Get it on Google Play
Download on the App Store

समकालीन राजकीय परिस्थिति 12

गणराज्यांची व्यवस्था

ही राज्यें एका काळीं गणसत्ताक किंवा महाजनसत्ताक होतीं, असें वर म्हटलेंच आहे. वज्जी, मल्ल किंवा शाक्य यांच्या संबंधाने जी माहिती त्रिपिटक ग्रंथांत सापडते, तिजवरून असें दिसून येतें की, या राज्यांतील गावोगावच्या पुढार्‍यांना राजा म्हणत. हे सर्व राजे एकत्र जमून आपल्यापैकी एखाद्याला अध्यक्ष निवडीत. त्याची मुदत तहाहयात किंवा कांही कालपर्यंतच असे, यासंबंधीं कांहीच माहिती मिळत नाही. वज्जीमध्ये कोणी तरी महाराजा होता असेंही दिसून येत नाही. वज्जींच्या सेनापतीचा उल्लेख आहे, पण महाराजाचा नाही; कदाचित तेवढ्या वेळेपुरता अध्यक्ष निवडून ते काम चालवीत असतील. या गणराज्यांत न्यायदानासंबंधाने आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी यासंबंधाने कांही कायदे ठरलेले असत आणि त्यांना अनुसरूनच हे गणराजे आपलीं राज्यें चालवीत.

गणराज्यांच्या नाशाचीं कारणें


सोळा जनपदांच्या गणराजांचा नाश होऊन बहुतेक राज्यांत महाराजसत्ता स्थापन झाली होती. आणि मल्लांचीं लहानशीं दोन व वज्जींचें बलाढ्य एक मिळून जी तीन गणसत्ताक स्वतंत्र राज्यें बाकी राहिलीं, तीं पण एकसत्ताक राज्यपद्धतीच्या आहारीं जाण्याच्या बेतांत होतीं. याचीं कारणे काय झालीं असावीं ? माझ्या मतें गणराजांचा ऐषआराम आणि ब्राह्मणांचें राजकारणांत वर्चस्व, हीं या क्रांतीचीं प्रमुख कारणें असलीं पाहिजेत.

गणराजांना कोणी निवडून देत नसे. बापाचा मुलगा त्याच्या मागोमाग राजा होत असे. वंशपरंपरेने हा अधिकार भोगावयास मिळाल्यामुळे हे चैनी आणि बेजबाबदार होणें अगदी साहजिकच होतें. वर जें ललितविस्तरांतून वज्जींचें वर्णन दिलें आहे, त्याचा विचार केला असतां, ते गणराजे जरी प्रबळ होते, तरी परस्परांविषयीं त्यांचा आदर नसून प्रत्येक जण आपणालाच राजा समजत होता असें दिसतें. त्यामुळे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर अजातशत्रूला वज्जीच्या गणराजांत फूट पाडून तें राज्य अनायासें काबीज करतां आलें.

सामान्य जनतेचा या गणराजांना पाठिंबा असणें शक्य नव्हतें. जो तो राजा आपल्या परीने लोकांवर जुलूम करूं लागला, तर त्याला आळा घालण्याचें सामर्थ्य लोकांत किंवा इतर राजांत नव्हतें. त्यापेक्षा हे सर्व राजे नष्ट होऊन एकच सर्वाधिकारी राजा असणें सामान्य माणसाच्या दृष्टीने अधिक सोईवार होतें. महाराज आपल्या अधिकार्‍यांवर जोर जुलूम करी, राजधानीच्या आजूबाजूला एखादी सुस्वरूप तरुणी सापडली, तर तिला आपल्या झनानखान्यांत घाली. असले कांही थोडेबहूत जुलुमाचे प्रकार त्याच्याकडून घडले, तरी ते गणराजांइतके असणें शक्यच नव्हतें. गणराजे गावोगावी असल्याकारणाने त्यांचा जुलूम सुरू झाला, तर त्यांतून बहुजनांपैकी कोणीही सुटूं शकत नव्हता. कराच्या आणि बेगारीच्या रूपाने हे राजे सर्वांनाच त्रास देत असावेत. एकसत्ताक महाराजाला अशा रीतीने शेतकर्‍यांना सतावण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. त्याच्या ऐषआरामापुरता पैसा त्याला नियमित कराच्या रूपाने सहज वसूल करतां येत होता. तेव्हा सामान्य लोकांना, 'दगडापेक्षा वीट मऊ', या न्यायाने एकसत्ताक राज्यपद्धतीच बरी वाटली असल्यास नवल नाही.

एकसत्ताक राज्यांत पुरोहिताचें काम वंशपरंपरेने किंवा ब्राह्मणसमुदायाच्या संमतीने ब्राह्मणालाच मिळत असे. मुख्यप्रधानादिकांचीं कामें देखील ब्राह्मणांनाच मिळत. अर्थात्, ब्राह्मण एकसत्ताक राज्यपद्धतीचे मोठे भोक्ते झाले. ब्राह्मणी ग्रंथांत गणसत्ताक राजांचा नामनिर्देश देखील नाही, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. यावरून असें दिसतें की, ब्राह्मणांना गणसत्ताक राज्यपद्धति मुळीच पसंत नव्हती. शाक्यांसारखे गणराजे ब्राह्मणांना मान देत नाहीत, असा अंबष्ठ ब्राह्मणाने त्यांच्यावर आरोप केल्याचा अंबठ्ठसुत्तांत उल्लेख आहे.* गणराज्यांत यज्ञयागांना मुळीच उत्तेजन मिळत नव्हतें, आणि एकसत्ताक राज्यांत तर महाराजे यज्ञयाग चालवण्यासाठी ब्राह्मणांना वंशपरंपरेने इनामें देत. एका बिंबिसाराच्या राज्यांत सोणदण्ड, कुटदन्त वगैरे ब्राह्मणांना, त्याचप्रमाणें कोसल देशांत पोक्खरसाति (पौष्करसादि) तारुक्ख (तारुक्ष) वगैरे ब्राह्मणांना मोठमोठालीं इनामें होतीं, असें सुत्तपिटकांतील त्यांच्या वर्णनावरून दिसून येतें. तेव्हा 'परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ' या न्यायाने ब्राह्मणजातीचें आणि एकतंत्री राज्यपद्धतीचें परस्परांच्या साहाय्याने वर्चस्व वृद्धिंगत होणें साहजिक झालें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* चण्डा भो गोतम सक्यजाति....इब्भा सन्ता इब्भा समाना न ब्राह्मणे रुंगकरोन्ति, न ब्राह्मणे मानेन्ति, इत्यादि ॥ (दीघनिकाय अम्बठ्ठसुत्त)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16