Get it on Google Play
Download on the App Store

धृतराष्ट्राला युद्धदर्शन

कौरव-पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्राला, आपल्याला युद्धवार्ता कशा कळतील असे वाटत होते. संजयाला दिव्य दृष्टि देऊन कृष्णाने त्याला धृतराष्ट्राशेजारीच बसून सर्व युद्ध पाहता येईल असे केले व मग संजयाने ’आंखों देखा हाल’ धृतराष्ट्राला रोजच्या रोज सांगितला अशी समजूत असते. कृष्णाने कौरवदरबारात विश्वरूपदर्शन घडवले तेव्हां धृतराष्ट्राला व गांधारीला ते दिसावे म्हणून दिव्य दृष्टि दिली होती (खरेखोटे देव जाणे) त्यामुळे अशी समजूत होते.
प्रत्यक्षात दिव्यदृष्टि व्यासानी दिली होती आणि धृतराष्ट्राला नव्हे तर संजयाला दिली होती असे महाभारतात म्हटले आहे. मात्र १८ दिवसांच्या युद्धवर्णनांत काही वेळा संजय स्वत: युद्धभूमीवर होता असा स्पष्ट उल्लेख आहे. युद्धवर्णनहि १८ दिवसांचे अलगअलग नसून चार सरळ भागात आहे. पहिला भाग भीष्मपतनापर्यंतच्या दहा दिवसांचा, मग दुसरा भाग द्रोणवधापर्यंतच्या पांच दिवसांचा, तिसरा भाग कर्णवधापर्यंतच्या दोन दिवसांचा व अखेरचा भाग शेवटच्या दिवशी शल्यवध व दुर्योधन-भीम गदायुद्ध झाले तोपर्यंतचा असे चार भागात युद्धवर्णन संजयाने धृत्रराष्ट्राला ऐकवलेले आहे.
संजयाचे वर्णन तो स्वत: सर्व घटना पाहत असल्याप्रमाणे आहे. दिव्यदृष्टि वगैरे अद्भुत कल्पना सोडून दिल्या तर असे मानावे लागते कीं हल्ली युद्धात जसे वार्ताहराना वा टी. व्ही. ला वा रेड-क्रॉसला संरक्षण असते तसे संजयाला असावे व त्यामुळे त्याला युद्धभूमीवर सर्वत्र फिरतां येत होते व घटना पाहतां येत होत्या. त्यामुळे त्याचे वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. चार महत्वाच्या टप्प्यांवर युद्धभूमि सोडून धृतराष्ट्रापाशी परतून त्याने झालेल्या घटना वर्णिल्या आहेत. तेव्हा दिव्यदृष्टि ही एक गैरसमजूतच!