Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग ६

एकदा नारायण ध्यानस्थ बसला असता कुणाच्या तरी कंकणाचा नारायणाला आवाज आला. यावरून नमस्कार करणारी स्त्री सुवासिनी आहे असे समजून त्याने आशीर्वाद दिला, "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव." ती स्त्री पतीबरोबर सती जाण्यासाठी निघाली होती. तिने विचारले, "हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढील जन्मीचा?" नारायण म्हणाला, "याच जन्मीचा." आणि त्याने डोळे उघडून पाहिले तो बाई सती जाण्यासाठी निघाली आहे. नारायणाने बाईंना सांगितले, "माझ्या तोंडून गेलेला शब्द रघुपतीचा आहे. तो अन्यथा होणार नाही. मी तुमच्या पतींना एकदा पाहतो." असे म्हणून नारायणाने कमंडलूतील गंगोदक हातात घेतले आणि त्या बाईच्या पतीच्या मृतदेहावर सिंचन केले.त्याबरोबर तिचा पती खडबडून उठून बसला. सर्व लोकांना अत्यंत विस्मय वाटला आणि त्यांनी नारायणाच्या चरणी लोटांगण घातले. नारायण म्हणाला, हे सर्व रघुपतीने केलेले आहे. आपण त्याचे सतत स्मरण केले पाहिजे. म्हणजे तो आपल्याला कधीही विसरणार नाही. "नित बोला तुम्हि हरिचे नाम । श्रीराम जयराम जयजयराम ।"

नित बोला तुम्हि हरिचे नाम

श्रीराम जयराम जयजयराम ॥ध्रु०॥

रामनाम उच्चारण सोपे

निशिदिनि स्मरता जळतिल पापे

अघम वासना थरथर कापे

सतत स्मरा तुम्हि प्रभुचे नाम ॥१॥

सगुण रूप श्रीराम दयाघन

घडता दर्शन पावन जीवन

भाव दाटले भरले लोचन

सतत करा नामामृत पान ॥२॥

निर्मल भाव प्रभूवर ठेवा

भवसागरि तो एक विसावा

सकल सुखाचा एकच ठेवा

सोडु नका नित चिरसुख धाम ॥३॥

प्रभुनामाची जडता गोडी

तोचि एक इहपर सुख जोडी

मोहपाश तो सहजचि तोडी

हरिनामचि त्या सौख्यनिधान ॥४॥

वाल्मिकि तरला नामबलाने

रचिले रामायण भाग्याने

कविकुलगुरु मानिति अभिमाने

भवदुख वारिल प्रभुचे नाम ॥५॥

उठता बसता नाम स्मरावे

राघवरूप निरंतर ध्यावे

सकल चराचरि त्यास पाहावे

तोच जगाचा चिरविश्राम ॥६॥

भक्तवत्सला मेघश्यामा

श्रीरघुनंदन हे श्रीरामा

तव नामाचा अगाध महिमा

क्षणहि न विसरो मंगल नाम ॥७॥