Get it on Google Play
Download on the App Store

अध्यात्मावर बोलू काही.....

सत्यजित भारत
(नवीन पनवेल)
७२०८७८९१०४

विकार मुक्त मन.....

मित्रांनो मागील आरंभ मासिकाच्या अंकात आपण ध्यात्मा वर बोलू काही या सदरामध्ये खरं अध्यात्म म्हणजे काय हे जाणून घेतलं... पण ही खरी आध्यात्मिक स्थिती आपण कशी काय प्राप्त करू शकतो....? हे आपण आजच्या अंकात पाहू.

मित्रांनो आध्यात्मिकता म्हणजे विकारांतून मुक्तता पण माणूस म्हटलं म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादी इत्यादी हे विकार आलेच. या विकारांमधून मुक्त होणे व विकारमुक्त अवस्थेत स्थिर राहणें नक्कीच कठीण पण अशक्य मात्र नाही.

एक लक्षात घ्या हे विकार कधी उत्पन्न होतात हे जाणून घेतलं पाहिजे....ज्या वेळी आपली इंद्रिये विषयाच्या संपर्कात येतात त्यावेळी मनात विकार उत्पन्न होतात... उदाहरणार्थ पाहू ज्यावेळी एक युवक सुंदर ललनेस पाहतो त्यावेळी तिच्याविषयी त्याच्या मनात कामभावना प्रज्वलित होते. कामविषय त्याच्या मनात सतत घोळत राहिल्यास तो अस्वस्थ होतो. त्या काम भावनेस त्याने योग्य आळा न घातल्यास त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात....बलात्कार, वेश्यागमन इत्यादी. मग काय आपण विषय (सुंदर स्त्रीस) पाहूच नये का...? नाही...तसं शक्यच नाही. मग काय करावे ?

आपल्याला हे ज्ञात असलं पाहिजे की विषयांपेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहेत.... इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे....मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे... बुद्धीपेक्षा विवेकशील जीवात्मा श्रेष्ठ आहे.

वैदिक साहित्यात सांगितलं आहे की भौतिक देहरूपी रथामध्ये विवेकशील जीवात्मा हा सवार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहेत. त्याप्रमाणे जीव मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुख उपभोगतो.

म्हणून विवेकशील जीवाआत्म्याने बुद्धीद्वारे मनाला संयमित केलं पाहिजे. जेणेकरून हे मन इंद्रियांना नियंत्रित करू शकेल. एकदा का मन संयमित झालं की इंद्रिये काहीच करू शकणार नाहीत. बलिष्ठ विषयांच्या मागे धावणार नाहीत.

परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारकतेवरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते. मग अशा मनाला संयमित करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात...

"हे महाबाहू कौंतेया!  चंचल मनाला संयमित करणे निःसंशय कठीण आहे; पण  *योग्य अभ्यासाने अणि अनासक्ती द्वारा मनाला वश करणे शक्य आहे."*

विकारमुक्त अवस्थाच आपल्याला खरा आनंद प्रदान करते.

(वाचकांना नम्र विनंती आहे की त्यांनी अध्यात्मावर बोलू काही संदर्भात आपला अभिप्राय लेखकास नक्की कळवावा)