Get it on Google Play
Download on the App Store

एप्रिल १५ - संत

संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ; ते बोलतील ते खरे होते . वाचासिध्दी म्हणतात ती हीच . या सिध्दीचा उपयोग आपणसुध्दा करुन घेऊ शकतो ; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा , तसे हे होते . कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून , वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली , तशासारखे होते . जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे ? हाडांची काडे करुन स्वर्गसुख हाती लागले , पण कालांतराने ते नाश पावणार ; मग ते घेऊन काय करायचे ?

पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते ! पैसा हा भुतासारखा आहे ; त्याच्याकडून काम करवून घेतले तर तो फार उपयोगी आहे . पण ते न केले तर तो उरावर बसतो ! आपण प्रापंचिक माणसे ; आपण पैसा साठविला तर गैर नाही , पण त्याचा आधार न वाटावा . पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय . आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही . पण चोराने तो चोरुन नेला तर रडत बसू नये , किंवा कुणी मागायला आला तर त्याला ‘ नाही ’ म्हणू नये . त्याला काहीतरी द्यावेच . पैसा प्रपंचाला पुरेसा असावा . म्हणजे किती ? तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला ; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा - पंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे झाला . याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही . आपल्या प्रपंचाला जेवढा जरुर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला , की बस्स झाले . श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ? आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे ! पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा , आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे . आपण आतून निष्काम , निर्लोभ आणि निरिच्छ असावे . दुसर्‍याचे द्रव्य मला यावे अशी बुध्दी कधीही ठेवू नये . त्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ; ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ; त्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल ; परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही . सावकार कंजूष असेल , विद्वान गर्विष्ठ असेल , किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल . ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदेकरुन असतील तोच खरा मोठा होय . सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील . म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात . अशा लोकांना संत म्हणतात . आपण संतांचे होऊन राहावे , त्यात आपले कल्याण आहे . सत्संगतीपासून सद्विचार आणि सदभावना प्राप्त होतात . ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय ; आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय .