Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न ७: क्लेशाविषयी

प्रश्न --क्लेश  व दुःख याचे महत्त्व काय ?

उत्तर--जेव्हा तुम्हाला दुःख होते क्लेश होतात त्याचे स्वरूप काय असते ?दोन प्रकारचे क्लेश असतात .शारीरिक व मानसिक .शारिरिक दुःखाचे महत्त्व वेगळे असते .उपलब्ध व आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱ्या वैद्यकीय उपायांनी अापण शारिरीक दुःख कमी करण्याचा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला बहुतेक मानसिक दुःख व क्लेश  यांच्याबद्दल विचारायचे आहे.निरनिराळ्या पातळीवरील मानसिक क्लेशाना वेगळेच महत्त्व असते. क्लेशाचे महत्त्व तुम्हाला का बरे जाणून घ्यावयाचे आहे ? याचा अर्थ क्लेशाना महत्त्व नाही असे नाही.अापण तेच जाणून घेणार आहोत.आपण तेच शोधणार आहोत. परंतु आपल्याला ते का बरे जाणून घ्यावयाचे आहे?मला क्लेश का होतात असे जेव्हा तुम्ही विचारता,क्लेशांच्या कारणांचा तपास लावण्याचा प्रयत्न करीत असता, तेव्हा वस्तुतः तुम्ही क्लेशांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत नसता काय? जेव्हा मी क्लेशाच्या महत्त्व पूर्णतेचा शोध घेतो तेव्हा मी या क्लेशाना टाळीत असतो.त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करीत असतो.मी तसा प्रय़त्न करीत नसतो काय ?वस्तुस्थिती अशी आहे की मला क्लेश होत आहेत.परंतु ज्या क्षणी मी मनाची हालचाल करतो,स्वतःला विचारतो की मला क्लेश का होत आहेत, तेव्हा मी क्लेश कमी करण्याचा प्रयत्न करीत असतो .त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करीत असतो .दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर आपल्याला क्लेश कमी व्हावेत, त्यांची तीव्रता कमी व्हावी' स्पष्टीकरणातून ते नष्ट व्हावेत, असे वाटते .त्यामुळे अर्थातच आपल्याला क्लेशांची समज येत नाहीं .जर मी या क्लेशांपासून दूर पळण्याच्या वासनेपासून स्वतंत्र असेन ,तर मात्र मला क्लेशांचा संपूर्ण गाभा व अर्थ कळण्याला सुरुवात होईल.
           
क्लेश म्हणजे काय? ढवळाढवळ म्हणजे क्लेश नव्हेत काय ?शारीरिक व मानसिक सुप्त व प्रगट  निरनिराळ्या पातळ्यांवरील ढवळाढवळ म्हणजे क्लेश होय.या ढवळाढवळीला एक विशेष तीव्रता प्राप्त झाली की मग ती ढवळाढवळ मला आवडत नाही.माझा मुलगा मुलगी पती पत्नी किंवा अतिशय जवळचे कोणी तरी वारले आहे .त्याच्या  किंवा जे कोणी असेल त्याच्या भोवती मी अनेक आशा रचल्या होत्या . तो जे काही असावे असे मला वाटत होते त्यांनी मी त्याला शृंगारला होता .तो माझा साथीदार सहकारी मित्र रक्षण कर्ता तारणहार वगैरे असावा असे मला वाटत होते.बाकी सर्व तुम्ही जाणताच .अकस्मात त्याच्या जाण्यामुळे ढवळाढवळ निर्माण झाली आहे.ती झाली  नाही काय?या ढवळाढवळीला मी क्लेश म्हणतो.
           
ते क्लेश मला आवडत नसतील तर मी असे म्हणतो की मला क्लेश का बरे होत आहेत?मला दुःख का होत आहे? मी त्याच्यावर किती तरी प्रेम केले. तोअसा होता.तो तसा होता. तो माझ्या अतिशय जवळचा होता. वगेरे वगेरे .मी शब्द, चिठ्या, श्रद्धा, वगैरेच्या मार्फत दूर पळण्याचा प्रयत्न करतो .या सर्वांचा गुंगी आणणाऱ्या औषधासारखा उपयोग होतो . 

मी हे सर्व केले नाही तर काय होते ?मी फक्त क्लेशांबद्दल जागृत आहे.मी त्याचा धि:कारही करित नाही किंवा समर्थनही करित नाही.मला फक्त क्लेश होत आहेत.मी मग त्याच्या हालचालीच्या पाठीमागून जाऊ शकतो .मी मग त्याच्या गाभ्याचा पाठलाग करू शकतो.म्हणजेच मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो .
          
या क्लेशांचा अर्थ काय आहे?जिला क्लेश होत आहेत ती ही वस्तू काय आहे ?दुःख काय आहे ?दुःखाचे कारण काय आहे हे नव्हे,तर प्रत्यक्ष काय होत आहे?या दोन्हीमधील फरक तुम्हाला कळत आहे किंवा नाही ते मला माहीत नाहीं.अशा परिस्थितीमध्ये मी क्लेशांबद्दल फक्त जागृत असतो.क्लेश अशावेळी माझ्यापासून दूर नसतात. मीच क्लेश असतो . मी क्लेशांचे द्रष्टा म्हणून दर्शन, निरीक्षण करीत नसतो. आता मी कुठे जातो ते तुमचे तुम्हीच पाहा .जर तुम्ही हे खरोखरच केले तर क्लेश तुमच्या समोर आपले अंतरंग उघडून दाखवणार नाहीत काय? मग माझ्या लक्षात येते की मी ज्या व्यक्तीवर प्रेम करीत होतो, तिच्यावर प्रेम करीत नसून मी वस्तुतः "स्वतःवर" "मी"वर प्रेम करीत होतो .मीने"मी"वर फार जोर दिला होता .त्या मनुष्याचा माझे दुःख, माझे एकाकीपण, माझे दुर्दैव, यावर फक्त पांघरूण घालण्यासाठी उपयोग होत होता .जेव्हां मी काहीही नव्हतो, तेव्हा मी अशी आशा करीत होतो, की तो तरी काहीतरी होईल .तो आता गेला आहे. मी मागे राहलो आहे .मी हरवलो आहे .मी एकटा आहे.मी त्याच्याशिवाय काहीच नाही .म्हणून मी रडतो. तो गेला याबद्दल नव्हे, तर मी मागे उरलो याबद्दल मी रडत आहे.येथपर्यंत येणे हे फार बिकट व कठीण आहे.हे लक्षात येणे फार कठीण आहे .मी एकटा आहे व मी यातून कसे बाहेर पडावे असे म्हणणे फार सोपे आहे .ही एक दुसरी पळवाट आहे .परंतु याबद्दल सावध असणे ,त्याच्या बरोबर राहणे, त्याची हालचाल पाहणे, हे फार बिकट आहे .वरील उदाहरण मी फक्त एक उदाहरण म्हणून घेतले आहे .जर मी त्या क्लेशाना माझ्यासमोर आपला बाडबिस्तारा उघडण्यासाठी परवानगी देईन ,तर मला असे आढळून येईल, की मी हरवलो आहे आणि म्हणून मला क्लेश होत आहेत.याला पहावयाला मला आवडत नाही. ज्याच्याकडे पाहण्याची मला इच्छा नाही, तिकडे लक्ष देण्यासाठी मला भाग पाडण्यात आले आहे .काहीतरी पाहण्याची माझ्यावर सक्ती करण्यात आली आहे .ते पाहण्याला आणि समजून घेण्याला मी नाखूष आहे .मला पळण्याला मदत करण्यासाठी असंख्य तथाकथित धार्मिक लोक, त्यांच्या प्रणाल्या, त्यांची तत्त्वे ,त्यांच्या आशा व मते यासह तयार आहेत."अरे बाबा तुझ्या कर्मातच तसे होते" "ती तर भगवंताची इच्छा" वगैरे वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला माहितच आहेत .परंतु जर मी या क्लेशांबरोबर राहू शकलो, त्यांच्यापासून दूर पळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, किंवा ते दुःख नाकारले नाही, तर काय होते ?अशा प्रकारे क्लेशांच्या हालचालीचा, मन पाठलाग करीत असते, तेव्हा काय होते?  तेव्हा माझ्या मनाची स्थिती काय असते ?
        
हे क्लेश म्हणजे फक्त शब्द असतो की वस्तुस्थिती असते?जर ती सत्य वस्तुस्थिती असेल, केवळ शब्द नसतील,तर शब्दाला काहीच किमत नाही.नंतर तीव्र दु खाची केवळ नि:शब्द भावनाच राहते.कशाबद्दल तर फक्त केवळ एका प्रतीकाबद्दल, प्रतिबिंबाबद्दल ,चित्राबद्दल, अनुभवाबद्दल,  काहीतरी जे तुमच्याजवळ आहे किंवा नाही त्याच्याबद्दल ,दुःखाची केवळ नि:शब्द भावना रहाते.ते तुमच्या जवळ असले तर त्याला तुम्ही सुख म्हणता ते तुमच्या जवळ नसले तर तुम्ही त्याला दुःख म्हणता .म्हणूनच क्लेश किंवा दुःख हे कुणाबरोबर तरी असलेल्या संबंधमयतेतून असतात. ही संबंधमयता हे केवळ शब्दीकरण आहे कि सत्य वस्तुस्थिती आहे ?म्हणजे भीती ज्याप्रमाणे केवळ स्वत:च असू शकत नाही तर ती कशाशी तरी असलेल्या संबंधमयतेत असते .मग ती घटना असो . व्यक्ती असो.किंवा भावना असो. त्याचप्रमाणे जेव्हा दुःख असते, तेव्हा ते एकटेच नसते ते कशाशी तरी असलेल्या संबंधमयतेतून असते.ते फक्त स्वतःच असू शकणार नाही .आता तुम्ही क्लेशांबद्दल संपूर्ण जागृत झाला आहात काय ?क्लेश हे तुमच्यापासून वेगळे आहेत व तुम्ही त्यांच्या पाठीमागून जात आहात, फक्त निरीक्षक आहात, की क्लेश म्हणजेच तुम्ही आहात ?
         
ज्याला क्लेश होत आहेत तो निरीक्षक तो द्रष्टा जेव्हा नसतो  तेव्हा क्लेश  तुमच्याहून निराळे आहेत काय?तुम्हीच क्लेश आहात. तुम्ही ते नाही काय?तुम्ही दु:खाहून वेगळे नाही तुम्हीच दुःख आहात.आता काय होते? आता चिठ्ठी डकवणे नाहीं .आता नाव देणे नाही. आता दूर सारणे नाही. तुम्ही फक्त दुःख आहात. ती त्रासाची भावना तुम्ही आहा.जेव्हा तुम्ही तेच असता तेव्हा काय होते ?जेव्हा तुम्ही चिठ्ठी डकवीत नाही, जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल भीती वाटत नसते, तेव्हा केंद्र त्याच्याशी संबंधरूप असते काय? जर केंद्र संबंधरूप असेल तर त्याला भीती वाटेल व नंतर मग केंद्राला  त्याबाबतीत हालचाल करणे भाग पडेल .परंतु जर केंद्र म्हणजे तेच असेल तर मग तुम्ही आता काय करता?आता काही करण्यासारखे शिल्लकच राहत नाही .तुम्ही त्याचा स्वीकार करीत नाही. तुम्ही वर्गीकरण करीत नाही . तुम्ही त्याला नाव देत नाही. चिठ्ठी डकवित नाही. बाजूला सारित नाही. कारण तुम्हीच क्लेश आहात.आता मग काय होते ? आता तुम्ही मला क्लेश  होत आहेत असे म्हणता काय?खात्रीने मूलगामी बदल अस्तित्वात आला आहे .याच्यानंतर मला दुःख होते असे तुम्ही म्हणणार नाही कारण आता केंद्रच शिल्लक नाही .केंद्राला दुःख होते कारण या अगोदर तुम्ही हे केंद्र काय आहे त्याची तपासणी कधी केली नाही.आपण फक्त शब्दा शब्दांवर प्रतिक्रियां प्रतिक्रियांवर जगत असतो .आपण कधीही म्हणत नाही की हे ज्याला दुःख किंवा सुख होत आहे ते केंद्र काय आहे ?तुम्ही असे म्हणत नाही की ते केंद्र मला पाहू दे.तुम्ही जबरदस्तीने शिस्तीने पाहू शकणार नाही.तुम्ही उत्सुकतेने रसपूर्णतेने पाहिले पाहिजे.स्वयंभू उत्स्फूर्त सर्वांगीण तत्काळ आकलन पाहिजे .नंतर तुम्हाला असे आढळून येईल की  ज्याला अापण क्लेश दुःख असे म्हणतो, जे आपण टाळण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यासाठी आपण शिस्त लावून घेण्याचा प्रयत्न करतो,ती वस्तू ते सर्व क्लेश नाहीसे झाले आहेत .जोपर्यंत माझ्या बाहेर असलेल्या एखाद्या वस्तूंशी माझे संबंध नाहीत तोपर्यंत समस्या निर्माण होत नाही . ज्याक्षणी मी संबंधमयता प्रस्थापित करतो त्याच क्षणी समस्या निर्माण होते.जोपर्यंत मी क्लेश ही काही तरी बाहेरची वस्तू आहे असे समजत होतो तोपर्यंत मला क्लेश होतात .कारण माझा भाऊ मेला आहे, माझ्या जवळ पैसा नाही, यामुळे किंवा त्यामुळे वगैरे वगैरे मी संबंधमयता प्रस्थापित करतो. ही संबंधमयता असत्य फसवी खोटी असते.कारण मीच जर ती सर्व वस्तू असेन, ही वस्तुस्थिती मी पाहिन, तर सर्व वस्तूच मूलगामीरित्या बदलली जाते.मग या सगळ्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो.मग तिथे पूर्ण लक्ष लागते. एकवटलेले लक्ष तिथे असते .ज्याचा पूर्ण आदर केला जातो ते संपूर्ण समजले जाते .समजूतीतून संबंधमयता संपूर्ण वितळवली जाते.अर्थातच आता भीती नसते दुःख हा शब्द नसतो क्लेश अस्तित्वात नसतात .

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत