Get it on Google Play
Download on the App Store

एप्रिल १२ - संत

एखाद्या दारुबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो . त्याला सर्व कळते , पण वळत नाही . एकीकडे स्वत :ला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो , आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो . खरोखर , भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे . संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे . आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते , ते न वाटू लागले , म्हणजे साधानात प्रगती झाली असे समजावे . भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे . जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते . वास्तविक , गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही ; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे .

अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही . संतसमागम प्रारब्धाने होतो , पण ‘ सम ’ रीतीने जाता आले तर खरा ‘ समागम ’ घडतो . पण आमचा मार्ग विषय आहे ; म्हणून संत भेटूनही त्याचा ‘ समागम ’ आपल्याला होत नाही . विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते ; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही . आपली बुध्दी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही , तर दुसर्‍याची मदत घेणे आवश्यक आहे . अशा वेळी , ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले . संतांना जिज्ञासा मूळचीच असते . आपल्याला ती नाही , म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे . काही केल्याशिवाय सदवस्तू साध्य करुन घेण्याचा उपाय , म्हणजे सत्संगती हा होय . सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे . ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल . एखादा मनुष्य भोवर्‍यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत . एक मार्ग असा की , दुसर्‍या चांगल्या पोहणार्‍याने त्या भोवर्‍यामध्ये उडी मारुन तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे . पण यासाठी शक्ती फार लागते . दुसरा मार्ग असा की , आपणच भोवर्‍यामध्ये बुडी मारुन तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे . विद्वत्ता ही भोवर्‍यासारखी आहे . वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते . तसे , जे लोक वरवर विद्या शिकतात . ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात ; पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते , आणि ते सगळीकडे एकच असते . विद्यच्या भोवर्‍यामध्ये सापडणार्‍यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते . शहाण्याने त्या भानगडीत न पडावे . हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय .