Get it on Google Play
Download on the App Store

जून २९ - परमार्थ

सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल ? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो . म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा . नामांत राहण्याचा प्रयत्न करा , म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल . इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते , पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार ? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही , तर तो काय करणार ? तसे , विषयात राहून दारे बंद करुन ठेवू नका . नामाचा उच्चार कंठी ठेवा , म्हणजे विषयाचा घाला होणार नाही . आता कली मातत चालला आहे ; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा . कोणीही सांगितले तरी नाम सोडू नका . जसे पाण्याचा मोठी लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही , तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करु शकणार नाही .

समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे , नाम हेच रुप असे समजून नाम घेत चला , म्हणजे रुप दिसेल . भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे , नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते . डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे , काहीतरी तेज दिसणे , दृष्टांत होणे , इत्यादि गोष्टी तात्पुरत्या असतात . एखादा अशक्त , हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी ‘ अंगाला सूज येऊ दे ’ असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल ; याच्या उलट , त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही , पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल . तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे ; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी . नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल . प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव , सण , पुण्यतिथ्या , वगैरे असतात . खरोखर , प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत ! पैसा , लौकिक , मुले , मित्र , आप्त , वगैरे सर्व पाशच आहेत . अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे ! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे . नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे . म्हणून नामात सत्संगतीही आहे . मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे , आजच्या दिवसापासून ठरवा .