Get it on Google Play
Download on the App Store

हिंदूंविरोधी धर्मांतरणाचे षड्यंत्र

स्वामी विवेकानंदांपासून ते सावरकरांपर्यंत आणि महात्मा गांधींपासून ते आजच्या संतांपर्यंत धर्मांतरणाला शाप मानून, धर्मांतरण हे राष्ट्रांतरण आहे हा विचार मांडला आहे. भारतातील धर्मांतरण हे सनातन संस्कृतीवरील आक्रमण आहे. मुहम्मद बिन कासीमने भारतावर केलेल्या आक्रमणापासून त्याचप्रमाणे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतात पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांकडून भारतातील हिंदूंना धर्मांतरित करण्याचे नीच कृत्य सुरू आहे. हे दोन्ही धर्मीय एका हातात त्यांचा धर्मग्रंथ आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन आजवर हिंदूंना धर्मांतरित करत आलेले आहेत. विदेशी आक्रमकांच्या आक्रमणांमुळे हिंदू समाजात निर्माण झालेल्या कुरितींमुळे हिंदू समाज विभागला गेला. जात-पात, पंथ-संप्रदाय, भाषा-प्रांत यामध्ये विभागलेला हिंदू समाज स्वतःकडे त्या-त्या संकुचित परिमाणात बघू लागला. त्यामुळे हिंदू समाजाचे अविभाज्य अंग असलेला तळागाळातील दुःखी-कष्टी, दिन-दलित हिंदू आजही धर्मांतरणाच्या जाळ्यात सहजपणे अडकतो.

स्वातंत्र्य पूर्व काळात, महात्मा गांधींनी ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून भारतात केल्या जाणाऱ्या धर्मांतरणावर कडाडून टीका केली होती. ज्या वेळी त्यांना ख्रिस्ती मिशनरी नर्सने या संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावेळी गांधीजींनी उत्तर दिले होते की, 'जर  भारताची सत्ता माझ्या हातात असती तर ख्रिस्ती मिशनऱ्यांचा धर्मांतरणाचा धंदा बंद केला असता. मिशनऱ्यांच्या धर्मांतरणामुळे हिंदूंची वेशभूषा, रीती- रिवाज, खान- पान यामध्ये अंतर निर्माण झाले आहे.' धर्मांतरणामुळे भारतीय आपल्या मूळ संस्कृतीपासून दुरावतील याची गांधीजींना चिंता होती. जी चिंता आजही कायम आहेच!

कुठल्याही कारणांमुळे धर्मांतरित झालेला हिंदू आपल्या समाजापासून दुरावतो. त्याच्या मनात आपल्या देवी-देवतांविषयी, संस्कृती विषयी आणि पर्यायाने देशाविषयी तिरस्कार निर्माण केला जातो. त्यामुळेच तो याविरुद्ध आचरण करू लागतो. उदा. धर्मांतरित झालेल्या हिंदूंची आणि त्यांच्या वारसदारांची  काशी, अयोध्या, मथुरा या धार्मिक स्थानांवरची श्रद्धा नाहीशी होऊन कालांतराने त्याला मक्का, मदिना, रोम, इटली या स्थानांविषयी आकर्षण वाटू लागते. अशाप्रकारे आपली मूळ ओळख माहीत नसल्यामुळे भारतातील धर्मांतरित हिंदूंना म्हणजेच आजच्या मुस्लिम व ख्रिस्ती धर्मियांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप ऐवजी बाबर, अकबर, सेंट झेवियर्स यांच्याप्रति आदरभाव वाटू लागतो.

स्वातंत्र्य पूर्व काळात ख्रिस्ती मिशनरी इंग्रज सरकारच्या हितासाठी  कार्यरत होते. आपला साम्राज्यविस्तार करण्यासाठी त्यांनी धर्मांतरणाचा आधार घेतला. त्यासाठी त्यांनी चर्च हे हत्यार म्हणून वापरले. या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मांतरित केलेल्या पूर्वाश्रमीच्या  हिंदूंच्या मनातील राष्ट्र भावना गळून पडली होती. पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावामुळे त्यांना इंग्रजांचे शासन हवे-हवेसे वाटत होते. पाश्चिमात्य विचारांची भुरळ पडलेल्यांच्या बाबतीत आजचे चित्र काही वेगळे नाही. इंग्रजांची भारतातील सत्ता संपूनही आज भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये धर्मांतरणाचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भारतातील नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपूर या भागात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतरणाचे कार्य केलेले आहे. इतके की, आज या भागात हिंदू अल्पसंख्याक झालेले आहेत. या भागातील हिंदूंची संख्या घटल्याने हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या भागात बंदुकीच्या टोकावर धर्मांतरणाचे कार्य केले गेले.

केवळ स्वतःचाच धर्म मानणाऱ्या मुस्लिम समाजाने इस्लामनुसार, भारतातील जम्मू-काश्मीरला दारूल इस्लामचा प्रदेश बनवण्यासाठी तेथील हिंदूंवर केलेले अत्याचार पाहिले असता, मुसलमान आपल्या धर्मासाठी जिहाद करून इतर धर्मियांचे धर्मांतरण करण्यासाठी व एखाद्या प्रदेशावर आपले आधिपत्य स्थापन करण्यासाठी कुठल्या थराला जातात हे लक्षात येण्यासारखे आहे. परंतु यासर्व गोष्टींकडे लक्ष आहेच कुणाचे? ज्यांचा इतिहास हा धर्मांतरणासाठीच रक्तरंजित आहे. त्या धर्मांध मुस्लिमांचा भारतातील इतिहास जरी पहिला तरी यांची नियत लक्षात येण्यासारखी आहे. परंतु आम्ही इतिहासाकडे डोळसपणे पाहतच नाही; हीच आमची सर्वात मोठी समस्या आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी इस्लामचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने त्यांचे डोळे फोडून, त्यांची कातडी सोलून त्यांना मारण्यात आले, बंदा सिंहच्या डोळ्यात तप्त सळई घुसवून त्यांचे डोळे फोडण्यात आले, गुरूगोविंदांच्या साहिबजद्यांना भिंतीत पुरून मारण्यात आले. हिंदूंच्या धर्मांतरणासाठी मुस्लिमांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराच्या अशा कित्येक घटना इतिहासाच्या पाना-पानांवर आहेत.

भारताच्या फाळणीनंतर १९४८ मध्ये, पाकिस्तानातील पठाणांच्या टोळ्यांनी जम्मू-काश्मीरवर आक्रमण करून तो भाग बळकावला होता. त्यावेळी पाकिस्तानी घुसखोरांना तिथून हटवण्यासाठी कुठलीही कडक उपाययोजना न करता भारताच्या तत्कालीन पंतप्रधान, जवाहरलाल नेहरूंनी पाकिस्तानशी एकतर्फी शस्त्र संधी केली. ज्यामुळे भारतात घुसलेले आक्रमणकारी त्यांनी काबीज केलेल्या भागातच राहू लागले. ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. या पाकव्याप्त काश्मीर मधून  मोठ्याप्रमाणावर पाकिस्तानी दहशतवादी भारताच्या जम्मू-काश्मीर प्रदेशात घुसखोरी करून भारत विरोधी कारवाया करत होते. या गोष्टींमागचे मूळ कारण म्हणजे जवाहरलाल नेहरु यांनी, या भागात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम धर्मियांना खुश करण्यासाठी जम्मू-काश्मीरला संविधानातील कलम ३७० व ३५(अ) द्वारे दिलेला विशेष दर्जा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्याला विरोध केलेला असतांनाही, जवाहरलाल नेहरूंनी, गोपालस्वामी  अय्यंगार यांच्याकडून ३७० कलमाचा मसुदा तयार करून घेतला व जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला. नेहरूंच्या या मुस्लिम प्रेमामुळे स्वातंत्र्यप्राप्ती पासून ते ऑगस्ट २०१९ पर्यंत भारतातील जम्मू-काश्मीर मध्ये वेगळे संविधान लागू होते. २०१९ पूर्वी भारतातील कायदे जम्मू-काश्मीर मध्ये लागू नव्हते. भारत सरकारला जम्मू-काश्मीर मधून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नव्हते. याउलट भारत सरकार त्यांचे संरक्षण आणि पालनपोषण करत होते. जम्मू-काश्मीर मध्ये भारताचे कायदे लागू नसल्यामुळे २०१९ पर्यंत म्हणजे मोदी सरकारने राज्यघटनेतील कलम ३७० व ३५ (अ) निष्क्रिय करण्यापूर्वी या भागात दहशतवादाला खतपाणी मिळत होते. या प्रदेशात भारत विरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानामधील दहशतवाद्यांना शरण दिली जात होती. तिथल्या मशिदींमधून हिंदूंविरोधी जिहादच्या घोषणा दिल्या जात होत्या. या प्रदेशात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम धर्मियांची मनमानी सत्ता चालत असे. इतकेच नव्हे तर तिथे रहाणाऱ्या हिंदूंना मतदानाच्या अधिकारापासून २०१९ पर्यंत वंचित ठेवण्यात आले होते. काश्मीर मध्ये दररोज हिंदू धर्मियांवर अत्याचार केले जात होते. १९९० मध्ये मशिदींमधून, "काफिर हिंदूंनी इस्लाम स्वीकारावा अन्यथा पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना मागे ठेऊन हा प्रदेश सोडून जावे नाहीतर हत्या करण्यात येईल!" आशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणेप्रमाणे मुस्लिमांनी हिंदूंच्या घरात घुसून कत्तली सुरू केल्या, हजारो हिंदू स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांमुळे जवळपास ४ लाख काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडून इतर राज्यांमध्ये वास्तव्यास जाण्यासाठी वेळ आली. जम्मू-काश्मीरमध्ये, बहुसंख्य असलेल्या मुस्लिम धर्मियांकडून हिंदूंवर केल्या गेलेल्या अत्याचारांमुळे तेथील हिंदूंचे डोळे उघडले आहेत. परंतु देशाच्या इतर राज्यांमध्ये मात्र अजूनही सर्वधर्मसमभाव सारख्या खुळचट कल्पनांना कवटाळून घेणारे तथाकथित सेक्युलर हिंदू अजूनही निद्रिस्त आहेत.

धर्मांतरणाला बळी पडलेले हिंदू आज स्वतःचे वेगळे अस्तित्व मानू लागले आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील धर्मांतरित केलेले पूर्वाश्रमीचे हिंदू स्वतः ला भारतीय देखील मानत नाहीत. धर्मांतरणाचा इतका विनाशकारी परिणाम त्यांच्या मन-मस्तिष्कावर झालेला आहे. धर्मांतरणामुळे भारतातील  नागालँड, मिजोराम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप या सात राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे. १९५१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार हिंदूंची जनसंख्या ८४.१% होती तर मुस्लिमांची जनसंख्या ९.८% होती.  २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार हिंदूंची भारतातील जनसंख्या घटून ७९.८% झाली तर मुस्लिमांची जनसंख्या वाढून १४.२% झाली. १९४७ मध्ये भारतात ख्रिस्ती धर्मियांची संख्या ७९ लाख होती जी आज दोन करोड पेक्षा जास्त आहे. नागालँड मध्ये आज ख्रिस्ती धर्मियांची संख्या ८७% पेक्षा जास्त झाली आहे. तर मिझोराम मध्ये ८५%,  मेघालय मध्ये ७४% , मणिपूर मध्ये ४१% केवळ ख्रिस्ती धर्मियांची संख्या झालेली आहे. या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदूंचे धर्मांतरण करून त्यांना ख्रिस्ती बनवल्यामुळे ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

भारतात ख्रिस्ती मिशनरी आपले प्रार्थना स्थळ असलेल्या चर्च मार्फत हिंदूंचे धर्मांतरण करतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या चर्चला धर्मांतरणाचे कार्य करण्यासाठी, विदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी येतो. त्याचप्रमाणे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विविध संस्थांना सुद्धा ख्रिस्ती धर्माचा प्रचार- प्रसार करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी येतो. हे ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तीना, आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या घटकांना, वनवासी बंधूंना भ्रमित करून त्यांना धर्मांतरित करतात. त्याचप्रमाणे ही मंडळी समाजातील रंजलेल्या- गांजलेल्या, अपंगांना, दुःखी कष्टी लोकांना, येशू तुमचे सर्व आजार बरे करेल, तुमची संकटातून सुटका करेल, येशूची प्रार्थना केल्याने आंधळे, मुके-बहिरे, लुळे-पांगळे बरे होतात. अशा नानाविध गोष्टीं सांगून, लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतात. इतकेच नाही तर ख्रिस्ती मिशनरी धर्मांतरणासाठी दिन-दुबळ्या, दुःखी कष्टी समाज बांधवांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवतात. प्रसंगी त्यांना पैसे, त्यांच्या मुला-बाळांना शिक्षणासारख्या सुख-सुविधा देतात. सेवेच्या निमित्ताने दिन-दुबळ्या वर्गाचे धर्मांतर करणे हे ख्रिस्ती धर्मियांचे पूर्वापार चालत आलेले षड्यंत्र आहे.

धर्मांतरणामुळे हिंदूंची दिवसेंदिवस कमी होणारी जनसंख्या ही राष्ट्रीय अखंडत्वासाठी चिंतेची बाब आहे. जेव्हा-जेव्हा आणि जिथे-जिथे हिंदूं घटला तेव्हा-तेव्हा हिंदुस्थानाचे तुकडे झालेले आहेत. आजवर अखंड भारताचे तुकडे होऊन अफगाणिस्तान, तिबेट, म्यानमार, नेपाळ, भूटान, बांगलादेश, पाकिस्तान हे देश तयार झालेले आहेत. भारत खंडित होण्यामागचे मूळ कारण धर्मांतरणच आहे. १२०० वर्षांपूर्वीच्या अखंड भारतात फक्त हिंदूच राहत होते. १२०० वर्षांमध्ये झालेल्या परकीय आक्रमकांनी भारतीयांना धर्मांतरित करून आपली जनसंख्या वाढवली आणि स्वतंत्र राष्ट्राची मागणी  करून भारतापासून वेगळे देखील झाले. आजच्या भारतातील, सात राज्यांमध्ये हिंदूंची संख्या घटून ते अल्पसंख्याक झालेले आहेत. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. मुस्लिम व ख्रिस्ती धर्मियांचे धर्मांतरणाचे कार्य वेळीच रोखले नाही तर भारताचे अजून छोटे-छोटे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आणि यासाठी जबाबदार सेक्युलरिझमच्या भ्रमात पडलेला निद्रिस्त हिंदूच असणार आहे.

सेक्युलरिझमचे प्रयोग

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
प्रास्ताविक हरवलेली हिंदू चेतना! स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांवर लादलेली मानसिक गुलामगिरी! राष्ट्रीयत्वाचा आधार हिंदुत्व! १९७६ नंतरचे सेक्युलर राष्ट्र भारत! अपेक्षा फक्त हिंदूकडूनच? इस्लाम विरोधी सर्वधर्मसमभाव ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध सर्वधर्म समभाव! ख्रिस्ती मिशनऱ्यांचे मिशन! हिंदूंविरोधी धर्मांतरणाचे षड्यंत्र धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर विशेष सुविधा! कट्टरांचे कट्टरपण, सहिष्णूंचा मानव धर्म अल्पसंख्याकांच्या नावाखाली मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण! विश्वधर्म हिंदुधर्म संदर्भ सूची- लिंक्स