Get it on Google Play
Download on the App Store

मे ३ - साधन

मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी . आता मी परमेश्वराचा झालो , आता मला काही करायचे राहिले नाही , अशी मनाची स्थिती झाली पाहिजे . ‘ हे परमेश्वरा , आता तुझ्याकरताच मी जगेन , तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही , ’ असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे . ‘ नामस्मरण होत नाही , कारण वयामुळे मन थकले , ’ हे म्हणणे बरोबर नाही . शरीर थकेल , कारण लहानपणी वाढणे आणि वृध्दपणी थकत जाणे , हा शरीराचा निसर्गक्रमच आहे ; परंतु मन थकले , हे मात्र सयुक्तिक नाही . मन हा परमेश्वराचा अंश आहे , असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे . मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची ; परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना , त्यापूर्वी केव्हाही , मन थकले आणि स्मरण करु शकत नाही असे होणे शक्य नाही . पूर्वी सहा -सहा तास बसून जप केलेला असेल , तितका आता होत नसेल , तितके बसवणार नाही . मध्ये -मध्ये झोप लागत असेल , हे मान्य आहे ; पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार . मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे . तेव्हा , सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरुर आहे . पैसाअडका , प्रपंचातल्या सर्व गोष्टी , यांचा मनाने त्याग करावा . असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन .

पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा , माणसाला भगवंतापासून दूर नेतात ; त्यांच्या तावडीत सापडता कामा नये . लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच . तो टाळता येणे कठीण आहे . पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे , त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे , म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत .

धर्माचरण , भगवदभक्ती , नामस्मरण , आणि सत्संग , हे चित्तशुध्दीचे उपाय होत . किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे . चित्तशुध्दीचे लक्षण हे की , आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे . ही भावना वाढण्यासाठी , ‘ सर्व जग सुखी असावे ’ अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा , म्हणजे हळूहळू भगवत्कृपेने साधेल . अभिमान हा मात्र चित्तशुध्दीत बिघाड करणारा आहे , आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही . पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे . म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या .