Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 4

भिक्षुसंघाचा चोहोंकडे बहुमान होऊं लागला. हें पाहून कांहीं उदरंभरी लोकहि त्यांत प्रवेश करूं लागले. एकदा कांही दिवसपर्यंत शहरांत सारखीं भिक्षूंनां आमंत्रणें होत होतीं. लोक सुग्रास अन्न तयार करून भिक्षूंस मोठय़ा आदरानें जेवावयास घालीत असत. हें एका ब्राह्मणाने पाहिलें, आणि आपणास यथेच्छ भोजन मिळावें या उद्देशानें भिक्षुसंघांत त्यानें प्रवेश केला. जेव्हां ही आमंत्रणें संपली, तेव्हा भिक्षुंनी, भिक्षापात्र घेऊन आपणाबरोबर भिक्षेस चल, असें त्याला सांगितलें. त्यावर तो म्हणाला, ‘‘जर तुम्ही मला जेवावयास घालाल तर मी राहीन, नाहीं तर भिक्षुसंघ सोडून चालता होईन.’’ याच्यासारखे दुसरेहि कित्येक प्रापंचिक लाभासाठींच संघांत प्रवेश करू लांगले. त्यांच्या बंदोबस्ताकरिता निरिच्छ भिक्षूंच्या विनंतीस मान देऊन बुद्ध भगवंताला उपसंपदेचे नवीन नवीन नियम करणें भाग पडलें. हे नियम कोणत्या कोणत्या प्रसंगीं करण्यांत आले, हें सांगण्यास येथें सवड नाही. तथापि प्रस्तुत ब्रह्मदेश, सिलोन इत्यादि ठिकाणीं जो उपसंपदाविधि सुरू आहे त्यांत बुद्धानें घालून दिलेल्या बहुतेक सर्व नियमांचा समावेश होत असल्यामुळें त्याचा सारांश येथें सांगितल्यावाचून राहवत नाही.

संघांत प्रवेश करूं इच्छिणार्या उमेदवारास प्रथमत: एका भिक्षूस आपला उपाध्याय करण्यास सांगतात. भदन्त (महाराज), तुम्ही माझे उपाध्याय व्हा, असें त्या भिक्षूस त्रिवार त्यानें  विनविलें पाहिजे. त्या भिक्षूनें उपाध्याय होण्याचें कबूल केल्यावर उमेदवाराचें भिक्षापात्र व चीवर (भिक्षुवस्त्र) त्याला दाखविण्यांत येतें. नंतर ज्या ठिकाणी जाऊन  रहाण्यास त्याला सांगण्यांत येतें तेथे तो राहतो. नंतर भिक्षुसंघांपैकी दुसरा एक विद्वान भिक्षु पुढें होऊन त्याला, त्यानें काय काम केलें पाहिजे, कोणत्या प्रश्नांचीं काय काय उत्तरें दिलीं पाहिजेत, हें नीट समजावून सांगण्यासाठी परवानगी मागतो. संघाची परवानगी मिळाल्यावर तो उमेदवार असेल  तेथे जाऊन तो भिक्षु त्याला सर्व समजावून देतो, व सर्व गोष्टी समजावून दिल्याचें वर्तमान पुन: येऊन संघास कळवितो. तेव्हां संघ त्या उमेदवारानें पुन: परत येण्यास सांगतो, संघ बसलेला असेल, तेथें जाऊन उमेदवारानें संघाची येणेंप्रमाणे त्रिवार प्रार्थना केली पाहिजे:- ‘‘भदन्त, संघापाशीं मी उपसंपदेची याचना करितों. अनुकंपा करून संघ माझा उद्धार करो.’’ नंतर दुसरा एक विद्वान भिक्षु उपसंपदेला प्रतिबंध करणार्या गोष्टींपासून हा नवीन उमेदवार मुक्त आहे किंवा नाही हें त्याला विचारण्याची संघाजवळ परवानगी मागतो.  ती मिळाल्यावर तो भिक्षु त्याला प्रश्न करितो ते असे:-

भिक्षु - हे नाग (शूर) हा सत्य बोलण्याचा प्रसंग आहे. येथें घडलेली गोष्ट सांगितली पाहिजे. मी तुला आता प्रश्न विचारणार आहें. जें असेल तें आहे, असें सांगितलें पाहिजे जें नसेल तें नाहीं म्हणून सांगितलें पाहिजे. पुढील रोग तुला आहेत काय? कुष्ठरोग तुला आहे काय?

उमेदवार- नाही महाराज (नत्थि भन्ते.)

भिक्षु- गंडरोग?

उमेदवार.- नाहीं महाराज.

भिक्षु - किलास रोग?

उमेदवार.- नाहीं महाराज.

भिक्षु
- क्षयरोग?

उमेदवार.- नाहीं महाराज.

भिक्षु
- अपस्मार?

उमेदवार.- नाहीं महाराज.

भिक्षु
- तूं मनुष्य आहेस ना?

उमेदवार.- होय महाराज (आम भन्ते.)

भिक्षु - तूं पुरुष आहेस ना?

उमेदवार.- होय महाराज.

भिक्षु
- तूं स्वतंत्र आहेस ना?

उमेदवार.- होय महाराज.