Get it on Google Play
Download on the App Store

शिशिरकुमार घोष 18

१८८० च्या सुमारास शिशिरबाबू व त्यांच्या कुटुंबातील इतर  मंडळी यांच्यावर पारलौकिक प्रश्नांचा अंमल जास्त बसूं लागला. पार्थिव वस्तुंचा बाजार जरा बाजूला ढकलून परलोकासंबधी विचार करावा असें त्यांना वाटूं लागलें. ज्या गोष्टींची सुखस्वप्ने आपल्या खेडेगांवांत ते अनुभवीत असत त्या गोष्टीस उरलेलें. आयुष्य वहावें असें त्यांना वाटूं लागलें. त्यांचा एक धाकटा भाऊ क्षयरोगानें हळूहळू झिजत  चालला होता. त्याच्या जीवीताची आतां आशा राहिली नव्हती.  गरीब बिचारी वृध्द आई मात्र अजूनही हयात होती. म्हातारपणी किती  वियोग सहन करावे? हा मुलगा मेला तर तिची काय अवस्था होईल.  याविषयी शिशिरबाबूंस फार भीती वाट! पारलौकिक आलेला त्यांचा विश्वास डळमळूं लागला होता काय? असेल. म्हणूनच  त्यांना वाईट वाटे.

अशा या मानसिक चिंतेच्या समयीं कर्नल आल्काट आणि मॅडम ब्लॅव्हटस्की मुंबापुरीस आली. त्यांनी शिशिरबाबूंजवळ  त्रव्यवहार सुरु केला या मंडळीचे स्वागत करणारा पहिला हिंदी माणूस म्हणजे आमचे शिशिरकुमारच होत. खाजगी रीतीनें व  आपल्या वृतपत्राच्या द्वारें यांनी यादुक्कलीची दुनियेस ओळख करुन दिली. वरील दोन्ही माणसें थिआसाफीचे भक्त व प्रसारक असले तरी परलोक विद्येवर  त्यांचा व्यांसग व श्रध्दा असे. यांची भेट घेऊन यांची एक प्रकारें चांचणी पहावी म्हणून ते मुंबापुरीस आले. ते त्यांच्याकडे दोन  आठवडे थांबले होते. शिशिरकुमार यांस परलोकविद्येचा फारच नाद लागला आणि या विषयावर ते सांगोसांग माहिती प्राप्त करुन घेऊ लागले. हा परलोक विद्येचा नाद सुरु असतांनाच, त्याचा जन्मप्राप्त वैष्णव धर्म जोरानें अचंबळूं लागला. त्यांच्या भावाच्या प्रेममय वर्तनाचा  त्यांच्या मनावर कसा परिणाम झाला होता हे मागें सांगितलेंच आहे परमेश्वराच्या नांवाने टाहो फोडण्यात हंशील नाही. परमेश्वराच्या प्रेमात आपण वाहून गेलें पाहिजे. सर्वत्र आपणांस त्याच्या प्रेमाची अनुभूति पटली पाहिजे. बंगालप्रांतामध्ये  चैतन्यप्रभूस राधाकृष्णांचा अवतार मानतात. असा एक काळ येऊन गेला की, ज्या वेळेस चैतन्याचा धर्महा अधोगामी समजला जात असे. अशिक्षितांचा धर्म, खेडवळ व  रानवटांचा धर्म असें त्यास हिणवण्यांत येई. परंतु केशवचंद्र सेन, केदार नाथ दत्त वगैरेच्या दीर्घ प्रयत्नांनी हा दृष्टीकोन बदलत चालला.  सुशिक्षित  नवतरुणांना प्रथम केशवचंद्राच्या चैतन्याच्या गोड चरित्रांने नूतन विचारांस प्रवृत्त केलें. केदारनाथांनी चैतन्यासबंधी जे संस्कृत ग्रंथ होते व जे प्राकृत होते ते लोकांसमोर आणले. परंतु या बाबतीत शिशिरबाबूंनी बजविलेलया कामागिरीस तोड नाही. त्यांनी इंग्रजी भाषेंत  इंग्रजी विद्या निष्णात लोकांसाठी दोन भागांत चैतन्यांचे चरित्र लिहिलें आहे. दुसरें एक लहान पुस्तक लिहून त्यांत वैष्णवधर्माची साधना सांगितली आहे. त्यांनी अनेक वृतपत्रांतून, मासिकातून वेळोवेळी लेख लिहून सुशिक्षितांस जागृत केलें आहे. नडियाच्या  या महान अवताराविषयी शुध्द व साग्र माहिती अनेक परिश्रम करुन त्यांनी लोकांस दिली. चैतन्याचें खरें रहस्य या पुस्तकांत माहित होतें. त्यांच्याकडे आपल्यास पूर्णपणे पहावयास सांपडते. परंतु केवळ इंग्रजीमध्ये पुस्तक लिहून या देशभक्तीचे समर्थन कसें होईल? चैतन्य कसा होता, तो कसा वागे, त्याचे रहस्य काय, त्यांतील गोडी कशी जाणावी, हें त्यांना सर्व बंगवासी यांस समजावून द्यावयांचे होते. अमृतबझारपत्रिका व इतर लेख यांनी  राजकीय वाड्:मयात त्यांनी आपल्या 'नरात्तमचरित्र' काल चंद्रगीत, अमियनिमाइचारित्र' या तीन ग्रंथानी कायम स्थान मिळविले आहे.  मनुष्याचे अंतरंग त्याच्या ग्रंथांत पहावयास सांपडते. तो ज्या वेळेस लिहित असतो त्या वेळेस तो सर्व विसरुन लिहितो. आपण आपणांशींच बोलत आहोंत असा मनांत विचार येतो. आणि मनुष्य सर्व ओकून टाकितो. मनुष्यास दुस-याजवळ बोलतांना, दुस-याच्या आवडी निवडी त्याचा दर्जा या गोष्टी लक्षांत घ्याव्या लागतात. येथें तसें नसते. शिशिरकुमारचें ग्रंथ पहिले म्हणजे इतर परिस्थीतींत लपलेल्या किंवा गुदमरलेल्या त्यांच्या वृत्ति येथें पूर्णपणे पसरल्या आहेत हें पाहून आनंद होतो. थोर हृदयाचें सुंदर प्रतिबिंब येंथे दिसते. भक्ति, ज्ञान वैराग्य, प्रेम यांचे मळेच्या मळे हारींने त्यांच्या ग्रंथात लागून रहिले.  आहेत असें आढळून येईल. हयांतील कांही मताविषयी , कांही विचारांविषयी मतभेद दिसून येईल, कारण त्या त्या स्थितींतील मनुष्याच्या बुध्दीचे तें वैचित्र्य असतेंच परंतु हीं पुस्तके जो कोणी वाचील, त्याला या कुशल ग्रंथकाराच्या अलौकीक बुध्दिमत्तेची व सहृदयतेंची तारीफ केल्याविना राहणार नाही हें मात्र खास त्यांच्या ग्रंथात अशी अनेक  स्थळें आहेत की, जेथें त्रस्त मन विश्रांति पावतें. सूर्यप्रकाशांत तळपणा-या हि-याप्रमाणे ग्रंथातील उतारे चमकतात. त्यांची बरोबरी कोणी करुं शकणार नाही. लेखनशैली इतकी विषयानुरुप व हृदयगंम आहे, व या भाषेंतील विचारमौक्तिकें इतकी सोज्वळ आहेत की, वाचणारा वेडावतो. व डोकें डुलवितो. जगांतील उत्कृष्ठ वाड्मयाच्या तोडीचे हें वाड्:मय वाचलें म्हणजे कोण सहृदय व रसिक वाचक मान तुकविणार नाही. गहिंवरुन जाणार नाही. ? वाचकांचे तादात्म्य करणें ही जर उत्कृष्ट वाड्:मयाची एकमेव कसोटी असेल तर ती येथें सफल होते. जोंपर्यंत वंगभाषा जगांत आहे तोंपर्यत हें गद्य काव्यात्मक ग्रंथ कायम राहणार. जंनी हे ग्रंथ वाचले असतील त्यांना त्यांतील मौज कशी और आहे हें समजलेंच असेल. त्यांची कितीही स्तुति केली तरी ती अपुरीच ठरणार वंगभाषेंतील हे ग्रंथ केवळ अमोलिक ठेव होत. वंगभाषेवर अनंत उपकार त्यांनी करुन ठेविलें आहेत.