Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील कर्णकथा - भाग ३

कर्णजन्माबद्दल माझा तर्क असा आहे. कुंती माता होणार हे दिसून आल्यावर तिच्या दत्तक मातापित्यानी म्हणजे कुंतिभोज व पत्नी यानी, तिचे पुढील जीवन नासून जाऊं नये यासाठी तिच्या बालकाला जन्मानंतर लगेचच दूर पाठवून देण्याची व्यवस्था केली व तिच्या चुकीवर पांघरूण घातले असावे असा तर्क सहजच सुचतो. आईबापाना काहीहि कळू न देतां एकट्या अल्पवयीन कुंतीने स्वत:च्या विचाराने व सेविकेच्या मदतीने, स्वत:चे पूर्ण गर्भारपण व बाळंतपण पार पाडले व कर्णाला पेटीत घालून नदीत सोडून दिले असे महाभारतात म्हटले आहे खरे पण ते कसे शक्य आहे? ती व्यवस्था आईवडिलानी केली असे मानणे जास्त सयुक्तिक आहे. काही काळ गेल्यावर हिचे स्वयंवर करावे असा त्यांनी विचार केला असेल. पण कुंतीच्या आईनेहि मूल पेटीत घालून नदीत सोडले हे खरे वाटत नाही. पण मग काय केले असेल? कर्ण अधिरथापर्यंत कसा पोचला?
अधिरथ हा हस्तिनापुरातील सूत म्हणजे सारथी पण तो खुद्द पांडू, भीष्म, धृतराष्ट्र वा दुर्योधनाचा वा इतर कुणा नामवंताचा सारथी असल्याचा उल्लेख नाही. तसा तो नगण्यच आहे. खुद्द त्याचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कुंतिभोजाशी काही सेवा-संबंध असणे शक्य आहे. अधिरथ स्वत: वा त्याचा कोणी आप्त कर्णाचा खरा पिता होता काय? असा काही संबंध असेल तर कदाचित बालकाच्या जन्मानंतर लगेच, सोनेनाणे, दागदागिने (जन्मजात कवचकुंडले!) बरोबर देऊन त्याला अधिरथाकडे गुपचुप पाठवून दिले असणे नैसर्गिक वाटते. अधिरथ व राधा याना अपत्य नसल्यामुळे त्यांनी ही व्यवस्था मान्य केली व कर्णाला लहानाचा मोठा केला. अधिरथाचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कर्णजन्माशी संबंध असल्यामुळे त्यानी ही जबाबदारी पत्करली असेल हा माझा तर्क आहे. मात्र याला महाभारतात काहीहि आधार नाही.
सूत हे क्षत्रियांच्या बरॊबरीचे नव्हे पण फारसे खालच्या दर्जाचे मानले जात नव्हते. सारथ्यकर्म हे त्यांचे मुख्य काम. मात्र सारथ्यकौशल्याची महति क्षत्रिय जाणून होते. स्वत:च्या सारथ्यकौशल्याचा त्यांना अभिमानहि असे. खुद्द श्रीकृष्ण, शल्य, अर्जुन, सुभद्रा, विराटपुत्र उत्तर, नलराजा, ऋतुपर्ण राजा, रामायणकाळात कैकेयी, या क्षत्रियांची सारथ्यकौशल्याबद्दल ख्याति होती. धृतराष्ट्राला युद्धवर्णन ऐकवणारा संजय आणि विराटाचा मेहुणा कीचक हे सूत होते. (क्षत्रियकन्येने सूताला वरल्याचे मात्र उदाहरण नाही!). यावरून सूतांचे सामाजिक स्थान क्षत्रियांच्या खालोखाल होते असे दिसते. कर्ण हा माझ्या तर्काप्रमाणे अधिरथ वा त्याचा आप्त, कुंतिभोजाचा सारथी, याचा पुत्र असेल तर जन्मानंतर त्याला अधिरथाकडे पाठवून देण्यात आपण त्याच्यावर काही अन्याय करतो आहोत असें कुंतिभोजाला व त्याच्या पत्नीला वाटण्याचे काही कारण नव्हते. मातापित्यानी कर्णाची काय व्यवस्था केली वा त्याला कोठे पाठवले हे कदाचित कुंतीला माहीतहि नसेल! कुंतिभोजाने कुंतीचे स्वयंवर थोड्या काळाने योजिले तेव्हां तिने पांडूला वरले. कर्ण हस्तिनापुरातच वाढतो आहे हें तिला माहीत असतें तर पांडूला वरण्याचा धोका तिने कदाचित टाळला असता. मात्र कुंती हस्तिनापुराची राणी होणार म्हटल्यावर कुंतिभोजाने वेळीच अधिरथाला कळवून कर्णाला हस्तिनापुरापासून दूर केले असावें. त्यामुळे विवाहानंतरच्या हस्तिनापुरातील सुरवातीच्या वास्तव्यात कर्ण तिच्या नजरेला येऊन तिने त्याला ओळखण्याची वेळ आली नाही. विदुर हा अतिशय दक्ष असा मंत्री असल्यामुळे व त्याचे हेरखाते कार्यक्षम असल्यामुळे कुंतीचा पुत्र हस्तिनापुरात अधिरथाकडे वाढतो आहे हे माहीत होते. कर्णाला हस्तिनापुरातून दूर पाठवण्याचे काम कदाचित त्यानेच केले असेल!
कर्णजन्माची कथा आदिपर्वात प्रथम आली आहे. तिचे स्वरूप वर वर्णिल्याप्रमाणे आहे. महाभारतात पुढे प्रत्यक्ष युद्धापूर्वी सूर्य कर्णाला भेटला व इंद्र तुझ्याकडे येऊन तुझी कवचकुंडले मागेल ती तूं देऊ नको असे त्याने कर्णाला सांगितले असा एक प्रसंग आहे. याठिकाणी कर्णजन्माची कथा जास्त विस्ताराने सांगितली आहे व ती आदिपर्वांतील कथेपेक्षा काहीशी वेगळी आहे. येथे कुंतीला वर देणारा ब्राह्मण दुर्वास असे म्हटलेले नाही. अधिरथाचा उल्लेख धृतराष्ट्राचा मित्र असा केलेला आहे. अधिरथ व राधा अंगदेश या सूतांच्या राज्यात गेलेली असताना गंगाकिनारी राधेला कर्णाची पेटी मिळाली असे वर्णन आहे. (कुंतिभोजाचे राज्य कोठे होते, गंगाकिनारी वा तिच्या एखाद्या उपनदीच्या किनारी? अंगदेश हा त्या राज्याच्या शेजारी होता काय?) येथील कथेप्रमाणे वर मिळाले तेव्हा कुंती अजाण कुमारी होती. वयात आल्यावर उत्सुकतेपोटी तिने मंत्राचा वापर करून सूर्याला बोलावले. प्रथम घाबरून तिने सूर्याला नकार दिला पण नंतर तो आपल्या कुळाला शाप देईल या भीतीने त्याची मागणी मान्य केली असे म्हटले आहे. बालक पेटीत ठेवून नदीत सोडण्याचे काम तिनेच स्वत: दासीच्या मदतीने केले असे वर्णन आहे. त्यानंतर अर्ध्या रात्रीपर्यंत नदीकाठी शोक करून मग पित्याला कळेल या भीतीने ती राजवाड्यात परत आली. पुढे स्वत:चे दूत पाठवून आपला पुत्र हस्तिनापुरात कसाकाय वाढतो आहे याचीहि बातमी तिने काढली होती असे वर्णन आहे. हें सर्व वर्णन असंभव वाटते. त्यापेक्षा वर वर्णिलेला माझा तर्क जास्त सयुक्तिक वाटतो. मात्र या प्रसंगीहि सूर्याने कर्णाला तू माझा पुत्र आहेस असे म्हटलेले नाहीच! कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. कर्णाच्या जन्माबद्दल व पितृत्वाबद्दल याहून जास्त काही सांगण्यासारखे नाही. त्याच्या पुढील आयुष्याचा आढावा पुढील लेखात घेऊंया. वाचत रहा.