Get it on Google Play
Download on the App Store

कुंतीचे मनोगत

कृष्णशिष्टाई सफल झाली नाही हे कृष्णाकडूनच कुंतीला कळले. तिने कृष्णाला पांडवांसाठी निरोप सांगितला की पांडवांनी प्रयत्‍नांची शर्थ अक्रुन व आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले राज्य परत मिळवावे. दुष्ट शत्रूची मुळीच गय करु नये. विदुराने कुंतीची भेट घेऊन सांगितले की युद्ध टाळण्यासाठी तो दुर्योधनाच्या कानीकपाळी ओरडत आहे पण तो मुळीच ऐकत नाही. संधी न होताच श्रीकृष्ण परत गेल्यामुळे पांडव हातात शस्त्र घेतल्याशिवाय राहाणार नाहीत आणि युद्ध पेटलेच तर त्यात कौरवांचाच नायनाट होईल. ज्ञातीच्या कल्याणार्थ कुंतीही चिंताग्रस्त होऊन म्हणाली की युद्ध उभे राहिल्यास कुलक्षय व आप्तस्वकीयांचा नाश ओढावल्याशिवाय राहणार नाही. हा अनर्थ होणे हे किती दुःखदायक आहे ! युद्ध न करावे म्हटले तर पांडवांना कायम राज्यापासून वंचित राहावे लागणार. भविष्याचा विचार करता तिच्या मनात कोलाहल माजतो व उरात धस्स होते. एक उपाय मनात येतो की कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगावे व त्याचे मन पांडवांकडे वळवावे. यासाठी ती लगेचच त्याची भेट घेते व त्याला सत्य सांगते.

कुंतीचे मनोगत

कृष्णाचे कर हे रिक्‍त कसे ?

मनि माझ्या काहुर दाटतसे ॥धृ॥

वनवासाची दुःखे दारुण

अज्ञातातिल दबले जीवन

स्थानी स्थानी फिरले वणवण

क्लेशांना सीमा मुळी नसे ॥१॥

कपटाचा तो खेळ मांडुनी

जिंकत गेला वंचक शकुनी

सर्वस्वाची झाली हानी

पडलेच जणू नभ शिरी जसे ॥२॥

कृष्ण अपयशी सभेत झाला

युद्धाचा ज्वर सुयोधनाला

राज्यहीन ठेवू धर्माला

दुष्टांच्या मनि हे घाटतसे ॥३॥

करु नका असला समजोता

नको करारही तो वांझोटा

राज्याविण रे कसे राहता ?

भित्र्यांचे होते जगी हसे ॥४॥

स्मरा आपुली घोर वंचना

पांचालीच्या त्या अवमाना

रणी धडा द्या दुष्ट रिपुंना

डिवचला नाग रे खास डसे ॥५॥

सागर सैन्याचे मज दिसती

युद्धाविण परि दिसेना गती

भीष्म कर्ण हे अजिंक्य असती

ललाटी लिहिले काय असे ? ॥६॥

स्नेहे पार्था भीष्म पाहती

द्रोण दयाशिल पांडवाप्रती

कर्ण करिल परि प्रहार अंती

हे पार्थ बंधु त्या जाण नसे ॥७॥

सुयोधनाच्या दुःसंगाने

पार्था पाही वैरबुद्धिने

वेळ हीच त्या सत्य सांगणे

पाहील पांडवा स्नेहवशे ॥८॥

असे तुझा रे बंधू अर्जुन

सांगतेच त्याला मी भेटुन

येते मजसी तुझी आठवण

मातेला सुत हा श्वास असे ॥९॥

वाहत संग्रामाचे वारे

कर्णार्जुन ते रणी उतरले

कृष्णा तू मज शक्‍ती दे रे

हा यत्‍न योजिला मनी असे ॥१०॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया