Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञयाग 12

दृढनेमि नांवाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. वृध्दापकाळीं आपल्या मुलाला अभिषेक करून तो योगाभ्यासाठी उपवनांत जाऊन राहीला. सातव्या दिवशीं राजाच्या प्रासादासमोर असलेलें देदीप्यमान चक्र अंतर्धान पावलें. तेव्हा दृढनेमीचा पुत्र फार घाबरला आणि राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने त्याला हें वर्तमान विदित केलें. राजर्षि म्हणाला, ''मुला, तूं घाबरूं नकोस. हें चक्र तुझ्या पुण्याईने उत्पन्न झालें नव्हतें. तूं जर चक्रवर्ती राजाचें व्रत पालन करशील, तर तें पुन्हा जागच्या जागीं येऊन स्थिर राहील . तूं लोकांचें न्यायाने आणि समतेचे रक्षण कर, तुझ्या राज्यांत अन्यायाची प्रवृत्ति होऊं देऊं नकोस. जे दरिद्री असतील त्यांना (उद्योगाला लावून) धन मिळेल अशी व्यवस्था कर आणि जे तुझ्या राज्यांत सत्पुरूष श्रमणब्राह्मण असतील त्यांजपासून वेळोवेळी कर्तव्याकर्तव्याचा बोध करून घे. त्यांचा उपदेश ऐकून अकर्तव्यापासून दूर हो, व कर्तव्यांत दक्ष राहा.''

तरूण राजाने हा उपदेश मान्य केला. आणि त्याप्रमाणे वागल्याने तें देदीप्यमान चक्र पुन्हा स्वस्थानीं आलें. राजाने डाव्या हातांत पाण्याची झारी घेतली, आणि उजव्या हाताने तें चक्र प्रवर्तित केलें. तें त्याच्या साम्राज्यांत चोहोकडे फिरलें. त्याच्या मागोमाग जाऊन राजाने सर्व लोकांना उपदेश केला की, 'प्राणघात करूं नये, चोरी करूं नये, व्यभिचार करूं नये, खोटें बोलूं नये. यथार्थतया निर्वाह करावा.'

त्यानंतर ते चक्ररत्न फिरून चक्रवर्ति राजाच्या सभास्थानासमोर खडें राहिलें. राजवाडयाला त्याने शोभा आणली.

हा चक्रवर्तिव्रताचा प्रकार सात पिढयांपर्यंत चालला. सातव्या चक्रवर्तीने संन्यास घेतल्यावर सातव्या दिवशीं ते चक्र अन्तर्धान पावले, आणि त्यामुळे तरूण राजाला फार दु:ख झालें. पण राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने चक्रवर्तिव्रत समजावून घेतलें नाही. त्याच्या अमात्यांनी आणि इतर सदगृहस्थांनी त्याला तें चक्रवर्तिव्रत समजावून दिलें. तें ऐकून घेऊन राजाने लोकांचें न्याय रक्षण आरंभिलें; पण दरिद्री लोकांना उद्योग मिळेल अशी व्यवस्था केली नाही. त्यामुळे दारिद्र भयंकर वाढलें. आणि एका मनुष्याने चोरी केली. त्याला लोकांनी राजाच्या स्वाधीन केल्यावर राजा म्हणाला, '' रे माणसा, तूं चोरी केलीस हें खरें काय?''

तो- खरें महाराज.
राजा- कां चोरी केलीस?
तो- महाराज, निर्वाह होत नाही ना!

त्याला यथायोग्य द्रव्य देऊन राजा म्हणाला,''ह्या द्रव्याने तूं स्वत: निर्वाह कर, तुझ्या कुटुंबाला पोस, व्यापार उद्योग आणि दानधर्म कर.''

ही गोष्ट दुसर्‍या एका बेकाराला समजली. तेव्हा त्यानेही चोरी केली. राजाने त्यालाही यथायोग्य द्रव्य दिलें. लोकांना समजून चुकले की, जो चोरी करतो, त्याला राजा बक्षीस देतो. तेव्हा जो तो चोर्‍या करूं लागला. त्यापैकी एकाला पकडून राजाकडे नेलें. राजाने विचार केला,'जर चोर्‍या करणार्‍यांना मी द्रव्य देत गेलो, तर सर्व राज्यांत बेसुमार चोर्‍या होतील! म्हणून या माणसाचा शिरच्छेद करावयास लावणें चांगलें, त्याप्रमाणें त्या माणसाला त्याने दोर्‍यांने बांधावयास लावलें, त्याचें मुंडन करवलें, आणि रस्त्यांतून धिंड काढावयास लावून नगराच्या दक्षिणेला त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23