Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग १४

समर्थांचा उपदेश श्रवण करून शिवाजीमहाराज प्रतापगडावर परतले. समर्थ संचार करीत करीत एकदा पंढरपुरला गेले. पांडुरंगाचे दर्शन घेण्याकरिता ते मंदिराच्या गाभार्‍यात गेले आणि दर्शन घेतल्यानंतर "जयजय रघुवीर समर्थ" असे सहजोद्गार त्यांच्या तोंडातून निघाले. मूर्तीशेजारी बडवे मंडळी होती. त्यांच्या कानावर ते शब्द पडताच त्यांनी समर्थांना घेरले, आणि पांडुरंगासमोर पांडुरंगाचाच जयजयकार केला पाहिजे असे सांगितले. समर्थ म्हणाले, "पांडुरंग आणि राम ही दोन वेगवेगळी दैवते असली तरी परमेश्वर एकच आहे. म्हणून आपण असा विषाद मानण्याचे कारण नाही."परंतु बडवे मंडळी ऐकावयास तयार होईनात, आणि पांडुरंगाचा जयजयकार केल्याशिवाय जाऊ देईनात. "अनेकी सदा एक देवासि पाहे" या समर्थांच्याच उक्तीप्रमाणे समर्थांनी बडवेमंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते पांडुरंगाच्या मूर्तीसमोर अनन्यभावाने उभे राहिले. त्यांनी पांडुरंगाला आळवायला सुरुवात केली. "इथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघःश्यामा."

इथे कारे उभा श्रीरामा

मनमोहन मेघ श्यामा ॥ध्रु॥

काय केली शरयू गंगा

इथे आणिली चंद्रभागा

काय केली अयोध्यापुरी

इथे वसविली पंढरी ॥१॥

काय केले वानरदळ

इथे जमविले गोपाळ

काय केले धनुष्यबाण

कर कटावरी ठेवून ॥१॥

काय केली सीतामाई

इथे राही रखुमाबाई

रामदासी ऐसा भाव

तैसा झाला पंढरिराव ॥३॥