Get it on Google Play
Download on the App Store

सद्‍गुरू - जुलै २५

संकल्प ही फार मोठी शक्ती आहे . इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली , तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही . तसेच , भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो . प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या , तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही . याच्या उलट , भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे , आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात , आणि नंतर आपोआप नाहीशा होतात . म्हणून नेहमी ‘ भगवंत मला हवा ’ अशी इच्छा करीत जावे . त्याचे नाम घेणे , म्हणजे ‘ तू मला हवास ’ असे म्हणणेच होय . खर्‍या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला , तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो . आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो , ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे , म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही .

नामात एक विशेष आहे . विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम , म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे , ते करीतच असते . म्हणून कशाकरता का होईना , नाम घ्या . पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल . साधन तेच , आणि साध्यही तेच . नामच एक सत्य आहे , यापरते दुसरे सत्य नाही , यापरते दुसरे साधन नाही , असा दृढ भाव असावा . आपण कोणाचेही कृत्य करीत असताना , ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते , त्याप्रमाणे , नाम घेताना , आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी . ही जाणीव अखंड ठेवणे , मी भगवंताचा आहे हे जाणणे , याचे नाव अनुसंधान . वास्तविक आपण भगवंताचेच आहोत , पण भ्रमाने मला ‘ मी विषयाचा आहे ’ असे वाटू लागले . संत ‘ तू विषयाचा नाहीस , भगवंताचा आहेस , ’ असे सांगतात . हीच संतांची खरी कामगिरी ; आणि याकरता ते नाम सांगतात . नाम घेणे म्हणजे ‘ मी विषयाचा नाही , भगवंताचा आहे ’ असे मनाला सांगणे , मनात तशी जाणीव उत्पन्न करणे , आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुनः पुनः मनाला तेच सांगणे , म्हणजे तेच नाम सतत घेणे .

भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे , त्याचे काम झालेच पाहिजे . आपल्याला जगातला मान , लौकिक , पैसा , विषय , इत्यादि काही नको असे वाटते का ? तसे नसेल तर , ‘ भगवंत मला हवा आहे ’ असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही . ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे . जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल . तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे , तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल , हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे .

ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास

स्तोत्रे
Chapters
सद्‍गुरू - जुलै १ सद्‍गुरू - जुलै २ सद्‍गुरू - जुलै ३ सद्‍गुरू - जुलै ४ सद्‍गुरू - जुलै ५ सद्‍गुरु - जुलै ६ सद्‍गुरु - जुलै ७ सद्‍गुरु - जुलै ८ सद्‍गुरु - जुलै ९ सद्‍गुरू - जुलै १० सद्‍गुरू - जुलै ११ सद्‍गुरू - जुलै १२ सद्‍गुरू - जुलै १३ सद्‍गुरू - जुलै १४ सद्‍गुरू - जुलै १५ सद्‍गुरू - जुलै १६ सद्‍गुरू - जुलै १७ सद्‍गुरू - जुलै १८ सद्‍गुरू - जुलै १९ सद्‍गुरू - जुलै २० सद्‍गुरू - जुलै २१ सद्‍गुरू - जुलै २२ सद्‍गुरू - जुलै २३ सद्‍गुरू - जुलै २४ सद्‍गुरू - जुलै २५ सद्‍गुरू - जुलै २६ सद्‍गुरू - जुलै २७ सद्‍गुरू - जुलै २८ सद्‍गुरू - जुलै २९ सद्‍गुरू - जुलै ३० सद्‍गुरू - जुलै ३१