Get it on Google Play
Download on the App Store

श्रमणारी लक्ष्मी 1

“बये, नको जाऊ कामाला. तू घरीच राहा आज. राहतेस का?” लहान बाबू म्हणाला.

“जायला हवं मला. कांडण आहे. न जाऊन कसे चालेल? मी दुपारची येऊन जाईन हा. तू पडून राहा. दादाक़डून येताना भात, लोणचे घेऊन येईन. पडून राहा. बाहेर जाऊ नकोस” लक्ष्मी बाबूच्या डोक्यावरुन हात फिरवीत म्हणाली.

“बाबा कुठे गेले ?”

“कुठे गेले देवाला माहीत. आले घरी तर बसतील तुझ्याजवळ. कामाला जायला ते आजारी असतात. गप्पा मारायला, चिलमी ओढायला नसते आजारपण. काय करायचे ? तू पडून राहा हं,” ती त्याच्या अंगावर पांघरुण घालून म्हणाली.

ते केवढे लहानसे घर होते. लक्ष्मी आणि तिचा नवरा रामजी तेथे राहत. लक्ष्मीला तीन मुले. मोठा मुलगा सात वर्षांचा. दुसरी मुलगी आणि तिसरा हा बाबू. मोठ्या मुलाचे नाव विठू. मुलीचे नाव काशी. विठू शेण गोळा करायला गेला होता. काशी ‘आई येणार आहे कांडायला ’ असा निरोप सांगायाला गेली होती. लहानगा बाबू तापाने दोन दिवस आजारी होता. लक्ष्मीचा पाय घरातून बाहेर पडत नव्हता. परंतु कामाला न जाईल तर पोटाला काय ? संसार कसा चालवायला ? लक्ष्मीचा नवरा रामजी दमेकरी झाला होता आणि जरा पांगळाही झाला होता. तो उंच झाडावर चढणारा. उंच उंच आंब्याच्या झाडांवर चढून तो आंबे काढायचा. तसेच झाडे तोडण्यात हुशार. झाड ज्या बाजूला पडायला हवे असेल, त्या बाजूला पाडायचा. गावोगावची त्याला बोलावणी यायची. परंतु रामजी एकदा झाडावरुन खाली पडला. त्या दिवशी लक्ष्मी दादांकडे दळीत होती आणि बातमी आली. तशीच ती धावत गेली. माणसे जमली होती. रामजीला डोलीत घालून घरी नेण्यात आले. किती तरी उपाय केल्यावर तो थोडा बरा झाला. परंतु तेव्हापासून तो कामाला निरुपयोगी झाला. त्याचे पाय दुखत. मैल अर्धा मैल चालणेही होत नसे. आणि दम्याचीही व्यथा जडली. रामजीला सुतारकाम येत होते. ते बसून करता येण्यासारखे. परंतु आजारपणापासून तो आळशी बनला होता. तो कामाला जात नसे. लक्ष्मी अधूनमधून त्याला बोले. एकदा तो तिच्या अंगावर धावून गेला. तेव्हापासून लक्ष्मी बोलत नसे. रामजीला कामासाठी चालवत नसे. परंतु गप्पा मारायला गावभर जाई. चिलमी ओढी. मग खोकत घरी येई. रामजीचा लहान भाऊ हरी मात्र कोठे कामाला जाई. मध्यंतरी मुंबईलाही गेला. गिरणीत कामाला लागला. परंतु संपात नोकरी गेली. तो परत घरी आला. मुंबई नको म्हणे. गावातच एका चहाच्या दुकानात तो आता कामाला होता. परंतु पगार मिळे तो सारा घरी नसे आणून देत. आपल्या लग्नासाठी त्यातून तो शिल्लक ठेवी. लक्ष्मीला काही पैसे आणून देई. लक्ष्मी बोलत नसे. दिराचा थोडा तरी आधार आहे असे तिला वाटे.

‘घरी आणतील तर सारे पैसे संपतील. उद्या लगीन तर व्हायला हवं. मी कोठून आणू चार दिडक्या? तिकडे नारायणरावांकडे नेऊन ठेवतात तेच बेश. त्यांचा संसार आज ना उद्या हवाच मांडायला.’ लक्ष्मी म्हणायची.