Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग ८

तीर्थाहून परत आल्यावर समर्थ पंचवटीस आले. तीर्थयात्रेचा समग्र अहवाल प्रभू रामचंद्रांना सादर केला. तीर्थयात्रेचे सर्व पुण्य प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केले. यानंतर कृष्णातीरी संचार करण्यासाठी समर्थ निघाले. अंगावर भगवी वस्त्रे आणि खांद्यावर गलोल अशा वेषात ते पैठण क्षेत्रातील वाळवंटात फिरत होते. तिथल्या काही ब्राह्मण मंडळींनी त्यांची कुचेष्टा करावी म्हणून आकाशातून उडणार्‍या घारीला गलोलीने नेम मारून पाडावयास सांगितले. समर्थांनी घार पाडली. त्याबरोबर त्याच ब्राह्मणांनी हिंसा केल्याबद्दल समर्थांना सक्षौर प्रायश्चित्त घ्यायला लावले. प्रायश्चित्तानंतरही घार जिवंत होत नाही हे पाहुन समर्थांनी ब्राह्मणांना विचारले, "प्रायश्चित्ताचा काय उपयोग झाला?' ब्राह्मण हसू लागले. तेव्हा समर्थांनी घारीला हातात घेतले आणि प्रभू रामचंद्राचे स्मरण करून तिला सांगितले, "पूर्वीप्रमाणे आकाशात विहार कर." त्याबरोबर घार उडून गेली. सर्व ब्राह्मण समर्थांना शरण्गेले. "अचेतनासी करी सचेतन, दावि चमत्कार, त्याविना कुठे नमस्कार."

अचेतनासी करी सचेतन,

दावि चमत्कार, त्याविना

कुठे नमस्कार

प्रभुरायाची सर्व लेकरे

अडखळती जगि नित अविचारे

भवसागरि बुडताति बिचारे

गुरु एकच आधार ॥१॥

नरतनु दुर्लभ लाधलि दैवे

सार्थक नरजन्माचे व्हावे

राघवरूप निरंतर ध्यावे

कोण दुजा आधार॥२॥

जनसेवेचे बांधुनि कंकण

सखोल केले स्वये निरीक्षण

निजधर्माचे करि संरक्षण

दावुनि साक्षात्कार ॥३॥