Get it on Google Play
Download on the App Store

मे २२ - साधन

कुस्त्या खेळून , झगडून , शरीरबळ वाढते ; अवघड उदाहरणे सोडवून बुध्दिबळ वाढते ; तसेच , आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते . आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुध्दी कमी होणे ; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो ; पण तुम्ही त्यांना भिता याला काय म्हणावे ? अशा स्थितीत , संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय . त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते . भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे . दुखणे आले असता औषध घ्यावे . पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना ? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे ? एकाला येतो , एकाला नाही . ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे . तुम्ही एकच करावे , परमात्म्याला शरण जाऊन , " हा भोग भोगण्याची मला ताकद दे , समाधान भंगू देऊ नकोस , तुझे सतत स्मरण व्हावे , " असे मागावे , दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू ? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे , कर्ज , तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार ? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी , म्हणजे आपोआप ते कमी होईल .

मी म्हणजे अमुक एक , अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते , तशी देव आहे अशी खात्री पाहिजे . आपले सदगुरु देवच आहेत अशी आपली खात्री झाली , म्हणजे आपला सदगुरुंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल . माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुध्दीची केली , तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले . वास्तविक , माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे , माझ्या आज्ञेत राहणे , नामस्मरण करणे , सर्वांभूती भगवदभाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे , परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे . माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील ; एक कारण असे की , तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल ; किंवा दुसरे कारण असे की , तुम्ही अभ्यास करीत नसाल . पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे . समजा , एखाद्याला आज १०५ ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झाला , तर ते बरे नाही . तसेच , मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला , तर तेही बरे नव्हे . आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे , आणि ते विवेकाने घडवून आणावे .