Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १०

अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्याने डोंबिवलीसह संपूर्ण भारत देश हादरला होता. सक्सेना सरांचा सापळा अयशस्वी ठरला होता, ज्यात त्यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले होते. दहशतवादी मुंबई सोडून बाहेरच्या शहरांना लक्ष करतील हा विचार कुणाच्याही मनात आला नव्हता. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रक्तपात होत होता.

शोएब मोटरमनच्या कक्षातून आपल्या साथीदारांना आदेश देत होता. आपला एकही साथीदार मारला जाऊ नये म्हणून त्याने सर्वांना प्लॅटफॉर्मवरच थांबायला सांगितले होते.

गुगल मॅप बघताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की, मुंबईकडे संपूर्ण भारतातून ज्या रेल्वेगाड्या येतात, त्या याच मार्गाने. विध्वंस जरा आणखी रोमांचकारी करायचा या विचाराने तो मेल एक्स्प्रेसला लक्ष करायचे ठरवतो.

कोलकाताहुन येणारी अतिजलद दुरंतो एक्सस्प्रेस कल्याणहून डोंबिवलीमार्गे मुंबईला जाणार होती. मेल एक्स्प्रेस अतिजलद असल्याने शोएब काही करू शकत नाही, असं रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत होतं. एक्स्प्रेस डोंबिवली स्थानकाच्या जवळ पोहोचताच क्षणाचाही विलंब न करता शोएब ग्रेनेडने रूळ उडवतो. अर्जंट ब्रेक लावून काही उपयोग होत नाही, मेल एक्सस्प्रेस जलद असल्याने रुळावरून घसरून प्लॅटफॉर्मवर येते. हा वेग इतका असतो की प्लॅटफॉर्म पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. प्रवाशांसाठी असलेला भलामोठा पूल कोसळतो. धूळ उडते, एक्सस्प्रेसचं इंजिन प्लॅटफॉर्मबाहेरील एका इमारतीत जाऊन इंजिनाचा भलामोठा स्फोट होतो, तो स्फोट इतका मोठा असतो की ती भलीमोठी इमारत क्षणार्धात कोसळते.

प्राजक्ता आणि वृषाली त्या इमारत मधून आधीच निघाल्या होत्या म्हणून वाचतात, मात्र डोळ्यासमोर भलामोठा संहार पाहून त्यांच्या पायाखालून जमीन सरकते.

शोएबने हल्ल्याला आता काय ती सुरुवात केली होती, विशेष म्हणजे त्याला प्रत्येक पावलावर यश मिळत होतं. त्याने बराच रक्तपात घडवला होता आणि आतापर्यंत त्याचा एकही साथीदार मारला गेला नव्हता. त्यातच डोंबिवलीसह जवळच्या भागातील सर्व पोलीस अधिकारी कल्याण स्थानकावर दहशतवाद्यांची वाट पाहत असल्याने त्यांना प्रतिकार करणारंही कोणी नव्हतं.

सुरक्षा यंत्रणेची धांदळ उडवून अचूक मारा करत शोएब डोंबिवली स्थानकावर बस्तान मांडून होता. कल्याण स्थानकावर असलेल्या पोलीसांना शोएबच्या हालचालीची माहिती मिळताच ते डोंबिवली स्थानकाच्या दिशेने धाव घेतात.

पोलीस अधिकारी येईपर्यंत शोएबचा डोक्यात पुढची योजना तयार होत होती. गुगल मॅपवर त्याला डोंबिवली स्थानकाची महत्वपूर्ण माहिती मिळाली होती. या भागात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग राहत असतो. एक सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवलीची एक वेगळीच ओळख असते. ज्या लोकांना मुंबईमध्ये घर घेणं परवडत नाही, असे लोक मुंबई जवळ वस्ती करून राहतात, डोंबिवली यात वरच्या स्थानावर आहेत, असं असताना आपण डोंबिवली स्थानकच नाहीसं केलं तर? शोएबसाठी हे सहज शक्य होतं. त्याच्याजवळ तेवढं मनुष्यबळ आणि आरडीएक्स असतं. तो आपल्या साथीदारांना संपूर्ण डोंबिवली स्थानकावर आरडीएक्स लावायला सांगतो.

दुसरीकडे संपूर्ण देशभर खळबळ उडालेली असते. पंतप्रधानांपासून ते लष्करप्रमुखांना प्रश्न विचारले जातात. संपूर्ण जगभर #TerrorAttackAtDombivliStation या हॅशटॅगवर ट्विट केलं जातं. डोंबिवली स्थानकावर असलेल्या शोएबचं सीसीटीव्ही फुटेज सरळ पोलीसांच्या मुख्य कार्यालयात दाखवलं जातं. आपली रेकॉर्डिंग होत आहे याची शोएबला पूर्ण खात्री असते, एका मोठ्या फलकावर तो 'We'll destroy this Station.' असं लिहितो आणि आपले क्रूर मनसुबे जगाला दाखवण्यासाठी तो फलक सीसीटीव्हीसमोर धरतो.

शोएबने संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिले होते. डोंबिवली स्थानक हा राष्ट्रीय लोहमार्गाचा एक भाग असल्याने ते स्थानक उडवल्यास रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. सर्व पोलीसांसाठी आता एकच लक्ष्य असतं आणि ते म्हणजे डोंबिवली स्टेशन वाचवणं. सैन्यदलाला डोंबिवलीमध्ये पोहोचण्यासाठी अजून दोन तास तरी लागणार होते, पोलीसांसाठी स्टेशन १५ मिनीटांच्या अंतरावर होते. परिस्थितीतून कसा मार्ग काढावा हे वरिष्ठांना समजत नव्हतं. डी.सी.पी. शिवाजी देशमुख हे घटनास्थळी उपस्थित जबाबदार व्यक्ती असल्याने आदेश देण्याचे सर्व अधिकार तातडीने त्यांना दिले जातात. देशमुख देखील याच संधीची वाट पाहत होते.

"परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, आर्मीला यायला अजून दोन तास तरी लागतील. शोएबने डोंबिवली स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार डी.सी.पी. शिवाजी देशमुख यांना देत आहोत." वायरलेसवर हा मेसेज मिळताच सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे डोळे देशमुखांकडे फिरतात. आपले सर्व सहकारी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत हे देशमुख नजरेतूनच ओळखतात.

"तर मित्रांनो, तुम्ही सगळे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी तयार आहात का?" डी.सी.पी. देशमुख विचारतात.

सगळे एकसुरात "हो." म्हणतात.

"नुसतं हो बोलून उपयोग नाही, एकही दहशतवादी जिवंत राहता कामा नये." डी.सी.पी. देशमुख म्हणतात.

सगळे पुन्हा एकसुरात "हो. म्हणतात.

"या ऑपरेशनमध्ये मी तुमच्या प्राणाची जबाबदारी घेणार नाही. कदाचित आपण सगळे मारले जाऊ, अजूनही वेळ आहे ज्यांना वाटतं आपण आपल्या बायकापोरांसाठी जगावं त्यांनी आत्ताच सांगावं. तिथे गेल्यावर मागे फिरता येणार नाही." डी.सी.पी. देशमुख म्हणतात.

"सर आपण बोलत राहिलो तर आपल्याला उशीर होईल, तुम्ही फक्त आदेश द्या." एक पोलीस अधिकारी म्हणतो.

आपले सहकारी उत्स्फूर्तपणे आपल्यासोबत आहेत याचा देशमुखांना अभिमान वाटतो. ते शोएबपर्यंत पोहोचण्यासाठी एक योजना बनवतात आणि छुप्या मार्गाने डोंबिवली स्थानकापर्यंत पोहोचतात. त्यांना प्लॅटफॉर्मवर सगळीकडे एके-४७ बाळगलेले दहशतवादी दिसतात.

दुसरीकडे शोएब डोंबिवली स्थानकाच्या नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचतो. तिथे लपलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्लॅटफॉर्मवर घोषणा करण्याच्या आणि मुख्य कार्यालयाशी संपर्क साधणाऱ्या कक्षेत तो प्रवेश करतो. नियंत्रण मिळताच तो माईकवर बोलू लागतो.

"काफिरो, कान खोलकर सून लो. हम यहा मरने के लिये नहीं, मारने के लिये आये है। तुम्हारी चू** पुलिस और हि** जवान हमारा बाल भीं बाका ना कर पायें। आखिर तुम सब काफिर ही तो हो, तुम्हें सांस लेने का कोई हक नही। मा***द अब हम ये स्टेशन उडाने वाले है, रोक सको तो रोक लो।"

नियंत्रण कक्षातून सर्व रेल्वे स्थानकांवर आणि मुख्य रेल्वे कार्यालयात शोएबची घोषणा पोहोचते. त्याची ही घोषणा प्लॅटफॉर्मवर लपलेले मल्हार सर, अशोक, डी.सी.पी. देशमुख आणि प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावर असलेले अभिजीत, प्राजक्ता, वृषाली यांच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू जाते.

एक दहशतवादी आपल्या देशात येतो, लोकांना जीवे मारतो वरून आपल्याच सैनिकांना व पोलीसांना शिव्या घालतो आणि आपण काहीच करू शकत नाही? राग आणि द्वेष प्रत्येकाच्या मनात होता, पण काय करायचं हे कुणालाही कळत नव्हतं.