Get it on Google Play
Download on the App Store

समाधान - ऑगस्ट २७

सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल . ज्या घरात समाधान , तेथे भगवंताचे राहणे जाण . जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते , अशा खर्‍या भावनेने एक वर्षभर जो राहील , त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल . समाधान हा वृत्तीचा गुण आहे , देहाचा नव्हे . प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा , आणि अत्यंत समाधान असणारा मनुश्य भेटावा असे वाटते . त्याच्या मागे सारे जग लागेल . जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही . समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे . पांडवांना वनवासात जे समाधान होते , ते राज्यपदावर असणार्‍या कौरवांना नव्हते . म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे . ‘ ठेविले अनंतें तैसेंचि राहावें ! चित्तीं असो द्यावें समाधान ॥ ’ हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचेही सांगणे आहे . भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे . पैसा ही भगवंताची देणगी नव्हे ; त्याने तळमळ आणि अतृप्ती होते . खरोखर , समाधान हीच भगवंताची देणगी होय . मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही . आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की , जे आहे ते पुरेल . ज्याचे मन समाधानात आहे , त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल . समाधानालाच खरे महत्त्व आहे . घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे . शिवाय , घेण्याला काही अंतच नाही . कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते . पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला , म्हणून त्यामध्ये समाधान आहे . आपण उपाधीने झाकलो गेलो आहोत . एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरुप प्रकट होईल . तिथे खरे समाधान होते .

‘ राम कर्ता आहे ’ ही भावना होणे हे वासनेचे मरण होय . मनुष्य काही तरी हेतू ठेवून कर्म करतो . पण प्रत्येक ठिकाणी ‘ भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे ’, असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही . आपल्याला सगळे कळते , पण आयत्या वेळेला आपण विसरतो . आलेली ऊर्मी आपण सहन करावी . दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो , तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा , म्हणजे आपण आपल्या ऊर्मींना आवरु शकू . प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे , ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान . हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले , तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात . शास्त्राने , सदधर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरुर आहे . अनुसंधानाने जे साधेल , ते शतकोटी साधनांनी साधणार नाही . असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती .