Get it on Google Play
Download on the App Store

आशियातील साम्राज्यवाद

युरोपीय राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यावाद लादला होता. त्यातून आशिया खंडात साम्राज्यवादास सुरूवात झाली.


भारतामधील साम्राज्यवाद


पोर्तुगीज

इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर पोहचला. तेथील झामोरिन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या.

प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्‍न केला, त्यामुळे त्यांना भारतात प्रबळ साम्राज्य निर्माण करता आले नाही. त्यांना केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशावरच समाधान मानावे लागले.


डच

पोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनीसुद्धा भारतात येवून व्यापाराला सुरूवात केली. पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले.


फ्रेंच

इ.स. १६२५ पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरू केला. पण फ्रेंचांना केवळ चंद्रनगर, पॉन्डिचेरी, कराईकल, यानम व माहे हे प्रदेशच हस्तगत करण्यात यश मिळाले.


इंग्रज

इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मोगलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मोगल बादशहा जहांगीरकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सरदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे मोगल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली.
इंग्रजांचा दक्षिण भारत व बंगालमध्ये सत्ता विस्तार


टिपू सुलतान

इ.स. १७५७ मधील प्लासीची लढाई व इ.स. १७६४ मधील बक्सारच्या युद्धातील इंग्रजांच्या विजयामुळे त्यांचा बंगालमधील सत्तेचा पाया मजबूत झाला.

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारतात निजाम, हैदरअली व मराठा या तीन बलाढ्य सत्ता होत्या. इंग्रजांनी निजाम व मराठ्यांची मदत घेवून हैदरअली व त्याचा मुलगा टिपू सुलतान यांचा पराभव केला. त्यानंतर इ.स. १७७५ पासून इ.स. १८१८ पर्यंत इंग्रज व मराठे यांच्यात तीन युद्धे झाली. पहिल्या युद्धात महादजी शिंदे यांनी इंग्रजांचा पराभव केला. दुसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. नंतर आष्टी येथे झालेल्या तिसऱ्या युद्धात, इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून मराठी सत्तेवर विजय मिळवला.

त्यानंतर निजामाच्या तैनाती फौजेच्या माध्यमातून इंग्रजांनी भारतात अनेक ठिकाणी साम्राज्यविस्तार केला.

इंग्रजांचा पंजाबमधील सत्ता विस्तार

मराठ्यांच्या पराभवानंतर संपूर्ण भारतात शिखांची सत्ता सोडल्यास कोणतीही स्थानिक सत्ता उरली नव्हती. पंजाबमध्ये महाराजा रणजीतसिंहांच्या प्रयत्‍नांतून शिखांचे संघटन झाले होते. महाराजा रणजीतसिंह सत्तेवर असेपर्यंत इंग्रजांना शिखांवर वर्चस्व निर्माण करता आले नाही. पंजाब, सिंध, काश्मीर व आजच्या पाकिस्तानच्या परिसरात शिखांचे बलाढ्य राज्य होते. इ.स. १८३९ मध्ये महाराजा रणजीतसिंहाच्या मृत्यूनंतर शीख सत्ताधारी आणि सरदारातील तंटे व दुही इंग्रजांच्या पथ्यावर पडली. इ.स. १८४५ ते इ.स. १८४९ या कालखंडात शीख सत्ता नेस्तनाबूत करून इंग्रजांनी शिखांच्या ताब्यातील विशाल प्रदेश आपल्या ताब्यात मिळविला.


इंग्रजांचा भारतावर एकछत्री अंमल

इंग्रजांनी झाशी, नागपूर, सातारा, संबळपूर, उदयपूर इत्यादी संस्थाने खालसा करून ती ब्रिटीश साम्राज्यास जोडली. तसेच अयोद्धेचे संस्थान अनागोंदी राज्यकारभाराच्या नावाखाली खालसा केले. तर काही संस्थानिकांचे तनखे देणे बंद केले व तेथे आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे इ.स. १७५७ ते इ.स. १८५७ या शंभर वर्षांच्या कालखंडात बहुतांश भारत आपल्या वर्चस्वाखाली आणून इंग्रजांनी भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला.


चीनमधील साम्राज्यवाद

चीनसारखा महाकाय देश युरोपीयांच्या वर्चस्वाखाली जाण्यास तेथील मांचू राजवट (इ.स. १६४४ ते इ.स. १९११) मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली. इ.स. १५१७ मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज व्यापारी समुद्रमार्गे चीनच्या कॅन्टन बंदरात उतरले. त्यानंतर पोर्तुगीजांनी मकाव बेट ताब्यात घेतले. पोर्तुगीजानंतर फ्रान्स, इंग्लंड, हॅालंड, बेल्जियम, रशिया यांनीही चिन्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. परंतु दोनशे वर्षे चीनने युरोपीयांना आपल्या अंतर्गत प्रदेशात ढवळाढवळ करू दिली नाही. चीनने जाहीर केलेल्या आठ कलमी नियमावलीनुसार युरोपीयांवर अनेक बंधने घालण्यात आली. चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या युरोपीयांना चिनी सम्राटाला कुर्निसात (नमस्कार) करावा लागत असे. तरी देखील इंग्लंडने चीनशी जुळवून घेण्याचा प्रयत्‍न केला.


अफूचे पहिले युद्ध

या सुमारास ब्रिटिश व्यापारी भारतातून अफू आणून चीनमध्ये विकत होते. चिनी सरकारचा अफूच्या व्यापारास विरोध होता. तरी युरोपीय व्यापारी अफूचा चोरटा व्यापार करीतच राहिले. चिनी लोक चांदीच्या मोबदल्यात अफू विकत घेऊ लागले. त्यामुळे चांदीचा ओघ इंग्लंडकडे जाऊ लागला. अफूच्या व्यापारातून चीन व इंग्लंड यांच्यामध्ये इ.स. १८४० मध्ये युद्ध सुरू झाले. त्याला अफूचे पहिले युद्ध म्हणतात. या युद्धात चीनचा पराभव होउन मांचू राज्यसत्तेला इंग्रजांशी तह करावा लागला. इ.स. १८४२ मध्ये चीन व इंग्रज यांच्यातील तहाला नानकिंगचा तह म्हणतात. त्या तहानुसार इंग्लंडला कॅन्टन बंदराशिवाय इतर चार बंदरे व्यापारासाठी खुली करण्यात आली. पुढे हॅांगकॅांग बेटही इंग्रजांना मिळाले. त्याचाच फायदा घेऊन पुढील दहा वर्षात अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम, हॅालंड, पोर्तुगाल, रशिया इत्यादी देशांनी चीनकडून व्यापारासाठी सवलती मिळवल्या.

अफूचे दुसरे युद्ध

इ.स. १८५६ मध्ये इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनी चीनबरोबर युद्ध केले. त्याला अफूचे दुसरे युद्ध म्हणतात. चीनच्या मांचू सम्राटाचा पराभव होउन अफूचे दुसरे युद्ध पेकिंगच्या तहाने समाप्त झाले. या तहानुसार परकीय व्यापाऱ्यांना आणखी सहा बंदरे चीनने खुली केली. अफूच्या व्यापाराला परवानगी दिली. तसेच चीनमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांना धर्मप्रसार करण्याची परवानगी देऊन त्यांच्या संरक्षणाचे आश्वासन दिले.

इ.स. १८६० मध्ये रशियाने चीनवर आक्रमण करून चीनकडून अमूरचा किनारा मिळवला. जपाननेही इ.स. १८९४-९५ मध्ये चीनवर आक्रमण करून चीनचा पराभव केला. तसेच जपानने चीनमधील काही प्रदेशही मिळविला.


मुक्त व्यापार विषयक धोरण

चीनचे प्रत्यक्ष राजकीय विभाजन टाळण्यासाठी आणि आर्थिक लाभ उठविण्यासाठी इ.स. १८९९ साली अमेरिकेने मुक्त व्यापाराविषयक धोरणांची घोषणा केली. चीनच्या कोणत्याही भागात व्यापार करण्यासाठी सर्व देशांना समान हक्क असावेत, असे ते धोरण होते. सर्व साम्राज्यवादी राष्ट्रांनी अमेरिकेच्या या धोरणाला मान्यता दिली. परंतु रशियाने याला मान्यता न दिल्याने चीनचे विभाजन झाले नाही. परंतु पुढील काळात साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनचे मोठ्या प्रमाणात शोषण केले.

 

जपानमधील साम्राज्यवाद

आशिया खंडाच्या अतिपूर्व टोकावरील जपान या देशाशी पोर्तुगीज, स्पॅनिश, डच हे युरोपियन लोक व्यापार करत होते. व्यापाराबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचेही प्रयत्‍न केल्याने जपानी लोकांनी त्यांना हाकलून लावले व युरोपशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले. त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत जपान हे एक मागासलेले सामंतशाही राष्ट्र होते.

इ.स. १८५० च्या दरम्यान अमेरिकेचे जपानकडे विशेष लक्ष गेले. अमेरिकेला आपला व्यापार करण्यासाठी जपान हे चांगले क्षेत्र आहे असे वाटत होते. त्यासाठी जपानशी संबंध प्रस्थापित करणे अमेरिकेला आवश्यक वाटत होते. त्यामुळे इ.स. १८५२ मध्ये अमेरिकन नाविक मोहिमेचा प्रमुख म्हणून कमोडोर मॅथ्यू पेरी याची नेमणूक करण्यात आली. इ.स. १८५३ मध्ये त्याने प्रथम जपानमधील येडो आखातात प्रवेश केला. त्याने अमेरिकन जहाजांना जपानी समुद्रात संरक्षण व व्यापारी सवलती मिळाव्यात म्हणून जपानी सरकारला विनंती केली.


कनागावा करार

मॅथ्यू पेरीच्या नौदलाचा आकार व सामर्थ्य लक्षात घेऊन जपानी सम्राटाचा पंतप्रधान तोकुगावा शोगुन याने अमेरिकेशी ३१ मार्च १८५४ रोजी कनागावा येथे व्यापारी करार केला. या करारानुसार जपानने अमेरिकेच्या १) लाकूड, कोळसा व पाणी घेण्यासाठी शिमोदा व हाकोदेत ही दोन बंदरे अमेरिकेला खुला करावीत. २) अमेरिकेचा दूत जपानमध्ये राहावा. ३)अपघातात सापडलेल्या अमेरिकन खलाशांना जपानकडून मदत मिळावी. ह्या मागण्या मान्य केल्या. या करारामुळे जपानचे अलिप्ततेचे धोरण संपुष्टात येऊन तोकुगावा शोगुनशाहीच्या र्‍हासाला सुरुवात झाली.


मेईजी क्रांती

अमेरिकेप्रमाणे इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि हॅालंड या देशांनीही जपानकडे व्यापारी सवलतींची मागणी केली. जपानने त्यांच्याशी करार करून त्यांना व्यापारी सवलती दिल्या. अनेक सवलतींच्या बळावर साम्राज्यवादी राष्ट्रे पुढे सरसावली. साम्राज्यवादी सत्तांनी आपल्या आधुनिक सामर्थ्यांच्या बळावर जपानकडून व्यापारी सवलती मिळवल्या. त्यामुळे जपानला आपला दुबळेपणा समजून आला. त्यानंतर जपानने साम्राज्यवादी सत्तांच्या बरोबर टिकण्यासाठी आपल्या धोरणात बदल केला. अशाप्रकारे शोगुनांच्या अनिर्बंध सत्तेला शह देणारी मेईजी क्रांती या काळात घडली.


जपानचे आधुनिकीकरण

ज्या विज्ञान कलांच्या साहाय्याने साम्राज्यवादी राष्ट्रांनी जपानला नमविले त्या राष्ट्रातील बदलांचा स्वीकार करून जपानने आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल केले. आपल्या देशाचे आधुनिकीकरण घडवून आणले. आधुनिकीकरणानंतर जपानने साम्राज्यवादी धोरणाचा स्वीकार केला. जपान सारख्या चिमुकल्या राष्ट्राने आशियात साम्राज्यविस्ताराची धोरणे स्वीकारून चीन व रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रांचा पराभव केला. त्याने चीनच्या ताब्यातील बराचसा प्रदेश बळकावला. तसेच कोरिया व फोर्मोसावर प्रभुत्व प्रस्थापित केले. साम्राज्यवादाचा बळी ठरलेले जपान नंतर स्वतःच आशिया खंडातील एक बलशाली साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून उदयास आला.