Get it on Google Play
Download on the App Store

जयंता 7

पहाटेची वेळ होती. जयंताने ताईचा हात एकदम घट्ट धरला.

“काय रे?”

“मी जातो आता. सुखी राहा.”

“जयंता?”

तो काही बोलला नाही. पहाट झाली. आई उठली. वडील उठले. भावंडे उठली. परंतु जयंता आता उठणार नव्हता.

थोडे दिवस गेले आणि जयंताच्या परीक्षेचा निकाल लागला होता. परंतु तो पाहण्याचे कोणाच्या मनातही आले नाही. सायंकाळी जयंताचा एक मित्र आला. हातात वृत्तपत्र होते.

“गंगूताई” त्याने हाक मारली.

“काय निळू?”

“जयंता पहिल्या वर्गात पहिला आला.”

“म्हणूनच देवाने नेला.”

मित्र निघून गेला. गंगू खिडकीतून शून्य मनाने कोठे तरी पाहत होती. परंतु काय असेल ते असो. तिचे आजारपण गेले. तिची पाठ दुखेनाशी झाली. जयंता का तिचे आजारपण घेऊन गेला? गंगू आता नोकरी करते. घरी सर्वांना मदत करते.

जयंता जाऊन आज वर्ष झाले होते, गंगूने एक सुरेखशी अंगठी आणली होती.

“आई, तुझ्या बोटात घालू दे.”

“मला कशाला अंगठी? तुम्ही मुले सुखी असा म्हणजे झाले.”

“आई, जयंताची ही शेवटची इच्छा होती.”

“त्याची इच्छा होती? त्याची इच्छा कशी मोडू?” मातेने बोटात अंगठी घातली. डोळ्यांतून पाणी आले. मातेने मुलाचे श्राद्ध केले.