Get it on Google Play
Download on the App Store

गोष्ट तेरावी

गोष्ट तेरावी

'प्रसंगाचे भान ठेवावे अन्यथा करून घ्यावे नुकसान.'

एका सरोवरात कंबुग्रीव नावाचे एक कासव राहात होते. त्याच सरोवरात जलविहार करण्यासाठी संकट व विकट या नावचे दोन हंसे येत व अधुनमधून त्या कासवाला देवादिकांच्या बोधप्रद गोष्टी सांगत. संध्याकाळ व्हायला आली; की ते हंस दूरच्या झाडांवर असलेल्या आपल्या घरट्यांकडे निघून जात.

एका वर्षी पाऊस न पडल्याने ते सरोवर आटले. तेव्हा ते हंस त्या कासवाला म्हणाले, 'कंबुग्रीवा, या तळ्यात आता बव्हंशी चिखलच उरला आहे. उद्या हे तळे कोरडे ठणठणीत झाले की, तुझे काय होणार, याची आम्हाला चिंता लागली आहे. आम्ही दोघे पाण्याने तुडुंब भरलेल्या दुसर्‍या एका दूरच्या सरोवराकडे जलविहारासाठी जाऊ शकतो. पण तू कुठे जाणार?'

ते कासव म्हणाले, 'मी कधीही उद्याची चिंता करीत नाही. पण तुम्हीच विषय काढलात म्हणून सांगतो- तुम्ही बेतशीर लांबीची एक काठी घेऊन या. मी त्या काठीचा मध्यभाग माझ्या तोंडात घट्ट पकडतो. मग तुम्ही दोघे त्या काठीचे एकेक टोक तुमच्या चोचीत घट्ट धरा व उडत उडत मला त्या भरपूर पाणी असलेल्या सरोवरात नेऊन सोडा.'

ते हंस म्हणाले, 'कंबुग्रीवा, तू युक्ती तर नामी शोधून काढलीस. पण आम्ही दोघे हवेतून उडत असताना, तू कुठल्याही परिस्थितीत तोंड मात्र उघडू नकोस. नाहीतर उंचावरून जमिनीवर जोरात आदळशील व फुकट मरून जाशील.' यावर ते कासव म्हणाले, 'मित्रांनो, माझी चिंता वहायला मी समर्थ आहे.' मग त्या हंसांनी एक काठी आणली. त्या कासवाने तिला मध्यभागी तोंडात घट्ट पकडली, आणि त्या हंसांपैकी प्रत्येकाने तिचे एकेक टोक चोचीत दाबून धरून आकाशात भरारी घेतली.

अशा तर्‍हेने ते हंस त्या कासवासह हवेतून उडत उडत एका गावावरून चालले असता, त्यांना त्या गावातल्या गावकर्‍यांनी पाहिले व ते गावकरी एकमेकांना विचारू लागले, 'काय हो, ते दोन हंस वाटोळे वाटोळे असे जे काहीतरी घेऊन चालले आहेत, ते काय असेल ?'

ते त्यांचे शब्द कानी पडताच त्या कासवाने, त्या हंसांना, 'मित्रांनो, त्या मूर्ख गावकर्‍यांना, मी कासव आहे ही साधी गोष्टसुद्धा कळू नये?' असे विचारण्याकरिता तोंड उघडले, त्याबरोबर - काठीचा आधार सुटल्यामुळे - ते कासव आकाशातून जमिनीवर कोसळून छिन्नविच्छिन्न झाले.' ही गोष्ट सांगून टिटवी टिटव्याला म्हणाली, 'त्या हंसांनी सांगितलेली हिताची गोष्ट सांगून दुर्लक्षिल्यामुळे त्या कासवाचा असा दारूण शेवट झाला.'

ती टिटवी पुढं म्हणाली, 'उद्याची चिंता आज कशाला करायची ? किंवा 'माझी चिंता वाहायला मी समर्थ आहे,' असे म्हणून बेसावध कधीही राहू नये. तसे बेसावध राहिल्यामुळे व आपले भविष्य नशिबावर सोपविल्यामुळेच त्या 'यद्भविष्य' नावाच्या माशावरती प्राण गमावण्याचा प्रसंग आला.'

'ती गोष्ट काय आहे?' असे त्या टिटव्याने मोठ्या उत्कंठेने विचारले असता, टिटवी म्हणाली, 'नीट ऐका-

पंचतंत्र

संकलित
Chapters
गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट चोवीसावी गोष्ट पंचवीसावी गोष्ट सव्विसावी गोष्ट सत्ताविसावी गोष्ट अठ्ठावीसावी गोष्ट एकोणतीसावी गोष्ट तीसावी गोष्ट एकतिसावी गोष्ट बत्तिसावी गोष्ट तेहेतिसावी गोष्ट चौतिसावी गोष्ट पस्तिसावी गोष्ट छत्तिसावी गोष्ट सदोतिसावी गोष्ट अडतिसावी गोष्ट एकोणचाळीसावी गोष्ट चाळीसावी गोष्ट एकेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी गोष्ट त्रेचाळीसावी गोष्ट चव्वेचाळिसावी गोष्ट पंचेचाळिसावी गोष्ट सेहेचाळिसावी गोष्ट सत्तेचाळिसावी गोष्ट अठ्ठेचाळिसावी गोष्ट एकोणपन्नासावी गोष्ट पन्नासावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट बावन्नावी गोष्ट त्रेपन्नावी गोष्ट चोपन्नावी गोष्ट पंचावन्नावी गोष्ट छप्पन्नावी गोष्ट सत्तावन्नावी गोष्ट अठ्ठावन्नावी गोष्ट एकोणसाठावी गोष्ट साठावी गोष्ट एकसष्ठावी गोष्ट बासष्ठावी गोष्ट त्रेसष्ठावी गोष्ट चौसष्ठावी गोष्ट पासष्ठावी गोष्ट सहासष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट एकोणसत्तरावी गोष्ट सत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट बहात्तरावी गोष्ट त्र्याहत्तरावी