Get it on Google Play
Download on the App Store

मे २६ - साधन

परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे , सर्व विश्व व्यापून आहे . मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल , त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल , इतरांना नाही . म्हणून तशी भावना असणे जरुर आहे , आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे . मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो , तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते ; कारण जी व्यक्ती नामस्मरण करते , ती स्वत :चा उध्दार करुन घेत असते , म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते .

बुध्दिवाद्यांना एक शंका अशी येते की , परमेश्वर हा जर बुध्दिदाता आहे , तर मग दुर्बुध्दी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? याला उत्तर असे की , बुध्दिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे ; पण त्या बुध्दीची सदबुध्दी किंवा दुर्बुध्दी का होते हे पाहणे जरुर आहे . प्रकाश -काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो . सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे . तसे , भगवंताचे स्मरण हे सदबुध्दीला आणि विस्मरण हे दुर्बुध्दीला कारण आहे . म्हणून , बुध्दिदाता परमेश्वर हे जरी खरे असले , तरी सदबुध्दी वा दुर्बुध्दी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे . भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुध्दी होणार नाही ; म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे ; आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण . सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे ; परंतु व्यवहार नीट करुन त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे , हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय . भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरुर आहे . भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो . अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे . अनुसंधानात स्त्री -पुरुष , श्रीमंत -गरीब , हे भेद नाहीत . इतर साधनांनी जे साधायचे , ते नुसत्या अनुसंधानाने साधते ; हाच या युगाचा महिमा आहे . इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे , याला अनुसंधान असे म्हणतात . भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय , आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट होय . एक भगवंताचे अनुसंधान ठेवा , म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील . भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी की , " देवा , प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत , पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको . "