥

रंगमंची पाहुनी वर, अचुक धरला नेम तो

स्तब्ध सगळे अन् क्षणातच लक्ष्य त्याने वेधले ॥१०॥

इंद्रसम तो वीर पाहुन हर्ष कन्येच्या मनीं

पुष्पमालेच्या मिषाने चित्त वधुने अर्पिले ॥११॥

याज्ञसेना विदित होई विप्र असती पांडव

जिंकले ज्याने पणाला तोच अर्जुन जाणले ॥१२॥

अग्निसाक्षीने नृपाने पांडवा कन्या दिली

द्रुपसंगे स्वजन सगळे मंडपी आनंदले ॥१३॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया