Get it on Google Play
Download on the App Store

प्रकाशची गोष्ट २

रविवारचा दिवस होता. नेहमी प्रमाणेच प्रकाश रात्री थोडीशी विश्रांती घेऊन, भल्या पहाटेच उठला होता. त्याला आता पूर्वीसारखी जास्त झोप लागत नसे. त्याचे मुलाधारचक्र त्याच्या नियंत्रणात असल्याचेच ते परिणाम होते. झोपेतही तो कित्येक विषयांचे मनन चिंतन करीत असे. ज्याची त्यालाही कल्पना नसे. त्याचे मस्तक म्हणजे दिवस- रात्र सतत कार्यरत असलेली यंत्रणाच बनली होती. कधी त्याच्या मनात मानवी जीवनाचे तत्वज्ञान, तर कधी नागलोकातले जीवन, तर कधी आत्म्याची रहस्ये, जीवनाचा खरा अर्थ, मृत्युनंतरचे जीवन, ब्रम्हांडाची रहस्ये असे कितीतरी विचार हल्ली त्याच्या मनामध्ये निर्माण होत होते. त्यामुळे कित्येकदा तो तासंतास, शांतपणे कुठेतरी बसून असाच कसलातरी विचार करत असे. त्याच्या अशा वागण्याची आता, वसंतला आणि मोहनला सवय झाली होती.

त्यादिवशी मात्र त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. ते विचार होते...त्याच्या स्वतःच्या जीवनाचे. कसे होते त्याचे आतापर्यंतचे जीवन? काय-काय घडले होते त्याच्या आयुष्यात? हे सर्व त्याला अचानक आठवू लागले. एरवी ब्रम्हांडाचा विचार करणारा नागमनुष्य आज स्वतःच्या जीवनाचा विचार करु लागला होता. खरच! किती रहस्यपूर्ण होते त्याचे आयुष्य? त्याच्या आयुष्यातील ती सगळी रहस्ये तो स्वतःच एक-एक करुन आपल्या मन:चक्षुंपुढे उलगडत होता.

त्याला आपले शाळेत असतानाचे दिवस आठवू लागले. लहानपणी कसा तो शाळेत जायला घाबरायचा, रडायचा, शाळेत न जाण्यासाठी विविध करणे शोधून काढायचा. हे सर्व चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. जसे काही त्या सर्व गोष्टी काल-परवाच घडल्या होत्या. त्याच्या लहानपणी घडलेली एक विचित्र घटना त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागली.

त्यावेळी तो दोन-तीन वर्षांचा होता. नुकतेच त्याला शाळेत टाकले होते. त्याच्या आईने (लताने) त्याला नुकतेच शाळेत नेऊन सोडले होते. त्याच्या आधी त्याने कितीतरी वेळ, शाळेत न जाण्यासाठी रडून वाया घालवला होता. त्याच्या आईने त्याला शाळेतल्या बाईंच्या ताब्यात सोपवले आणि ती घरी निघून आली. प्रकाशचे मन शाळेत रमत नसे. तो हिरमुसलेल्या चेहऱ्याने आपल्या जागेवर शांतपणे बसून होता. त्यावेळी त्याला बाईंच्या समोरील पुढच्या रांगेतील मुलांबरोबर बसायला भीती वाटत असे. त्यामुळे शाळेत जाण्यापूर्वी त्याला लहानपणापासून लागलेली दुपारी झोपण्याची सवय आता मोडली जाणार  होती. दुपारचे जेवण झाले की, त्याला दुपारी दोन-तीन तास झोपण्याची सवय होती. पण, शाळेमुळे त्याला आता झोपता येत नसे. त्यामुळे बऱ्याचदा त्याला आपल्या झोपण्याच्या सवयीमुळे शाळेत झोप येत असे. मग तो समोर शिकवणाऱ्या बाईंकडे लक्ष न देता शेवटच्या बाकावर बसून खुशाल डुलक्या घेत असे.

त्या दिवशी वर्गात शिकविताना, बाईंचे लक्ष डुलक्या घेणाऱ्या प्रकाशकडे गेले. त्यांनी त्याला आवाज देऊन जागे केले आणि पुढे बोलावले. बाई खुर्चीत बसल्या होत्या, त्यांनी प्रकाशचे हात पकडले आणि त्या प्रकाशला प्रश्न विचारू लागल्या. ज्यांची उत्तरे त्याच्याकडे नव्हती. जोपर्यंत तो त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, तोपर्यंत त्या बाई त्याला सोडणार नव्हत्या. असे त्यांनी प्रकाशला सांगितले होते. बाईंनी प्रकाशचे हात घट्ट पकडले होते. त्यामुळे बरेच प्रयत्न करूनही प्रकाशला आपले हात, त्यांच्या हातातून सोडवता आले नव्हते. म्हणून तो त्यांना चावला आणि त्याने स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर तो थेट घरी पळून आला. अशाप्रकारे शाळेतून घरी पळून आल्याने, त्याच्या आईने पुन्हा त्याला शाळेत नेले आणि त्याच बाईंसमोर उभे केले. शाळेत आल्यावर, प्रकाश बाईंना चावून घरी पळाला होता आणि त्याच्या चावण्यामुळे त्यांच्या बोटावर त्याच्या दातांचे निशाणही उमटले होते. त्याचप्रमाणे चावण्यामुळे त्यांचे थोडेसे रक्तसुद्धा वाहू लागल्याचे लताला समजले. म्हणून ती प्रकाशवर खूप चिडली होती, परंतु त्या बाई प्रेमळ व समजूतदार असल्याने त्यांनीच लताची समजूत काढून तिला शांत केले आणि प्रकाशच्या अज्ञानीपणामुळे झालेली चूक आपल्या पदरात घेतली.

दोन दिवसांनी त्या बाईंचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूचे कारण कुणालाही समजले नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शरीरात विषाचे काही अंश सापडले होते. पण त्यांच्या शरीरात ते विष कसे गेले? हे मात्र कोणालाही माहिती नव्हते. प्रकाशने त्या बाईंना चावल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला होता ही गोष्ट त्यावेळी कोणाच्याही लक्षात आली नव्हती. पण आता इतक्या वर्षांनी त्याला आपण नाग असल्याची ओळख पटल्यावर त्याला लहानपणी त्याच्याकडून अज्ञानीपणे घडलेल्या कृत्याची जाणीव झाली होती.

नंतर हळू-हळू तो शाळेत रमू लागला. त्याला शाळेची सवय झाली. त्यामुळे त्याचे, घरी राहण्यासाठीचे हट्ट करणे बंद झाले. पण तरीही आतून तो कुठेना कुठे असमाधानीच असायचा. शाळेत जाणे म्हणजे त्याला एखादी शिक्षाच वाटायची. एरवी अभ्यासात त्याचे लक्ष लागत नसे. पण परीक्षेच्या वेळी मात्र तो थोडा फार अभ्यास करून परीक्षेत बरे गुण मिळवत असे. लहानपणापासूनच तो नवीन मुलांमध्ये, माणसांमध्ये पटकन मिसळत नसे. काही माणसांशी तर तो कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणेच टाळत असे. पण ठराविक व्यक्तींशी मात्र तो अगदी तासंतास गप्पा मारत असे. त्यांच्याशी बोलण्यात तो इतका मग्न होई की, मग त्याला कसलेच भान राहत नसे. त्याच्या अशा विचित्र वागण्याचे अनेकांना आश्चर्य वाटत असे. कोणाशी बोलावे? कोणाशी संबंध ठेवावेत आणि कुणाशी ठेवू नयेत? हे त्याने त्या माणसांचा, त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करूनच ठरवलेले असायचे.

शाळेमध्ये असताना आपल्या विशिष्ट मित्रांबरोबर तो भरपूर दंगा मस्ती करत असे. पण शिक्षकांसमोर मात्र तो शांत असल्याचा दिखावा करत असे. त्यामुळे त्याच्या वर्तणुकीवरून तो असे काही करू शकतो, यावर कुठल्याही शिक्षकाचा पटकन विश्वासच बसत नसे. म्हणून कित्येकदा त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्या मित्रांना भोगावी लागत असे.

ज्यावेळी प्रकाश कॉलेजमध्ये जाऊ लागला, त्या काळात त्याच्या स्वभावात परिवर्तने येऊ लागली. त्याचा स्वभाव आता थोडासा तापट बनू लागला होता. त्याच्याबरोबर घडणाऱ्या, त्याला अनपेक्षित असणाऱ्या गोष्टींची त्याला भयंकर चीड येऊ लागली होती. त्याच्याबरोबरच्या इतर मुलांच्या तुलनेत तो नेहमीच वयाने लहान वाटायचा. पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक अभूतपूर्व तेज असायचे. जे त्याच्या अवती-भोवती असणाऱ्या कोणाच्याही चेहऱ्यावर नसे. त्यामुळे त्याला बघताचक्षणी त्याच्यातील वेगळेपण लगेचच जाणवत असे. मित्रांमध्ये असल्यावर प्रसन्न आणि एकटा असल्यावरची त्याची गंभीर मुद्रा इतरांपेक्षा काही विलक्षणच असायची. अनेकदा त्याचे वागणे-बोलणे असे असायचे की, जे त्याच्याबरोबर असणाऱ्या त्याच्या मित्रांच्या समजण्या पलीकडचेच होते. जगाच्या विचारांची त्याला फारशी कदर नव्हती हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत असे. जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत, त्याची स्वतःची भिन्न अशी मते होती. म्हणूनच सुरुवातीच्या काळात त्याच्या भिन्न विचारप्रवूत्तींमुळे त्याची आणि मित्रांची जेव्हा कुठल्या विषयावर चर्चा होत असे तेव्हा त्या चर्चेला भांडणाचे स्वरुप प्राप्त होत असे. त्यानंतरच्या काळात, त्याने आपले वागणे-बोलणे पूर्णपणे बदलले. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार तो त्याच्याशी वागू-बोलू लागला. नवीन माणसांना भेटल्यावर सुरुवातीलाच तो त्यांचा स्वभाव समजून घेऊ लागला. आणि त्यानुसारच त्यांच्याशी आपले वागणे-बोलणे कसे असावे, हे ठरवू लागला. प्रत्येक माणसाची त्याचे वागणे-बोलणे वेगळे असल्याने, तो नेमका कसा आहे, हे कोणालाच माहित नव्हते. अनेकदा इतरांशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य असायचे. समोरच्या व्यक्तीच्या मनातले सर्व विचारही त्याला आधीच समजलेले असायचे. अनेकदा, समोरची व्यक्ती आपल्याशी काय बोलणार आहे? हे त्याने आधीच जाणल्यामुळे आपोआपच त्याच्या चेहऱ्यावर किंचित हास्य उमटत असे. परंतु हे सर्व कसे काय घडत असावे या गोष्टीचे उत्तर मात्र त्यावेळी त्याच्याकडे नव्हते.

कॉलेजमध्ये असतानाची एक घटना प्रकाशला आठवू लागली. त्याच्या मागच्या बाकावरील मुलगा त्याला मागून गुपचूप मारत होता. सुरुवातीला त्याने मस्करी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा सांगून सुद्धा त्या मुलाने प्रकाशच्या डोक्यात मागून मारण्याचे थांबवले नाही, तेव्हा तो त्या मुलावर क्रोधीत झाला आणि त्याने त्या मुलाच्या थोबाडीत एक सणसणीत चापट मारली. ती चापट त्याला इतकी जोरात लागली की,, त्याचे गाल त्याच्याच दातावर वेगाने आदळल्याने त्याच्या तोंडाच्या आत त्याला जखमा होऊन त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. असे घडल्यानंतर तो मागच्या बाकावरील मुलगाही प्रकाशला मारण्यासाठी त्यावर हात उगारणार तेवढ्यात प्रकाशने आणखीन एक चापट त्याच्या थोबाडीत मारली. त्यामुळे तो सहा-साडेसहा फुट उंचीचा आणि जवळपास शंभर किलो वजनाचा, धडधाकट शरीरयाष्टीचा मुलगाही चक्रावला. प्रकाशच्या माराने त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊन त्याला भोवळ येऊ लागली. पण तरीही अजून प्रकाशचा राग शांत झाला नव्हता. म्हणून तो त्याला शिव्या देऊन बडबडू लागला. त्यावेळी त्याचा आवाज इतका वाढला होता की, संपूर्ण वर्गाला तो स्पष्ट ऐकू गेला होता. पण रागाच्या भारत बेभान झालेल्या प्रकाशला कसलेच भान उरले नव्हते. प्रकाशला इतके क्रोधीत झालेले पाहून त्या प्रचंड शरीरयष्टीच्या मुलाला घाम सुटू लागला. त्याने प्रकाशसमोर माघार घेतली आणि त्याला शांत करण्यासाठी तो त्याची माफी मागू लागला. त्या दिवशी अनपेक्षितपणे प्रकाशने त्या मुलाशी केलेला प्रतिकार आणि त्यानंतर घडलेल्या प्रसंगाची त्या मुलाने इतकी धास्ती घेतली की, तो पुन्हा कधीही प्रकाशच्या वाटेला गेला नाही.

त्यावेळी घडलेल्या प्रकारामुळे प्रकाश इतका क्रोधीत झाला होता की, त्याचा क्रोध त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. त्याच्या श्वासाची गती अचानकच वाढली होती, त्याचबरोबर त्याच्या शरीराचे तापमानही वाढू लागले होते. एखाद्या शांत असलेल्या पर्वतामधून ज्वालामुखीचा उद्रेक होऊन, त्यातून लावा बाहेर पडावा. अशाप्रकारचे त्याचे स्वरुप झाले होते. त्या प्रसंगामुळे प्रकाशला पहिल्यांदाच त्याच्या क्रोधाची जाणीव झाली होती. त्यानंतरच्या त्याच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा त्याचा क्रोध जागृत झाला, तेव्हा तेव्हा त्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव होऊ लागली.

शाळेत असताना एक मुलगा असाच प्रकाशला फार त्रास देत असे. त्याची आणि प्रकाशची नेहमी भांडणे होत असतं. शाळेत असताना तो मुलगा तसा हुशार होता, त्याची त्याच्या भविष्याबद्दलची स्वप्नेही फार मोठी होती. त्यासाठी तो फार मेहनतही घेत असे. पण त्याची वृत्ती मात्र चांगली नव्हती. आपल्यापेक्षा हुशार मुला-मुलींचा त्याला राग येत असे. त्यांनी त्याच्या पुढे गेलेले त्याला पाहवत नसे. तसा प्रकाशही बऱ्यापैकी हुशार असल्याने तो प्रकाशचे लक्ष त्याच्या अभ्यासातून विचलित करण्यासाठी त्याला त्रास देत असे. त्यामुळे त्याची आणि प्रकाशची भांडणे होऊन, प्रकाशचा वेळ त्यात वाया जात असे. पण कालांतराने त्याची आणि प्रकाशची तुकडी बदलली गेली. त्यामुळे त्याचा आणि प्रकाशचा संबंध आपोआपच तुटला. दुसऱ्या तुकडीमध्ये गेल्यावर त्या मुलाची त्याच्या घाणेरड्या वृत्तीमुळे इतरांशी भांडणे होऊ लागली.

प्रकाशची शाळा संपल्यावर काही वर्षांनी प्रकाशला त्या मुलाबद्दल जे काही समजले ते फारच विचित्र आणि भयंकर होते. कशामुळे ते माहित नाही, पण दुसऱ्या तुकडीत गेल्यापासून त्याचे अभ्यासातील लक्ष पूर्णपणे उडाले. एके काळी वर्गात नंबर काढणारा, तो मुलगा दहावीत कसाबसा पास झाला होता. त्यानंतर शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने तो बारावीत नापास झाला. त्याच काळात तो सुरुवातीला दारू, सिगारेट आणि नंतर ड्रग्जचे व्यसन करू लागला. त्यामुळे त्याच्या घरात सतत भांडणे होऊ लागली. असाच एक दिवस तो नशेमध्ये असताना, त्याची त्याच्या घरातल्यांशी भांडणे झाली आणी रागाच्या भरात त्याने आपल्या आई-बापाला मारून टाकले. त्या घटनेनंतर तो पूर्णपणे वेडा झाला होता.

शाळेत असताना आपल्या भविष्याची मोठमोठी स्वप्ने रंगवणाऱ्या त्या मुलाच्या आयुष्यात दोन-चार वर्षात इतके बदल झाले की, त्याचे संपूर्ण आयुष्यच उद्धवस्त झाले. त्या मुलाबरोबर जे काही घडले होते, त्यासाठी प्रकाश कुठे ना कुठे स्वतःलाच जबाबदार मानत होता. कारण त्याच्या आजवरच्या आयुष्यात त्याला ज्याने विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला ज्यांचा ज्यांचा राग आला, त्या सर्वांबरोबर अशाच भयंकर विचित्र घटना घडत होत्या. एक दिवस प्रकाश एका किराणा मालाच्या दुकानात गेला होता. त्यावेळी प्रकाशकडे पुरेसे पैसे नसल्याने त्या दुकानदाराने प्रकाशला हवी असलेली वस्तू देण्यास नकार दिला. तो दुकानवाला त्याच्या घराच्या जवळच राहणारा होता आणि तो प्रकाशला बऱ्यापैकी ओळखतही होता. तरही त्याने असे केल्याने प्रकाशला त्याचा खूप राग आला.त्यानंतर प्रकाशने त्याच्या दुकानातून समान घेणेच बंद केले. त्या घटनेनंतर महिन्याभरातच त्या दुकानदाराला कोणत्यातरी गंभीर कारणामुळे आपले दुकान बंद करून त्याच्या गावी जावे लागले.

कॉलेजमध्ये असताना, एका लफंगी व्यक्तीने प्रकाशला काहीतरी खोटे-नाटे सांगून आपल्याबरोबर नेले आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी प्रकाश कसा-बसा त्या चोराच्या तावडीतून निसटला. पण काही दिवसांनी तो चोर ट्रेनखाली चिरडून मेल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. अशा प्रकारे एक-दोन नाही तर बऱ्याच विचित्र आणि भयंकर घटना त्याचे वाईट चिंतनाऱ्या किंवा त्याच्याशी शत्रुत्व ओढवून घेणाऱ्या माणसांबरोबर घडल्याचे, त्याला अनुभव येऊ लागले. या सर्व गोष्टी कशा होतात? का होतात? ह्या गोष्टीची जाणीव त्याला सुरुवातीला नव्हती. ज्याचे कारण त्याचा रक्षक आणि त्याचे कवच असलेला त्याच्या जवळील दिव्य नागमणी असल्याचे आता त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे जेव्हा-जेव्हा त्याचा क्रोध जागृत होत असे तेव्हा तेव्हा त्याच्या नागमणीच्या शक्ती जागृत होऊन, अशा भयंकर विचित्र आणि अद्भूत घटनांचा अनुभव त्याला येऊ लागला.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६