Get it on Google Play
Download on the App Store

गीताई अध्याय पहिला

धृतराष्ट्र म्हणाला

त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥

संजय म्हणाला

पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे । मग गेला गुरूंपाशी त्यांस हे वाक्य बोलिला ॥ २॥

गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज । विशाळ रचिले त्याने पहा पंडव सैन्य हे ॥ ३ ॥

ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनासम । महारथी तो द्रुपद विराट-नृप सात्यकी ॥ ४ ॥

धृष्टकेतू तसा शूर काश्य तो चेकितान हि । पुरूजित कुंतीभोजीय आणि शैब्य नरोत्तम ॥ ५ ॥

उत्तमौजा हि तो वीर युधामन्यु हि विक्रमी । सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महा-रथी ॥ ६॥

आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक । सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ॥ ७ ॥

स्वतां आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो । अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्ण हि ॥ ८ ॥

अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया । सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ॥ ९ ॥

अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे । मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे ॥ १० ॥

राहूनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले । चहूंकडूनी भीष्मांस रक्षाल सगळेजण ॥ ११ ॥

हर्षवीत चि तो त्यास सिंह-नाद करूनिया । प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला ॥ १२ ॥

तत्क्षणी शंखभैर्यादि रणवाद्ये विचित्र चि । एकत्र झडली तेंव्हा झाला शब्द भयंकर ॥ १३ ॥

इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी । माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले ॥ १४ ॥

पांचजन्य हृषिकेशे देवदत्त धनंजये । पौंड्र तो फुंकिला भीमे महाशंख महाबळे ॥ १५ ॥

तेंव्हा अनंतविजय धर्मराजे युधिष्ठीरे । नकुले सहदेवे हि सुघोष मणि-पुष्पक ॥ १६ ॥

मग काश्य धनुर्धारी शिखंडी हि महा-रथी । विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी ॥ १७ ॥

राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र ते । सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे ॥ १८ ॥

त्या घोषे कौरवांची तो हृदये चि विदारली । भरूनि भूमि आकाश गाजला तो भयंकर ॥ १९ ॥

मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले । चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपिध्वज ॥ २० ॥

अर्जुन म्हणाला

हाती धनुष्य घेउनि बोले कृष्णास वाक्य हे । दोन्ही सैन्यामधे कृष्णा माझा रथ उभा करी ॥ २१ ॥

म्हणजे कोण पाहीन राखिती युद्धकामना । आज ह्या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज ॥ २२ ॥

झुंजते वीर ते सारे घेतो पाहूनि येथ मी । युद्धी त्या हतबुद्धींचे ज करू पाहती प्रिय ॥ २३ ॥

संजय म्हणाला

अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकुनि शीघ्र चि । दोन्ही सैन्यांमधे केला उभा उत्तम तो रथ ॥ २४ ॥

मग लक्षूनिया नीट भीष्म द्रोण नृपास तो । म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्व तू ॥ २५ ॥

तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित । आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे ॥ २६ ॥

गुरुबंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे । असे पाहूनि तो सारे सज्ज बांधव आपुले ।

अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला ॥ २७ ॥

अर्जुन म्हणाला

कृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी । गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरडॅ ॥ २८ ॥

शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती । गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा ॥ २९ ॥

न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे ॥ ३० ॥

कृष्णा मी पाहतो सारी विपरित चि लक्षणे । कल्याण न दिसे युद्धी स्व-जनांस वधूनिया ॥ ३१ ॥

नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे । राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगूनि हि ॥ ३२ ॥

ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती । सजले ते चि युद्धास धना-प्राणास सोडुनी ॥ ३३ ॥

आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे । सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरू ॥ ३४ ॥

न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज । विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाड तो किती ॥ ३५ ॥

ह्या कौरवांस मारूनि कायसे आमुचे प्रिय । अत्याचारी जरी झाले ह्यांस मारूनइ पाप चि ॥ ३६ ॥

म्हणूनि घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हे चि तो । आम्ही स्व-जन मारूनि सुखी व्हावे कसे बरे ॥ ३७ ॥

लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती । मित्र-द्रोही कसे पाप काय दोष कुल-क्षयी ॥ ३८ ॥

परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये । कुल-क्षयी महा-दोष कृष्णा उघड पाहता ॥ ३९ ॥

कुल-क्षये लया जाती कुलधर्म सनातन । धर्म-नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग ॥ ४०॥

अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया । स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर ॥ ४१ ॥

संकरे नरका जाय कुलघ्नांसह ते कुळ । पितरांचा अधःपात होतसे श्राद्ध लोपुनी ॥ ४२ ॥

ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण-संकर । जातींचे बुडती धर्म कुळाचे हि सनातन ॥ ४३ ॥

ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित । नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे ॥ ४४ ॥

अरेरे केवढे पाप आम्ही आरंभिले असे । लोभे राज्य-सुखासाठी मारावे स्व-जनांस जे ॥ ४५ ॥

त्याहुनी शस्त्र सोडूनि उभा राहीन ते बरे । मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव ॥ ४६ ॥

संजय म्हणाला

असे रणात बोलूनि शोकावेगात अर्जुन । धनुष्य-बाण टाकूनि रथी बैसूनि राहिला ॥ ४७ ॥