Get it on Google Play
Download on the App Store

भीम-दुर्योधन-गदायुद्ध

कृतवर्मा, कृप व अश्वत्थामा यांनी डोहापाशी येऊन राजाशी संवाद केला. तो वनातील व्याधांनी ऐकला होता. पांडवांना त्या व्याधांकडून लगेचच दुर्योधनाच्या डोहाविषयी कळले. ते सर्व तेथे आले.युधिष्ठिराने त्याच्या या वागण्याबद्दल त्याला दोष दिला. ’तू खरा शूर नाहीस, व क्षत्रियही नाहीस, खरा शूर राजा असा भिऊन रणातून पळून येत नाही.’ असे त्याने राजाला डिवाले. दुर्योधनानेही आपले विचार मांडले व शेवटी तो मानी राजा गदा घेऊन डोहाबाहेर आला. दुर्योधनाचा वध झाला नसता तर युद्धाचा खरा निर्णय झाला नसता. युधिष्ठिराच्या हातून या प्रसंगात पुन्हा एक चूक घडली. त्याने सुयोधनाला सांगितले, ’तू आमच्या पाचांपैकी कोणाही एकाशी लढ; तो हरला तर राज्य तुझेच आहे !’ हे ऐकल्याबरोबर कृष्णाला चिंता वाटली; कारण फक्‍त भीमच तुल्यबळ होता. पण दुर्योधनानेच नंतर म्हटले तुमच्यापैकी माझ्या तोडीचा पांडव युद्धासाठी निवडा. भीम पुढे आला व त्या दोघांचे अत्यंत भीषण असे गदायुद्ध झाले व भीमाने त्याच्या मांडयांवर प्रहार करुन युद्ध जिंकले. ज्याने पांडवांना मारण्याचा अटोकाट प्रयत्‍न केला होता तो कौरवाधिपती आज अखेरच्या घटका मोजीत होता. युद्ध संपले. पांडव विजयी झाले. या युद्धप्रसंगी कृष्ण अर्जुनाला सांगत आहे----

भीम-दुर्योधन-गदायुद्ध

शेवटी काय आली ही वेळ

अर्जुना, भीम कसा जिंकेल ? ॥धृ॥

अविचाराने धर्म बोलला

"जिंक पांडवातिल एकाला

त्यावर अंतिम निर्णय अपुला"

निकट आलेला विजय आपुला, कसा हाती राहील ? ॥१॥

भीम एकटा असे तुल्यबळ

अन्य पार्थ ते गदेत दुर्बळ

नृपे निवडला स्वये वृकोदर

दुजा निवडिता युधिष्ठिराचा संपताच रे खेळ ॥२॥

दोन गिरी धडकती येउनी

तद्वत भिडले योद्धे दोन्ही

प्रहार भीषण करिती गर्जुनी

युद्धातिल हे शेवटचे रण कोण विजय मिळवेल ? ॥३॥

सुयोधनाचा प्रहार दुर्धर

भीम पडे भूमीवर क्षणभर

करी वार परि उठून सत्वर

क्रुद्ध सर्प भासतो वृकोदर वैर कसे विसरेल ? ॥४॥

गदायुद्ध विद्येत तुल्यबळ

यत्‍नामध्ये कौरव दृढतर

भीम लढे निजदेहबळावर

प्रबळ नृपाला श्रांत भीम हा कसा बरे हरवेल ? ॥५॥

पुर्वी असुरांना देवांनी

मायेने त्या जिंकले रणी

बोध मिळे आपणा यातुनी

मायावी नृप मायायोगे मारावा लागेल ॥६॥

’ऊरु भेदिन सुयोधनाचे’

शपथवचन हे कुंतिसुताचे

स्मरण नसे भीमासी त्याचे

तोच खरा क्षत्रीय भूवरी जो वचना पाळेल ॥७॥

लढु दे भीमा कौशल्याने

वधिला नच हा जर शाठयाने

मारिल तो भीमा कपटाने

सर्व राज्य राहील तयाचे, धर्म सर्व गमवेल" ॥८॥

ऐकुन ही कृष्णाची वचने

सुचवी भीमा पार्थ खुणेने

थाप ऊरुवर मारि कराने

खूण जाणुनी भीम ठरवितो सूडाची ही वेळ ॥९॥

दाताखाली ओठ दडपले

घेइ भीम दारुण मंडले

भीमगदेचे निनाद घुमले

पाहुन हे कृष्णास वाटले कार्य अता साधेल ॥१०॥

भीषण केला वार ऊरुवर

रणकर्कश भासला वृकोदर

मत्त सुयोधन पडे धरेवर

कुरुपतिच्या निधनाने झाली संग्रामाचि अखेर ॥११॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया