Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग १५

अशा रीतीने पांडुरंगाची आळवणी करताच गाभार्‍यातील देखावा एकदम बदलून गेला पांडुरंगाच्या मूर्तीच्या ठिकाणी धनुर्धारी रामचंद्राची मूर्ती दिसू लागली. समर्थांचा कंठ सद्‌गदित झाला आणि त्यांनी प्रभू रामचंद्राच्या पायावर डोके ठेवले. सर्व बडवेमंडळी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाली आणि सर्वजण समर्थांना शरण गेली. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेसाठी अनेक किल्ले शत्रूकडून जिंकून घेतले. आणि निरनिराळ्या किल्ल्यांचे बांधकाम सुरू केले. हजारो गवंडी, सुतार, पाथरवट मंडळी खपत होती. ते दृश्य पाहून शिवरायांच्या मनात विचार आला की, "या सर्वांचा पोशिंदा मीच आहे." समर्थांनी हे अंतर्ज्ञानाने हे जाणले आणि तत्काळ ते किल्ल्यावर प्रगट झाले. शिवराय आणि समर्थ बरोबर चालत असताना वाटेतला एक धोंडा समर्थांनी फोडावयास लावला. त्या धोंड्याच्या आतल्या बाजूला मुठीएवढी पोकळी होती आणि पोकळीतील पाण्यात एक जिवंत बेडकी होती. समर्थ म्हणाले, "शिवबा ! खरोखरीच तू या त्रैलोक्याचा पोशिंदा आहेस." शिवाजीमहाराज मनातून उमगले आणि त्यांनी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले. "जनहो ऐका शिवराज्यातिल नवलकथा एक, पाषाणाच्या पोटि निपजला सजीव मंडूक."

जनहो ऐका शिवराज्यातिल नवलकथा एक,

पाषाणाच्या पोटि निपजला सजीव मंडूक ॥ध्रु०॥

करुनी यवनांचे निर्दालन

महाराष्ट्र-भू केली पावन

दुर्गम दुर्गहि घेती जिंकुन

गर्जती 'हरहरमहादेव' अन दाविती यमलोक ॥३॥

किल्ल्यावर तटबंदी करिती

ढासळले तट पुन्हा बांधिती

सहस्त्रावधी मजूर खपती

छत्रपती जातीने करिती देखभाल देख ॥२॥

जिकडे तिकडे किल्ल्यावरती

घाम गाळुनी कामे करती

शिवबांच्या मनि विचार येती

'पालनपोषण कर्ता यांचा असे मीच एक" ॥३॥

अहंकार जाहला शिवाला

अंतर्ज्ञाने समजे गुरुला

झडकरि निघती शिवभेटीला

"जयजय रघुवीर" समर्थांची श्रवणि येइ भाक ॥४॥

शिवबा गुरुचरणांना वंदिति

विनम्रभावे कुशल विचारिति

बोलत बोलत सवे चालती

मार्गावरती मधेच दिसला शिलाखंड एक ॥५॥

शिला देखुनी समर्थ वदती

"कशास मार्गी ही आपत्ती

खंडुनि टाका तिजला संप्रति ।"

द्विखंड झाली शिला घालिता सबलघाव एक ॥६॥

त्या शीलेच्या पोटे दिसली

मुठीएवढी सजल पोकळी

जलामधे त्या जिवंत पाहिली

सान बेडकी, आश्चर्याने स्तिमित सर्व लोक ॥७॥

समर्थ म्हणती "बा शिवराया

धन्य धन्य तव अद्‌भूत किमया

जड पाषाणी रक्षिसि काया

तूच खरोखर त्रैलोक्याचा सर्वेश्वर एक ॥८॥

ऐकुनि शिवबा तटस्थ झाले

पश्चात्तापे मनी विरमले

समर्थचरणी लीन जाहले

अहंकार वितळला देखुनी, सद्गुरु निःशंक ॥९॥