Get it on Google Play
Download on the App Store

एप्रिल ७ - संत

पुष्कळ वाचले , ऐकले , पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग ? कृतीशिवाय समाधान नाही . श्रवण कोणी केले ? तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी . संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही , त्याचे मननच जर केले नाही , तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग ? देह हा अनित्य आहे , असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे , तरीसुध्दा आम्हांला देहाचे प्रेम सुटत नाही , याला काय करावे ? संतांवर विश्वास नसेल तर स्वत :चा अनुभव पाहावा . देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले , पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे . आपण पाहतो ना , की लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत , मनुष्याची सारखी धडपड चालू असते , आणि ती म्हणजे समाधानासाठी . लहानाचे मोठे झालो , विद्या झाली , नोकरी मिळाली , पैसाअडका मिळतो आहे , बायको केली , मुलेबाळे झाली ; ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले , त्या त्याकरिता प्रयत्न केला . परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का ? देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे ; पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे . आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही . या देहाचे कौतुक करीत असताना दुसर्‍याची घरभरणी चालली आहे . त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही . देह गेला की सगळे गेले !

कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो . बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरुर आहे . स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरुन सारखीच दिसतात ; पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे . स्वातंत्र्य हे पवित्र आहे , तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे . लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात . खरे म्हणजे , माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वत :ची उन्नती , म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरते आहे . इतर बाबतीत , म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत , त्याला बंधनेच असतात , आणि ती आवश्यकच आहेत . देहासंबंधीचे बाप , मुलगा , नवरा , बायको , वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच , पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे . ऑफिसला जाणार्‍यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे ; घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे ; आणि हे सर्व करुन राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा . आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो , त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय .