Get it on Google Play
Download on the App Store

अरुपावचर आयतने 1

अरूपावचर आयतने

आकाशानन्त्य आयतन, विज्ञानानन्त्य आयतन, आकिंचन्य आयतन आणि नैवसंज्ञानासंज्ञा आयतन, ही चार अरूपावचर आयतने होत.  त्यांची भावना चार ध्याने प्राप्‍त झाल्याशिवाय करता येणे शक्य नाही, हे वर सांगितलेच आहे.  अप्रमाण अभिभ्वायतनांवर किंवा कसिणांवर ज्याला ही ध्याने साध्य झाली असतील, त्याने प्रथमतः आकाशानन्त्य आयतन मिळवण्याचा प्रयत्‍न करावा.  त्याचे विधान सुत्तपिटकांत पुष्कळ ठिकाणी आले आहे.  ते असे -

सब्बको रूपसञ्ञानं समतिक्कभा.  पटिघसञ्ञानं अत्यंगमा नानत्तसञ्ञानं अमनसिकारा अनन्तो आकासो ति आकांसानश्चायतनं अपसंपज्ज विहरति । 

सर्वप्रकारे रूपसंज्ञांचा समतिक्रम करून प्रत्याघातसंज्ञांचा अस्त करून आणि नानात्त्वसंज्ञांचा विचार न करता अनन्त आकाश या भावनेने आकाशानन्त्य आयतन प्राप्‍त करून घेतो.

रूपसंज्ञा म्हणजे जड सृष्टीबद्दल विचार.  त्यांच्या पलीकडे गेल्यानेच हे ध्यान प्राप्‍त होते.  जड सृष्टीचे विचार जोपर्यंत चालले आहेत तोपर्यंत विषयांचा इंद्रियांवर प्रत्याघात म्हणजे काहीतरी परिणाम व्हावयाचा.  पण जेव्हा योगी जडसृष्टीच्या पलीकडे आपल्या चिंतनाची मर्यादा नेतो, तेव्हा असा प्रत्याघात त्याला बाधू शकत नाही.  त्या प्रत्याघाताचा अस्त होतो; आणि त्या प्रसंगी जड सृष्टीतील चित्रविचित्र देखावे किंवा भिन्न स्वर अशा विविध विषयांपासून तो निवृत्त होतो.  यालाच 'नानात्वसंज्ञांचा विचार न करणे' असे म्हणतात. अशा स्थितीत अनन्त आकाश हेच काय ते त्याच्या चित्ताचे आलंबन होऊन रहाते, आणि तो तदाकार होऊन जातो.

परिच्छिन्न आकासकसिण खेरीज करून बाकी कोणत्याहि कसिणावर चार ध्याने साध्य केल्यानंतर मग या आयतनाची भावना करावयाची असते.  कसिणावर चतुर्थ ध्यान साध्य होण्यापूर्वी त्या कसिणाची मर्यादा अनन्त करावी लागते.  प्रथमतः कटोर्‍याएवढ्या किंवा सुपाएवढ्या कसिणापासून सुरुवात करावयाची हे मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे.  नंतर तीच वर्तुळाकार आकृति खोलीएवढी, घराएवढी, गावाएवढी, देशाएवढी, पृथ्वीएवढी आणि होता होता विश्वाएवढी वाढवावयाची असते.  त्या आकृतीवर चतुर्थ ध्यान साध्य झाल्यावर मग योगी बुद्धिप्रभावाने ती बाजूला सारून तेवढ्या सर्व विश्वात एकच आकाश भरला आहे हे पहातो. पूर्वीचे जे रूपात्मक आलंबन ते सोडून देऊन तो ते हे अरूपात्मक आलंबन स्वीकारतो.  आणि हाच काय तो इतर चतुर्थ ध्यानात फरक असतो.  कसिणांवर किंवा मैत्री इत्यादिकांवर केलेल्या ध्यानाचा विषय दृश्य व जड असतो. आणि म्हणूनच त्या ध्यानाला रूपावचर ध्याने म्हणतात.  आकाशादिक आयतने दृश्य नाहीत व जडहि नाहीत.  तेव्हा त्यांच्यावर जे चतुर्थ ध्यान प्राप्‍त होते त्याला अरूप किंवा अरूपावचर ध्यान म्हणतात.

येथे असा प्रश्न उपस्थित होतो की, इतर कर्मस्थानावर जशी प्रथमादिक ध्याने प्राप्‍त होतात तशी ती या अरूपावचर कर्मस्थानांवर का प्राप्‍त होत नाहीत ?  वितर्कविचारादिक प्रथम ध्यानाची अंगे अस्तित्वात यावयाला त्याचा विषयहि आकुंचित व प्रमुदित करणारा असावयास पाहिजे.  परंतु आकाशासारख्या अनन्त आणि व्यापक विषयाला आकुंचित स्वरूप दिल्याशिवाय वितर्कविचारादिक उत्पन्न होणे शक्य नाही.  पण अशा आकुंचित आकाशाला आकाशानन्त्य आयतन म्हणता यावयाचे नाही; त्याला परिच्छिन्न आकासकसिण असे म्हणतात.  अर्थात आकाशादिक जी चार आयतने आहेत त्यावर पहिली तीन ध्याने साधता येत नाहीत.  कसिणांवर चार ध्याने साधल्यावरच मग ही आयतने क्रमाने प्राप्‍त करून घ्यावी लागतात.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1 समाधिमार्ग 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9 आनापानस्मृतिभावना 1 आनापानस्मृतिभावना 2 आनापानस्मृतिभावना 3 आनापानस्मृतिभावना 4 आनापानस्मृतिभावना 5 कायगतास्मृति आणि अशुभे 1 कायगतास्मृति आणि अशुभे 2 कायगतास्मृति आणि अशुभे 3 कायगतास्मृति आणि अशुभे 4 कायगतास्मृति आणि अशुभे 5 ब्रम्हविहार 1 ब्रम्हविहार 2 ब्रम्हविहार 3 ब्रम्हविहार 4 ब्रम्हविहार 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6 कसिणे 1 कसिणे 2 कसिणे 3 कसिणे 4 कसिणे 5 अरुपावचर आयतने 1 अरुपावचर आयतने 2 विपश्यनाभावना 1 विपश्यनाभावना 2 विपश्यनाभावना 3 विपश्यनाभावना 4 विपश्यनाभावना 5