Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८

पांडव वनवासाला गेले. त्यांची खबरबात हस्तिनापुराला कळत होतीच. पांडवांना हिणवण्यासाठीं दुर्योधन व कर्ण यांनी गायींचीं खिल्लारे तपासण्याच्या निमित्ताने वनांत त्यांच्या सन्निध जाऊन त्यांना आपल्या वैभवाचे प्रदर्शन घडवावे व त्यांची दैन्यावस्था पहावी म्हणून द्वैतवनात दौरा काढला. हा बेत धृतराष्ट्राला पसंत नव्हता आणि भीष्महि त्याला मान्यता देणार नाही असे त्याने दुर्योधनाला म्हटले. दुर्योधनाने बापाची समजूत काढली अन भीष्माला विचारलेच नाहीं! एव्हांना दुर्योधनाने व कर्णाने भीष्माला काडीइतकीहि किंमत द्यायची नाही असेच ठरवले होते! भीष्म तरीहि हस्तिनापुराला चिकटून राहिला ! कां कोण जाणे.
कौरव वनात गेले तेथे त्यांचा गंधर्वांशी झगडा होऊन सडकून मार मिळाला. कर्ण दुर्योधनाला सोडून जीव वाचवण्यासाठी पळून गेला. दुर्योधन गंधर्वांचा बंदी झाला. अखेर पांडवांनी दुर्योधनाला मुक्त केले. भयंकर अपमान सोसून सगळे हस्तिनापुराला परत आले. यावेळी मात्र भीष्माने ’कर्ण पांडवांच्या चौथ्या हिश्शानेहि नाही’ असें दुर्योधनाला ऐकवलें. दुर्योधन व कर्ण यांनी नेहमी प्रमाणे भीष्माकडे पूर्ण दुर्लक्ष केले. भीष्म तरीहि अपमान सोसत हस्तिनापुरातच राहिला!
पांडव अज्ञातवासात असताना त्याना शोधण्याच्या दुर्योधनाच्या प्रयत्नांमध्ये भीष्माने उत्साहाने भाग घेतला. जणूं पांडवांना शोधून काढून पुन्हा वनवासाला धाडण्यात त्याला स्वत:ला काहीच वावगे वाटत नव्हते आणि त्याला तेच हवे होते! एवढा तो पांडवांच्या विरोधात कां गेला असावा? विराटाचा सेनापति असलेल्या कीचकाच्या वधानंतर त्रिगर्त राजाच्या सूचनेप्रमाणे विराटावर हल्ला करून त्याचीं गायींचीं खिल्लारे लुटण्याच्या दुर्योधनाच्या बेतातहि तो सहभागी झाला. खरे तर कौरवांचे व विराटाचे काही पुराणे वैर नव्हते मग त्याने दुर्योधनाला विरोध कां केला नाहीं?
महाभारतात स्पष्टपणे म्हटलेले नाही पण सूचित केले आहे कीं कीचकाच्या वधाची बातमी ऐकून दुर्योधनाला वाटले कीं हा वध भीमाशिवाय दुसर्‍या कोणी केला असणे असंभव आहे. त्रिगर्तराजाची सूचना त्याने स्वीकारली यामागे विराटाच्या आसर्‍याला पांडव असतील तर विराटाच्या मदतीला ते युद्धात उतरतीलच व ओळखता येतील असा त्याचा विचार होता असे दिसते. भीष्म वा विदुराला अशी शंका आली असती तर विराटावर हल्ला करण्याचा बेत त्याना कदाचित मोडून काढतां आला असता. भीष्माने तसा प्रयत्न केला असता काय हा प्रष्नच आहे! कौरवांचा हल्ला पहिल्या दिवशी सप्तमीला झाला असता तर अर्जुन नव्हे तर भीम कौरवांशी युद्धाला आला असता व तोहि लगेच ओळखला गेला असताच. प्रत्यक्षात त्रिगर्तांचा हल्ला सप्तमीला दुपारी झाला. त्रिगर्तांच्या विरुद्ध भीम लढला व त्याने मोठा पराक्रम गाजवला पण सुदैवाने, त्रिगर्ताला त्याला ओळखता आले नाही. युधिष्ठिराने त्याला ’इतरांप्रमाणेच लढ, झाड उपटून घेण्यासारखे तुझे खास प्रकार करूं नको, नाहीतर ओळखला जाशील’ असे बजावले होते.
प्रत्यक्षात कौरवांचा हल्ला दुसर्‍या दिवशी अष्टमीला सकाळीच झाला. विराटाचे वतीने त्याचा पुत्र उत्तर व अर्जुन युद्धाला उभे राहिल्यावर कौरवांनी अर्जुनाला लगेच ओळखलें व ’तेरावे वर्ष पुरे होण्यापूर्वीच अर्जुन ओळखला गेला आहे’ असे दुर्योधनाने लगेच म्हटले. द्रोणाचार्यांनी, ’पांडवांनी असे कसे केले’ अशी शंका व्यक्त केल्यावर भीष्माने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचे गणित उलगडून ’आज सकाळीच, सौरमानाने पांडवांनी तेरा वर्षे पुरीं केलीं आहेत’ असें म्हटलें. (कौरवांचा हल्ला एक दिवस आधी झाला असता तर तेहि झाले नसते!) चांद्रमानाने आवश्यक तेवढे अधिक महिने मोजून तेरा वर्षे उघडच पुरीं झालेलीं नव्हती. मग पांडवांनी अनुद्यूताचा पण पुरा केला असे ठरते कीं नाहीं याबद्दल भीष्माने स्वत:चे नि:संदिग्ध मत, अनुकूल वा प्रतिकूल, तेव्हां (वा नंतर पुढे केव्हांहि, कृष्णशिष्टाईचे वेळीं देखील) दिलेच नाहीं! अर्जुनापासून कर्णाला व कौरवांना यावेळीं वांचवून हस्तिनापुराला परत नेण्याचें काम मात्र त्याने केलें.