Get it on Google Play
Download on the App Store

दुर्योधनाचे अंतिम शब्द

दुर्योधनाचा पाडाव झाल्यावर भीमाने त्याच्या मस्तकाला लाथाडले. ते धर्मराजाला मुळीच आवडले नाही. बलरामानेही मांडयांवर वार केल्याबद्दल आक्षेप घेतला. तो क्रोधाने भीमावर चालून गेला. कृष्णाने त्याला सांगितले की मैत्रेय ऋषीचा दुर्योधनास शाप होता व भीमानेही ’मी तुझ्या मांडया गदेने चूर करीन’ अशी प्रतिज्ञा घेतली होती. ती प्रतिज्ञा त्याने पूर्ण केली. कृष्णाने बलरामाचे कसेबसे सांत्वन केले. दुर्योधन राजा युद्धात पतन पावल्यामुळे सृंजय, पांचाल व पांडव यांना खूप आनंद झाला. त्यांनी जल्लोष केला. अनेकांनी हे दुष्कर कर्म करुन दाखवल्याबद्दल भीमाचे अभिनंदन केले. युधिष्ठिराने भीमाला दोन शब्द ऐकवून दुर्योधनाजवळ जाऊन म्हटले-----"हे सर्व पूर्वसंचितामुळे घडले आहे. तुझ्या अपराधामुळे ही हानी झाली व आम्हाला युद्ध करणे भाग झाले. तू शोक करु नको. तुला वीराचे मरण आले आहे !" पण कृष्णाने त्याला काही दूषणे देताच दुर्योधनाला राग आला व त्याने कृष्णावर खरमरीत टीका केली. ’मोठाले योद्धे----भीष्म, कर्ण व द्रोण यांना तू अधर्माने मारलेस व माझ्याशीही अधर्मयुद्ध केले. म्हणून पांडवांचा विजय झाला. युद्धनियमांचा भंग करुन तुम्ही लढला व आमचा घात केला.’

दुर्योधनाचे अंतिम शब्द

कृष्णा हे नीचकर्म तुज न शोभले

नियमांचा भंग करुन वीर मारिले ॥धृ॥

धर्माचा घोष तुझा ऐकला सदा

कृतीमधे शाठय परी दिसे सर्वदा

कुटिलपणे रण जिंकुन काय मिळविले ? ॥१॥

भीष्मद्रोणकर्णासम ना जगी कुणी

देवांना ते अजिंक्य केशवा रणी

कपटाचे डाव रचुन त्यास नमविले ॥२॥

भीमाशी लढलो मी प्राणपणाने

केले मी त्या जर्जर ह्याच गदेने

बळ त्याच्या बाहुंचे क्षीण भासले ॥३॥

दोघांचे गदाघात तीव्र जाहले

भीमाने पुनः पुन्हा तुजसि पाहिले

’ऊरुवर करि प्रहार’ तूच सुचविले ॥४॥

सूर्य नभी पृथ्वीवर भीष्म ते तसे

स्वेच्छेने मरण्याचा त्यास वर असे

वंद्य अशा त्यांनाही तूच फसविले ॥५॥

पूर्वी जो स्त्री होता त्या शिखण्डिला

करुन पुढे पार्थाने टाकिले शरा

शस्त्रहीन शांतनवा तूच मारिले ॥६॥

नामसाम्य बघुन तूच गजा मारिले

रणि गेला द्रौणि असे गुरुंस कळविले

वृत्त सत्य मानुन त्या शस्त्र त्यागिले ॥७॥

नेत्र मिटुन द्रोण उभे स्वस्थ त्या रथी

द्रुपदपुत्र वध करण्या येइ दुर्मती

त्या समयी त्या दुष्टा तू न अडविले ॥८॥

भूमीतुन काढि चक्र, शस्त्र ठेवुनी

कर्णाचा घात करी पार्थ त्याक्षणी

धर्मयुद्ध यात तुझे सांग कोठले ? ॥९॥

नियम धरुन करिते जर युद्ध माधवा

वीरमरण येते रे पाच पांडवा

धर्मयुद्ध केले मी, स्वर्ग मज मिळे ॥१०॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया