Get it on Google Play
Download on the App Store

जबाबदारी 1

हिंदुस्थानात नवीन नवीन अर्वाचीन शहरे अस्तित्वात येत आहेत. अविभक्त कुटुंबपध्दतीची संस्था मागे टाकून तिच्याहून अधिक विस्तृत व व्यापक अशी नवीन सामाजिक कुटुंबपध्दती आपण अस्तित्वात आणीत आहोत. शहर म्हणजे मोठ्यातला मोठा संघ. नागरिकांमुळे राष्ट्रे बनतात व राष्ट्रीय वृत्ती नगरांतून शिकावयाची असते. राष्ट्र-देहामधील नगर हा अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे.

पदार्थ अणूंचा बनतो व अणू परमाणूंचा बनलेला असतो. अणुघटनेसाठी सार्‍या परमाणूंची आवश्यकता असते. परमाणूंचा परस्परांशी संबंध असतो व प्रत्येक परमाणूचा सर्वांमिळून होणारा जो अणू त्याच्याशीही संबंध असतो. हातातील हाडांचा परस्परांशी संबंध असतो व शिवाय त्या सर्वांचा संबंध देहाशीही असतो. आजची आपली जी शहरे त्यांच्या बाबतीत असे म्हणता येईल का ? नगरवासीयांचा परस्परांशी जो संबंध असतो तो आंतरिक आहे ? नगरवासियांच्या परस्परांशी एकजीव झालेला आहे का ? ‘या नगरदेहातील आम्ही सारे अविरोधी सहकारी घटक’ अशी सर्व नागरिकांची भावना आहे का ? मध्ययुगातील काशी, लखनौ वगैरे शहरांतील प्रत्येक भागाचा, प्रत्येक मोहोल्ल्याचा सर्व नगरांशी नीट संबंध असे. ते ते धंदेवाले आपापसांत संघटित, सुसंबध्द असत; शिवाय सर्व नगराशीही त्यांचा संबंध जिव्हाळ्याचा असे. नगराच्या संपन्नतेसाठी, सुव्यवस्थेसाठी, सुखासाठी, आरोग्यासाठी, संरक्षणासाठी, सर्वांचा सहकार होई, सारे एक असत. दक्षिण हिंदुस्थानातील कांजीवरमसारखी खेडयांच्या जवळ असणारी जी बाजारांची मोठी गावे तेथे अजूनही असे गुण्यागोविंदाचे संबंध गावातील सर्व भागात सर्व जातींत दिसून येतात. तसे संबंध हल्लीच्या मुंबई, मद्रास, कलकत्ता वगैरे शहरात आहेत, असे म्हणता येईल का ? ‘ हे शहर आपले आहे, याची अब्रू आपण सांभाळू ’ असे तेथे राहाणार्‍यांच्या मनात येते का ? तसे जर नसेल तर ह्या शहरात जे आगंतुक आहेत ते निघून जातील व जे तात्पुरते आहेत ते अदृश्य होतील.

यांत्रिक गुंतागुंतीचे संबंध व जिवंत शरीरांतील गुंतागुंतीचे संबंध यांच्यात फार फरक आहे. सामुदायिक जीवनात जी अंगे महत्त्वाची नसतात, प्राणदायी नसतात, ती टिकत नाहीत; ती निघून जातात. एखादा भाग त्या जीवनात, त्या सामुदायिक घटनेत अत्यंत आवश्यक आहे, हे कशावरून समजावयाचे ? आपल्या पूर्वजांनी त्याला धर्माची कातर लावून पाहिले असते, धर्माची कसोटी लावून बघितले असते. जे राष्ट्रधर्म पाळतात, राष्ट्राची ध्येये ज्यांना पूज्य आहेत व त्यांच्यावर ज्यांची श्रध्दा आहे ते राष्ट्राचे आहेत व असे लोक त्या नगराचे प्राणमय घटक समजावेत. कारण नगरांतूनच-नागरसंस्कतींतूनच- राष्ट्र व राष्ट्राची संस्कृती तयार होत असतात. जे राष्ट्रीय धर्माची अवहेलना करतात, राष्ट्रीय ध्येयाचा अध:पात करतात, नाश करतात, त्यांना निघून जावे लागेल. एवं आपल्या संघटनाची, आपल्या एकीकरणाची राष्ट्रधर्म ही कसोटी आहे; समान ध्येय ही कसोटी आहे. शील, सद्वर्तन, न्यायप्रियता, सचोटी ही आपली कसोटी आहे. अशा नानाविध सूक्ष्म, अतिसूक्ष्म गुणच्छटांनी नागरिक धर्म बनत असतो. विशाल व विस्तृत असा मोठा संघ एकजीव होऊन वाढावयास अशा प्रकारच्या अनेक सद्गुणतंतूचे बनलेले बळकट दोरखंड त्या सर्वांना एकत्र बांधावयास पाहिजे असते.

राष्ट्रीय हिंदुधर्म

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
धर्म 1 धर्म 2 धर्म 3 हिंदुधर्माची श्रेष्ठता 1 हिंदुधर्माची श्रेष्ठता 2 हिंदुधर्माची श्रेष्ठता 3 हिंदुधर्म व संघटना 1 हिंदुधर्म व संघटना 2 हिंदुधर्म व संघटना 3 त्यागवृत्ती 1 त्यागवृत्ती 2 त्यागवृत्ती 3 त्यागवृत्ती 4 माणसांप्रमाणे वागा 1 माणसांप्रमाणे वागा 2 तळमळ 1 तळमळ 2 * सामर्थ्य 1 * सामर्थ्य 2 खरी महत्वकांक्षा 1 खरी महत्वकांक्षा 2 खरी महत्वकांक्षा 3 खरी महत्वकांक्षा 4 चारित्र्य 1 चारित्र्य 2 विवेक 1 विवेक 2 पात्रता 1 पात्रता 2 पात्रता 3 आत्म-प्रौढी 1 आत्म-प्रौढी 2 आत्म-प्रौढी 3 अनुभव 1 अनुभव 2 कर्मद्वारा साक्षात्कार 1 कर्मद्वारा साक्षात्कार 2 श्रध्देचे सामर्थ्य 1 श्रध्देचे सामर्थ्य 2 कमळ व भ्रमर 1 कमळ व भ्रमर 2 कमळ व भ्रमर 3 कमळ व भ्रमर 4 विचारांचा विकास 1 विचारांचा विकास 2 राष्ट्रीय धर्म 1 राष्ट्रीय धर्म 2 राष्ट्रीय धर्म 3 राष्ट्रीय धर्म 4 जबाबदारी 1 जबाबदारी 2 जबाबदारी 3 जबाबदारी 4 जबाबदारी 5 जबाबदारी 6 ध्येय 1 ध्येय 2 ध्येय 3 ध्येय 4 मृत्यूवर विजय 1 मृत्यूवर विजय 2 मृत्यूवर विजय 3 भूत व भविष्य 1 भूत व भविष्य 2 प्रपंच व परमार्थ 1 प्रपंच व परमार्थ 2 प्रपंच व परमार्थ 3