Get it on Google Play
Download on the App Store

मे ११ - साधन

खूप समजून घ्यावे , ज्ञान संपादन करावे , असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो , आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही . हे एक प्रकारचे व्यसनच आहे . अफू खाणार्‍याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही . थोडी अफू पचनी पडली की , कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो . असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते , आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो . ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचे असेच आहे ; म्हणून , थोडेच वाचून , समजून घ्यावे , आणि ते कृतीत आणावे . नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो , आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही . मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस -तीस मिनिटे पुरेशी होतात ; पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात . मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल , आणि त्यातच त्याचा अंत होईल . म्हणून नुसते वाचीतच बसू नये . थोडेच वाचावे , पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा . नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून , ते कृतीत आणण्याने प्रगती होते . म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा , ते कृतींत आणण्यावर भर असावा . आपले आकुंचित मन विशाल करणे , आपण स्वार्थी आहोत ते नि :स्वार्थी बनणे , हेच खर्‍या वेदान्ताचे मर्म आहे . नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही ; त्यासाठी साधना करायला पाहिजे . जग सुधारायच्या नादी लागू नका ; स्वत :ला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच . आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच !

वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरुप मानतो . याचा परिणाम असा होतो की , वस्तूच्या साहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्न करणाऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळविण्याच्या मागे लागतो , आणि शेवटी दु :खी बनतो . कर्माला सुरुवात करताना , फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दु :ख होते ; कर्म करीत असतांना , फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दु :ख होते ; कर्म संपून , फळ मिळाले नाही तर दु :ख होते ; आणि फळ मिळालेच , तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन , फळ मिळाल्याचा आनंद ती मारुन टाकते म्हणून दु :ख होते . सारांश , अथपासून इतिपर्यंत दु :खच पदरात पडते . यासाठी , फळाची अपेक्षा सोडून कर्म करु लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते . म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे , उधारीचा नाही , असे सर्व संतांचे सांगणे आहे .