Get it on Google Play
Download on the App Store

गोष्ट त्र्याहत्तरावी

गोष्ट त्र्याहत्तरावी

क्षुल्लक मानू नये कुणाला, प्रसंगी महत्त्व प्रत्येकाला.

एका गावात 'ब्रह्मदत्त' नावाचा एक ब्राह्मण तरुण राहात होता. एकदा तो बाहेरगावी जायला निघाला असता, त्याची आई त्याला म्हणाली, 'बाळा, तू असा एकटा प्रवास करू नकोस. प्रवासात नेहमी कुणालातरी सोबतीला घ्यावे.'

'पण आई, मी जाणार असलेल्या मार्गावर कुणाचेच भय नसल्याने, मला कुणाच्याही सोबतीची गरज नाही.' असे ब्रह्मदत्त म्हणाला असतानाही, त्याच्या आईने परसदारी असलेल्या विहिरीतून एक खेकडा आणला आणि एका कापडाच्या तुकड्यात कापरांच्या वड्यांसह तो घालून व कापडाची पुरचुंडी करून, तिने तो खेकडा सोबतीसाठी त्याच्या स्वाधीन केला.

बाहेरगावची वाट चालता चालता उन्हे उभी राहिल्याने तो तरुण वाटेत लागलेल्या एका छायाळ वृक्षाखाली विश्रांतीसाठी म्हणून आडवा झाला आणि पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला. तेवढ्यात एका वृक्षाच्या ढोलीतून एक जहरी नाग बाहेर पडला व त्या तरुणापाशी गेला. पण त्याच्याजवळच असलेल्या त्या पुरचुंडीतून कापराचा वास बाहेर पडू लागल्याने व सापाला कापूर प्रिय असल्याने, तो आपल्या अणकुचीदार दातांनी ती पुरचुंडी उलगडू लागला. ती तशी उलगडली जाताच, तिच्यातून बाहेर पडलेल्या खेकड्याने आपल्या नांग्यांच्या कैचीत त्या नागाचे मानगूट आवळून त्याला ठार केले. जाग आल्यावर जेव्हा त्या तरुणाच्या दृष्टीस - आपण झोपेत असताना घडलेला प्रकार कळला, तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, 'आई म्हणाली तेच खरे. या जगात कुठलीच गोष्ट क्षुल्लक नसते. प्रसंग येताच तिचे महत्त्व पटते. मग आपल्या आईच्या धोरणी वृत्तीचे मनात कौतुक करीत तो तरुण पुढल्या वाटेला लागला.'

चक्रधराने ही गोष्ट सांगताच सुवर्णसिद्धी त्याला म्हणाला, 'मित्रा, खेकडा हा कितीही जरी क्षुद्र असला, तरी सर्पाची मानगूट पकडून त्याला मारण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. इथे तसे नाही. कुबेराच्या सेवकांनी दिलेल्या शिक्षेतून तुझी सोडवणूक करायला गेलो, तर माझ्याही पाठीशी अशीच एखादी भयंकर उपाधी लागण्याची शक्यता आहे. तेव्हा तांब्याच्या खाणीवर व रुप्याच्या खाणीवर संतुष्ट असलेले आपले ते दोन मित्र वाट पहात राहिले असल्याने, त्यांच्या संगतीसोबतीने गावी जाणे मी पसंत करतो.' असे म्हणून सुवर्णसिद्धी निघून गेला.

अशा या मनोरंजक पण बोधप्रद गोष्टी त्या तीन राजकुमारांना सांगून 'पंचतंत्राच्या' पाचव्या तंत्राची समाप्ती करताना विष्णुशर्माने त्यांना मुद्दामच विचारले, 'बाळांनो, या गोष्टी ऐकण्यात तुमचा वेळ चांगला गेला ना?' यावर ते राजकुमार नम्रपणे अभिवादन करून म्हणाले, 'गुरुदेव, आयुष्याचा मौल्यवान वेळ नुसत्याच मनोरंजनात घालविणे, हे निष्क्रियतेचे व सामान्य बुद्धी असल्याचे लक्षण आहे. आयुष्याचा क्षण अन् क्षण सत्कारणी लावला पाहिजे. या मनोरंजक पण बोधप्रद गोष्टींतून आपण आम्हाला या जगाकडे पाहण्याची व या जगात वागण्याची एक नवी दृष्टी दिलीत. आपण दिलेली ही 'शिदोरी' घेऊन, आम्ही आयुष्याची पुढली वाटचाल यशस्वीपणे करू. फक्त आपले आशीर्वाद आम्हाला द्या.'

विष्णुशर्मा हात उंचावून म्हणाला, 'तथास्तु !'

॥ पाचवे तंत्र समाप्त ॥

पंचतंत्र

संकलित
Chapters
गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट चोवीसावी गोष्ट पंचवीसावी गोष्ट सव्विसावी गोष्ट सत्ताविसावी गोष्ट अठ्ठावीसावी गोष्ट एकोणतीसावी गोष्ट तीसावी गोष्ट एकतिसावी गोष्ट बत्तिसावी गोष्ट तेहेतिसावी गोष्ट चौतिसावी गोष्ट पस्तिसावी गोष्ट छत्तिसावी गोष्ट सदोतिसावी गोष्ट अडतिसावी गोष्ट एकोणचाळीसावी गोष्ट चाळीसावी गोष्ट एकेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी गोष्ट त्रेचाळीसावी गोष्ट चव्वेचाळिसावी गोष्ट पंचेचाळिसावी गोष्ट सेहेचाळिसावी गोष्ट सत्तेचाळिसावी गोष्ट अठ्ठेचाळिसावी गोष्ट एकोणपन्नासावी गोष्ट पन्नासावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट बावन्नावी गोष्ट त्रेपन्नावी गोष्ट चोपन्नावी गोष्ट पंचावन्नावी गोष्ट छप्पन्नावी गोष्ट सत्तावन्नावी गोष्ट अठ्ठावन्नावी गोष्ट एकोणसाठावी गोष्ट साठावी गोष्ट एकसष्ठावी गोष्ट बासष्ठावी गोष्ट त्रेसष्ठावी गोष्ट चौसष्ठावी गोष्ट पासष्ठावी गोष्ट सहासष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट एकोणसत्तरावी गोष्ट सत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट बहात्तरावी गोष्ट त्र्याहत्तरावी