Get it on Google Play
Download on the App Store

गोष्ट सत्तरावी

गोष्ट सत्तरावी

कधी कधी अपूर्व योग जुळून येती व अशक्य गोष्टी प्रत्यक्षात उतरती !

'भद्रसेन' नावाच्या एका राजाची मुलगी 'रत्‍नवती' हिच्या प्राप्तीसाठी एक राक्षस धडपड करू लागला. तिच्या लक्षात ही गोष्ट आली व एके रात्री, तिच्या महालात आलेल्या तिच्या मैत्रिणीला ती म्हणाली, 'सखे, एक राक्षस अकाली माझ्याकडे येण्याचा प्रयत्‍न करीत असतो. कोणत्या उपायाने मी त्याचा प्राण घेऊ ?'

वास्तविक राजकन्येने एक राक्षस अकाली येतो असे म्हटले होते त्याचा अर्थ 'नको तेव्हा' असा होता, पण त्याच महालाबाहेरील अंधाराच्या आडोशाला उभ्या असलेल्या त्या राक्षसाचा गैरसमज झाला. त्याला वाटले, आपल्याप्रमाणे 'अकाली' नावाचा दुसराही एक राक्षस हिच्या प्राप्तीसाठी धडपडत आहे. तेव्हा त्या राक्षसाने मायेच्या सहाय्याने एका उमद्या घोड्याचे रूप घेतले व दुसरा राक्षस पहायला मिळावा म्हणून तो राजकन्येच्या महालापासून थोड्या अंतरावर उभा राहिला.

तेवढ्यात तिथे एक चोर आला आणि 'हा घोडा छान आहे,' असे स्वतःशी म्हणून त्याच्यावर स्वार झाला व त्याला दौडवू लागला. त्या प्रकाराने घोड्याच्या रूपात असलेला राक्षस घाबरला. 'याने आपल्याला ओळखले असावे, हा आता आपल्याला दूर नेणार व आपला जीव घेणार,' असा समज होऊन तो वेगाने पळू लागला. गंमत अशी की 'हा अनावर घोडा आपल्याला पाडून टाकील.' अशा भयाने, तो चोर वाटेत लोंबत असलेल्या एका वडाच्या पारंबीला पकडून लोंबकळत राहिला.

'चला, आपण त्या अकाली राक्षसाच्या कटकटीतून सुटलो,' असे मनात म्हणून तो राक्षस मूळ स्वरूप धारण करून पळून जाऊ लागला असता, त्या वटवृक्षावरचा एक विघ्नसंतोषी वानर त्या राक्षसाला म्हणाला, 'अरे राक्षसदादा, ज्याला तू घाबरत आहेस, तो कुणी महाराक्षस नसून, एक सामान्य माणूस आहे. त्याला खाऊन टाक.'

तेवढ्यात त्या चोराने, फांदीखाली लोंबत असलेल्या त्या कळलाव्या वानराच्या शेपटीला कडकडून चावा घेतला. त्यामुळे तो वानर मोठ्याने चीत्कारला. त्या वानराचा तो भयंकर आवाज ऐकून, त्याच्याकडे पाहून तो राक्षस म्हणाला, 'अरे मर्कटा, त्या अकाली राक्षसाने तुला खायला सुरुवात केली असल्याने तुझा चेहेरा अगोदरच भयग्रस्त झाला आहे. तशाही स्थितीत त्या राक्षसाने मलाही खावे म्हणून तुझा प्रयत्‍न चालला आहे. पण मी असा फसणार नाही.' असे म्हणून तो राक्षस पळून गेला.

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, 'चक्रधरा, तुझा चेहेराही आता त्या 'अकाली' राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या वानराच्या चेहेर्‍याप्रमाणे भयग्रस्त झाला आहे. तो मला बघवत नसल्याने मी तुझा निरोप घेतो. तुझ्या कर्माची फळे तू भोग.'

चक्रधर त्राग्याने म्हणाला, 'मित्रा, चांगली कर्मे केली की चांगली फळे मिळतात. आणि वाईट कर्मे केली की, वाईट फळे पदरात पडतात, हे बोलणे खोटे आहे. रावणाने एवढ्या बंदोबस्तात बांधलेल्या लंकानगरीचीसुद्धा, त्या मारुतीने राखरांगोळी केली, आणि वाईट कर्मे करूनसुद्धा आंधळा, कुबडा व ती तीन स्तनांची राजकन्या सुखी झाली.'

यावर हे तीन स्तनांच्या राजकन्येचे प्रकरण काय आहे?' असे सुवर्णसिद्धाने विचारले असता चक्रधर म्हणाला, 'ऐक-

पंचतंत्र

संकलित
Chapters
गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट चोवीसावी गोष्ट पंचवीसावी गोष्ट सव्विसावी गोष्ट सत्ताविसावी गोष्ट अठ्ठावीसावी गोष्ट एकोणतीसावी गोष्ट तीसावी गोष्ट एकतिसावी गोष्ट बत्तिसावी गोष्ट तेहेतिसावी गोष्ट चौतिसावी गोष्ट पस्तिसावी गोष्ट छत्तिसावी गोष्ट सदोतिसावी गोष्ट अडतिसावी गोष्ट एकोणचाळीसावी गोष्ट चाळीसावी गोष्ट एकेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी गोष्ट त्रेचाळीसावी गोष्ट चव्वेचाळिसावी गोष्ट पंचेचाळिसावी गोष्ट सेहेचाळिसावी गोष्ट सत्तेचाळिसावी गोष्ट अठ्ठेचाळिसावी गोष्ट एकोणपन्नासावी गोष्ट पन्नासावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट बावन्नावी गोष्ट त्रेपन्नावी गोष्ट चोपन्नावी गोष्ट पंचावन्नावी गोष्ट छप्पन्नावी गोष्ट सत्तावन्नावी गोष्ट अठ्ठावन्नावी गोष्ट एकोणसाठावी गोष्ट साठावी गोष्ट एकसष्ठावी गोष्ट बासष्ठावी गोष्ट त्रेसष्ठावी गोष्ट चौसष्ठावी गोष्ट पासष्ठावी गोष्ट सहासष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट एकोणसत्तरावी गोष्ट सत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट बहात्तरावी गोष्ट त्र्याहत्तरावी