Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 2

या साठ भिक्षूंनां बुद्धानें स्वत: दीक्षा दिली होती. ‘एहि भिक्षु’ या बुद्धोक्त वाक्यानेंच त्यावेळी प्रवज्याविधि होत असे. परंतु जेव्हां हे भिक्षु चोहोंकडे पाठविण्यांत आले. तेव्हांपासून नवीन भिक्षुंची संख्या वाढत चालली. दूरच्या प्रदेशांतून भिक्षुसंघात प्रवेश करण्याची इच्छा करणार्यांना बुद्धाजवळ घेऊन जाणें कठीण पडूं लागले. म्हणून बुद्धानें भिक्षूंला अशा उमेदवारांना परस्पर संघांत घेण्याची परवानगी दिली. बुद्ध म्हणाला:- ‘‘भिक्षु हो, यापुढें भिन्नभिन्न राष्ट्रांत तुम्हींच प्रव्रज्या द्या, व तुम्हीच उपसंपदा (संघांत घेण्याचा विधि) करा. पुढील नियमास अनुसरून प्रव्रज्या आणि उपसंपदा करा. त्यानें (उमेदवारानें) मुंडन करावें व काषाय वस्त्रांनी अंग आच्छादावं. नंतर मांडी न घालतां त्याला खालीं बसवावें, व हात जोडून बुद्धं१ (१ बुद्धाला गुरू- संघाचा संस्थापक- या नात्यानें शरण जातात;तो देवाचा अवतार या नात्यानें नव्हें.) सरणं गच्छामि (मी बुद्धास शरण जातों.), धम्मं सरणं गच्छामि (धर्माला शरण जातों), संघ सरणं गच्छामि (संघाला शरण जातों) असे त्रिवार म्हणावयास लावावें. याप्रमाणें प्रव्रज्या आणि उपसंपदा करण्यास मी तुम्हांस परवानगी देतों.’’

चातुर्मास्य संपल्यावर भगवान् बुद्ध वाराणसीहून धर्मोपदेश करीत गयेला आला. तेथें उरुवेल काश्यप नांवाचा जटाधारी ब्राह्मण राहत असे. त्याचे पांचशे जटिल शिष्य होते. सर्व मगध देशांतील लोक त्याला फार मानीत असत. त्यानें व त्याच्या शिष्यांनी बुद्धाचें अलौकिक तेज व विलक्षण धैर्य पाहून आणि अनुपम धर्मोपदेश ऐकून आपल्या जटा कापून त्या व अग्निहोत्राचीं उपकरणें पाण्यांत टाकून दिलीं, व ते बुद्धाचे शिष्य झाले. उरुवेल काश्यपाचा नदीकाश्यप या नांवाचा भाऊ जवळच नदीकांठीं आपल्या तीनशें शिष्यांसह राहत असे. त्यानें अग्निहोत्राचीं उपकरणें आणि जटा नदीत वहात चाललेल्या पाहिल्या. आपल्या वडील भावास कांहींतरी उपसर्ग झाला असला पाहिजे असें त्याला वाटलें व तो त्याच्या राहण्याच्या ठिकाणीं आला. तेथें भावाला बुद्धाचा शिष्य झालेला पाहून तोहि आपल्या शिष्यांसह बुद्धाचा शिष्य झाला. उरुवेल काश्यपाचा गया काश्यप नांवाचा तिसरा भाऊहि त्याच प्रदेशांत राहत होता. तोहि आपल्या दोनशें जटाधारी शिष्यांसहवर्तमान बुद्धाचा शिष्य झाला.

या सर्व पूर्वी जटिल असलेल्या भिक्षुसंघासह भगवान बुद्ध राजगृह नगरास गेला. तेथें त्या वेळीं बिंबिसार राजा राज्य करीत होता. तो बुद्धाच्या आगमनाचे वर्तमान ऐकून मोठ्या समुदायासह बुद्ध राहत होता तेथें गेला. त्यावेळीं लोकांना बुद्ध, कश्यपचा गुरू किंवा काश्यप बुद्धाचा गुरू अशी शंका उत्पन्न झाली. काश्यप जेव्हां बुद्धाच्या पायां पडला तेव्हां लोकांची ही शंका दूर झाली. बिंबिसार राजानें वेळुवन नांवाचें उत्तम उद्यान बुद्धप्रमुख भिक्षुसंघास राहण्यासाठीं दान दिलें.

या उद्यानांत भिक्षुसंघासह बुद्ध भगवान राहत होता. त्या वेळीं राजगृहाजवळ संजय नांवाचा प्रसिद्ध परिव्राजक राहत असे. सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे ब्राह्मण संजयाच्या शिष्यांत प्रमुख होते. त्या दोघांनीं, ज्याला प्रथम शांतिपद सांपडेल त्यानें तें इतरांस सांगावें असा बेत केला होता. एके दिवशी अस्साजि राजगृहांत भिक्षेसाठी फिरत असता सारिपुत्तानें त्याला पाहिजे. आसशीची आनंदी आणि वैरागयुक्त मुद्रा पाहून सारिपुत्ताच्या मनांत त्याजविषयीं अत्यंत आदरभाव उत्पन्न झाला. तो अस्सजीच्या मागोमाग राजगृहांतून बाहेर पडला, व वाटेंत त्यानें अस्सजीस गांठले. अस्सजीला कुशल प्रश्नादि करून झाल्यावर सारिपुत्त म्हणाला: ‘आयुष्मन्, तुझीं मुखचर्या प्रफुल्लित दिसत आहे. तुझा गुरू कोण? कोणत्या धर्मास अनुसरून तूं वागतेस?’

अस्सजि- आयुष्मन्, महाश्रमण शाक्यपुत्र (बुद्ध) माझा गुरू आहे. त्याच्या धर्माप्रमाणें मी वागतों.

सारिपुत्त- तुझ्या गुरूचा धर्म कोणता? कोणतें मत तो प्रतिपादन करतो?

अस्समि- मी नुकताच बुद्धाचा शिष्य झालों आहें; विस्तृत धर्मोपदेश करण्यास मी समर्थ नाहीं.  तथापि संक्षेपानें सारांश काय आहें हें मी सांगू शकेन.

सारिपुत्त- कांही हरकत नाहीं. थोडें किंवा फार जें कांही तुला येत असेल तेवढें सांग. मला सारांश पाहिजे आहे. वाग्जाल घेऊन काय करायचें?