Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 13

संघ
(भाग २ रा)


बुद्ध भगवंताच्या ह्यातीतच त्याचा धर्म मध्यदेशातं२ (२ पूर्वेस भागलपुर, पश्चिमेस गांधार, उत्तरेस हिमालय आणि दक्षिणेस विंध्यपर्वत यांच्यामधील प्रदेशास मध्यप्रदेश म्हणत असत.) चोहोंकडें पसरला होता. बौद्ध भिक्षु विशेषत: संभाषणाच्या द्वारें धर्मप्रसार करीत असत. आजकालच्या प्रमाणें सभा भरवून तें व्याख्याने देत नसत. जेथें जेथें धर्मश्रवण करणार्या व्यक्ति- मग ती एक असो किंवा अनेक असोत- त्यांना भेटत, तेथें तेथें ते त्यांना उपदेश करीत. लोकांशीं त्यांची वर्तणूक कशा रीतीची होती, हें पूर्ण भिक्षूच्या पुढील गोष्टींवरून वाचकांच्या चांगलें लक्षात येण्यासारखं आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर अशोक राजाच्या कारकीर्दीपर्यंत संघाची संक्षिप्त माहिती वाचकांसमोर ठेवण्याच्या उद्देशाने हा भाग मूळ व्याख्यानास जोडला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्ण नांवाचा बुद्धाचा एक शिष्य होता. तो एके दिवशी बुद्ध भगवंतापाशी आला, आणि आपणास संक्षेपानें धर्मोपदेश करावा, अशी त्यानें त्याला विनंती केली. उपदेश संपल्यावर बुद्ध भगवान् म्हणाला:- पूर्णा, आतां तूं कोणत्या प्रदेशास जाणार आहेस?

पूर्ण- भगवन्, या आपल्या उपदेशाचें ग्रहण करून मी आतां सुनापरंत नांवाच्या प्रदेशास जाणार आहें.

बुद्ध- पूर्णा, सुनापरंत प्रांतांतील लोक मोठे कठोर आहेत; मोठे क्रूर आहेत; ते जर तुला शिव्या देतील, तुझी निंदा करितील, तर
तुला त्या वेळीं काय वाटेल?

पूर्ण- त्या वेळीं, हे भगवन्, हे लोक फार चांगले आहेत; कारण यांनी माझ्यावर हातानें प्रहार केले नाहींत, असें मला वाटेल.

बुद्ध- आणि जर त्यांनीं तुझ्यावर हातानें प्रहार केला तर?

पूर्ण- मला त्यांनीं दगडांनीं मारलें नाहीं म्हणून ते लोक चांगलेच आहेत असें मी समजेन.

बुद्ध- आणि दगडांनी मारलें तर?

पूर्ण- माझ्यावर त्यांनीं दंडप्रहार केला नाहीं म्हणून ते फार चांगले लोक आहेत असें मी मानीन.

बुद्ध-
आणि दंडप्रहार केला तर?

पूर्ण-
शस्त्रप्रहार केला नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे असें मी समजेन.

बुद्ध- आणि शस्त्रप्रहार केला तर?

पूर्ण- मला ठार मारलें नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे, असें मी समजेन.

बुद्ध- आणि तुला ठार मारलें तर?