Get it on Google Play
Download on the App Store

दुर्योधनाचे उत्तर

कृष्णाच्या प्रभावी भाषणानंतर परशुराम, कण्व, नारद या मुनींनी दुर्योधनाला मार्गदर्शन केले. परशुरामाने सांगितले की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे पूर्वीचे नर-नारायणच आहेत. त्यांना जिंकता येणे शक्य नाही. नारद व कण्व यांनीही मोठया राजांची उदाहरणे देऊन दुर्योधनाला समजावले. धृतराष्ट्रानेही यापूर्वी दुर्योधनाला सांगितले होते की त्याने दुराग्रहाने युद्धावर पाळी आणू नये.कृष्णाला त्याने सांगितले की आपण पराधीन आहोत व दुर्योधन मुळीच ऐकत नाही. कृष्णाने पुन्हा दुर्योधनाला उपदेश केला. ’पांडवांशी समेट करणे धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, विदुर व इतरांनाही हितावह वाटत आहे. तू दुष्ट बुद्धीने वागू नको. तुझा राज्याचा लोभ कमी कर. पांडवांना कमी लेखू नको. युद्धात अर्जुनाला व भीमाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही. सारासार विचार करुन शमाचा स्वीकार कर.’ त्यावर दुर्योधनाने उत्तर दिले. त्याने म्हटले की सर्वजण त्याला निष्कारण दोषी धरीत आहेत. द्यूत धर्माला प्रिय म्हणून तो खेळला. त्याचा पराजय झाल्यावर वनात जाणे भाग आले. ’मी कुणालाही भीत नाही. युद्ध हा क्षत्रियांचा धर्म आहे. युद्धात आम्ही जिंकू किंवा हरु. मेलो तरी आम्हाला स्वर्ग मिळेल. मी पांडवांना राज्यांश देणार नाही. एवढेच काय मी जिंवंत असेपर्यंत त्यांना सुईच्या अग्राइतकी भूमीही परत देणार नाही.’

दुर्योधनाचे उत्तर

ज्येष्ठ सर्व का मलाच बोल लाविता ?

समजेना परि माझा दोष कोणता ? ॥धृ॥

कृष्णा करितोस सदा

पार्थस्तुति कुरुनिन्दा

गैर काय केले मी सांग एकदा ॥१॥

पार्थ म्हणे अतीरथी

क्षुद्र कुरु त्यापुढती

पक्षपात यात दिसे, देवकीसुता ॥२॥

धर्मा रुचि द्यूताची

राज्य पणा लावि तोचि

गेले ते इंद्रप्रस्थ, डाव हारता ॥३॥

हार-जीत फाशांवर

जिंके तो बलवत्तर

यात मला का कपटी तुम्ही ठरविता ? ॥४॥

राज्य, वित्त ते हरले

वनी वनी ते फिरले

द्यूताचे मिळते हे फळ पराजिता ॥५॥

शौर्याची स्तुतिगाने

भीमबलाची कवने

भय मजला शक्‍तीचे व्यर्थ दाविता ॥६॥

कर्णासह भीष्म द्रोण

यांसम जगि असे कोण ?

देवासहि ते अजिंक्य हे यदुनाथा ॥७॥

समर धर्म क्षत्रियास

रणाचीच धरु कास

स्वर्ग मिळे रणाङ्‌गणी देह ठेविता ॥८॥

वडिलांनी जो त्याला

पूर्वी राज्यांश दिला

त्यावरती अता कसा हक्क सांगता ? ॥९॥

जोवर या कुडित प्राण

ऐकुन घे यदुनंदन

राज्य कधी नच देइन, पाण्डुच्या सुता ॥१०॥

सुई-अग्राइतुकी मी

नच देइन त्या भूमी

ठेविन मी सत्ता ही हाती सर्वथा ॥११॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया