Get it on Google Play
Download on the App Store

स्मशान

एका दुर्मिळ भागातील लहानशा खेडेगावमध्ये गव्हाचं एक वाळलेलं शेत असतं.पीक अर्ध्यावर आलेलं असताना देखील त्यावर पुढील प्रक्रिया करता येणार नव्हती. खतपाणी घातलेली ती जमीन नापीक झाली होती. सगळीकडे शांतता असताना, मनुष्याच्या असित्वाची जाणीव देखील नसताना त्या उष्ण वातावरणामध्ये वारा आपल्या अस्तित्वाची जाणीव देत होता. दूर कुठंतरी वाळलेल्या झाडाच्या फांदीवर भुकेलेले कावळे काव-काव करत होते. मध्येच एखादी घार आकाशातून जमिनीवर भक्ष्य शोधात होती. भक्ष्य तरी कुठे सापडणार? नापीक जमीन ती, साधा उंदीर सुद्धा नाही सापडला त्या घारीला. दूरपर्यंत कुठेही पाण्याचा थेंब दिसणे शक्य नव्हते, अशा या भयाण वातावरणातील भयान शांतता चिरत एका स्त्रीची वेदनेने भरलेली किंचाळी ऐकू येते.

शेताच्या अगदी मधोमध ती स्त्री पडलेली असते. घारीचं आधीच तिच्याकडे लक्ष्य गेलं होतं, पण तिची तडफड बघून घार त्या स्त्रीजवळ जात नव्हती. ती स्त्री अर्धी निर्वस्त्र असते. कुठेतरी शेजारी तिचा परकर पडलेला असतो. तिचे पाय जमिनीला मागेपुढे घासत तिची तळमळ व्यक्त करत होते. सोबत त्या शेतातील शेतकऱ्याने तिला घट्ट पकडलं होतं. त्या स्त्रीला वेदना असहाय्य होत होत्या. ‘नाही… नको… दैवा… वाचीव मला… आई गं…’ ती किंचाळतच होती. तिला तिथे वाचवणार कोणीही नव्हतं. शेवटी तो शेतकरी त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने वार करतो आणि त्या स्त्रीचा आवाज थांबतो.

आता तो शेतकरी उठून उभा राहतो. त्याचं संपूर्ण शरीर घामाने ओलाचिंब झालं होतं. शेतात तो इकडेतिकडे नजर फिरवतो. दूरपर्यंत त्याला कोणीही दिसत नाही. आपल्या मळक्या, मातीने माखलेल्या कापडाला तो घाम पुसतो आणि पुन्हा खाली वाकतो. त्या स्त्रीचा परकर हातात घेऊन डोळे आणि हाताला लागलेलं रक्त पुसतो. नंतर त्याचीच झोळी करून तो जन्माला आलेलं बाळ उचलतो. दूरपर्यंत कोणतेही वैद्यकीय साधन उपलब्ध नसल्याने त्यानेच आपल्या पत्नीची प्रसूती केली होती.

दोघांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. त्यांचं मूल त्यांच्या हातात असतं. दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहतात. पण तो आनंद क्षणभरपूरताच असतो. त्या अडाणी शेतकऱ्याला लक्षात येतं की, आपलं जन्माला आलेलं मूल रडत नाहीये. थोड्या वेळाने त्याला कळतं, आपलं मूल मेलेलं आहे. ही गोष्ट त्याच्या पत्नीला त्याच्याकडून समजून घेण्यासाठी शब्दांची गरज नव्हती.

शेतकऱ्याला वाटतं, मी रडलो तर तिला अजून वाईट वाटेल, ती स्वतःलाच दोष देत बसेल.’ आणि त्याच्या पत्नीला वाटतं, ‘मी रडले तर यांना धीर कोण देईल?’ दोघेही एकमेकांना धीर देतात. पत्नीला जवळ घेत तो ते मेलेलं मूल बाजूला ठेवतो. तो नुसता बसून असतो आणि ती त्याच्या कुशीत डोकं ठेवून असते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये त्यांनी खूप स्वप्ने सजवली होती जी एका क्षणात नाहीशी झाली.

आकाशातून येरझाऱ्या घालणारी तो घार आता जमिनीवर आली होती. हळू हळू करून आता तिने त्या बाळाच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली होती. पाठीमागून कावळे देखील येतच होते.

खरंच ती जमीन इतकी नापीक होती का? जिथे धान्य तर सोडा, एक मूलदेखील जन्माला येऊ शकलं नाही. धान्य उगवत नाही आणि मूल जन्माला येत नाही तर, त्या जमिनीने त्या घारीची भूक भागावलीच कशी?