Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ४

१४ ऑगस्ट २०१७ - "हम सब कुछ ही पल में हिंदोस्ता पहुचेंगे। हमारा प्लॅन कल अलग अलग जगहों पर हमला करने का था, लेकीन हम कल हिंदोस्ता के अलग अलग हिस्सो में नहीं जा सकते। इसलीये खालिद के कहने के मुताबिक मैने प्लॅन बदल दिया है। हम कल मुंबई के अलग अलग हिस्सो पर हमला करेंगे। हथियारोंका इंतजाम कल हो जायेगा। क्या तुम सब खुदा का काम करने के लिये तैयार हो?" विमानामध्ये बसल्यावर शोएब त्याच्या साथीदारांसोबत बोलतो. त्याला माहित असतं, एकदा का आपण भारतात पोहोचलो कि आपल्याला आपल्या साथीदारांसोबत बोलता येणार नाही.

सर्व दहशतवादी मोठ्याने "हो" बोलून त्याला प्रतिसाद देतात.

शोएब आणि त्याच्या साथीदारांचं विमान पहाटे मुंबई येथे पोहोचतं. ज्याप्रमाणे तो इराकी शिक्षक बनून भारतात प्रवेश करतो त्याप्रमाणे सक्सेना सर मुंबई विद्यापीठाचे सचिव बनून त्याच्यासमोर येतात.

"Welcome to India." सक्सेना म्हणतात.

"Thanks." शोएब म्हणतो.

सक्सेना त्याला आणि त्याच्या साथीदारांना मुंबई विद्यापीठात घेऊन जातात. सक्सेनाप्रमाणेच अनेक रॉ अधिकारी आणि मुंबई पोलीस अधिकारी शोएबवर बारीक नजर ठेवून होते. शोएब शिक्षकाच्या वेशात जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावर दहशतवाद्यांची क्रूरता स्पष्टपणे दिसत होती.

सक्सेना त्याला यासाठी अटक करत नव्हते कारण, तो दहशतवादी आहे याचा कोणताही स्पष्ट पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी शोएबला अटक केली असती तर भारताचे इराक आणि श्रीलंकेशी संबंध बिघडले असते आणि आपल्या स्वार्थासाठी दहशतवादविरोधी कायदा समोर ठेवून खोटे दहशतवादी सादर करत आहोत असे जगाला दिसले असते, ज्यामुळे भारताची प्रतिमा खराब झाली असती. त्याहीपेक्षा सक्सेना यांना हे बघायचं होतं की शोएबला शस्त्र कोण पुरवतं.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या शोएबला अटक करणं ही एक गुप्त मोहीम होती, ज्याची माहिती केवळ रॉ अधिकारी, भारतीय परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान, लष्कर प्रमुख, केंद्रीय व महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती.

या सर्वांची शोएब आणि त्याच्या साथीदारांवर बारीक नजर होती. अगदी त्यांच्यातील एखादा लघुशंकेसाठी जरी गेला असेल तरी त्याच्या पाठी साध्या वेशातील एक पोलीस तरी असायचाच. त्या १०० अतिरेक्यांना पकडण्यासाठी ३०० पेक्षा जास्त पोलीस आणि सैनिकांची तुकडी सज्ज होती.

शोएबजवळ शस्त्र नसल्याने त्याच्यापासून धोका नव्हता, मात्र त्याला जिवंत पकडणे ही सर्वात मोठी गोष्ट होती. सक्सेनाला शेवटपर्यंत शोएबची हालचाल पहायची होती. एकदा का त्याच्याकडे शस्त्र आले की त्यांना शोएबला अटक करायची होती.

मुंबई विद्यापीठातील औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या सर्वांना कॅम्पसमध्ये विश्रांतीसाठी पाठवलं जातं. १४ ऑगस्टची ती रात्र अनेकांसाठी शेवटची रात्र असते.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे १५ ऑगस्टला कॅम्पसमधून निघण्यापूर्वी शोएब त्याच्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा चर्चा करतो. त्याने रात्रभर जागून एक योजना बनवली होती, ती तो आपल्या साथीदारांना सांगतो. थोड्या वेळाने तिथे सक्सेना सर येतात.

"Hey, Good morning. You all are invited to be a part of our Independence Day Celebration." सक्सेना सर शोएबला डिवचण्याचा प्रयत्न करतात.

"Ohh. That will be our pleasure, what we can do?" शोएब गोंधळून विचारतो.

"Nothing, just come with us to salute our Flag, then respect our National Anthem and listen our Trustee’s Speech." सक्सेना सर म्हणतात.

जो ध्वज शोएबला नकोसा होता, त्या ध्वजाला सेल्युट करायचा?

हे त्याच्यासाठी आव्हानात्मक होतं. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी राष्ट्रध्वजाला वंदन करावं हा सक्सेना सर यांच्याकडून त्याला आत्मसमर्पण करण्याची एकुलती एक संधी होती. ज्या देशावर हल्ला करायचा आहे, त्या देशाच्या राष्ट्रध्वजाला वंदन करताना आपण खरंच काहीतरी चुकीचं करणार आहोत, ही भावना त्याच्या मनात यावी, अशी त्यांची अपेक्षा होती.

सरळ मार्गाने सुधारेल तो दहशतवादी कसला? शोएबवर त्या गोष्टीचा जराही प्रभाव पडला नाही. फक्त आपल्या योजनेत अडथळा येऊ नये, या एका कारणासाठी तो फक्त दाखवण्यापुरता ध्वजाला वंदन करतो. वंदन करतेवेळी त्याच्या डोळ्यासमोर तिरंग्यात हिरवा रंग खाली असलेला टोचत असतो. त्याला त्याच्या लहानपणाचे दिवस आठवतात. वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात. भारत देश आणि भारतीयांविषयी असलेला द्वेष वाढू लागतो.

"So, what is your today’s plan?" सक्सेना विचारतात. तेवढ्यात शोएबचा मोबाईल वाजतो. मुंबईमध्ये आल्यापासून शांत असलेला शोएब अचानक खुश होतो. त्याला मोबाईलवर एक मेल येतो आणि तो सक्सेना यांना कलिना विद्यापीठ येथे जाण्याचा आग्रह करतो.

त्याच्या मनात नक्की काय चाललं आहे हे बघण्यासाठी सक्सेना होकार दर्शवतात आणि मुंबई विद्यापीठातून २ भल्यामोठ्या बसेस सांताक्रूझच्या दिशेने निघतात. त्यांच्या पाठोपाठ मुंबई पोलीसांच्या १० जिप्स आणि ३० मोटारसायकल्स पाठलाग करण्यासाठी निघतात.

स्वातंत्र्य दिवस असल्याने आधीच सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता. अनेक स्तरांवर भरीव कामगिरी केलेली असल्याने बऱ्याच ठिकाणी ‘अच्छे दिन... भारत माता कि जय... वंदे मातरम्.... इंडिया... इंडिया..." अशा घोषणा होत होत्या. बऱ्याच ठिकाणी लाउडस्पीकरवर देशभक्तीपर गीत वाजत होते. सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेकांनी घरी राहणं पसंत केलं होतं, पण तरीही मोठ्या प्रमाणात लोक काही ना काही उपक्रम घेऊन हा आनंदोत्सव साजरा करत होते.

दोन तासांमध्ये बसेस कलिना विद्यापीठाजवळ पोहोचतात. शोएब बसमध्ये शांतपणे बसलेला असतो. सक्सेना त्याच्याकडे लक्ष ठेवून होते. विद्यापीठात पोहोचेपर्यंत त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत होते, पण शोएबला विचारायचं कसं. प्रवासात बराच वेळ बोलून झाल्यामुळे आता बोलायला काही विषय नव्हता. ते पुन्हा शोएबकडे बघतात.

शोएब आपल्या हातातील घड्याळीकडे बघून काउंटडाऊन करत होता. "२३... २२... २१... २०..."

सक्सेना सर सावध होतात. इतरांना सतर्क राहण्याची सूचना करायची कि शोएबचं  काउंटडाऊन संपेपर्यंत वाट बघायची, यात त्यांचा गोंधळ होतो.

"१०... ९... ८... ७... ६... ५... ४... ३... २... १... ०... बुम्म्म..." शोएब डोळे बंद करत म्हणतो.

विद्यापीठापासून काही अंतरावरील एका हॉटेल मध्ये मोठा गॅस सिलिंडर स्फोट होतो आणि सर्व गोष्टींना गती येते. हा स्फोट अपघाताने होत नाही, तर तो शोएबने तयार केलेल्या नव्या योजनेचा एक भाग असतो. पैशासाठी स्वतःच्या आईला विकणारे भारतात त्याला सहजच मिळतात, हा स्फोट एक भारतीय घडवून आणतो आणि शोएबसाठी हत्यारं देखील भारतीयच घेऊन येतात.

क्षणभरात होत्याचं नव्हतं होतं. भारतात राहत असलेल्यांना आणि शोएबसाठी बंदुका तसेच  आरडीएक्स घेऊन आलेल्यांना त्याच्यासोबत आलेल्या शिक्षकांवर संशय येतो. पेश्याने गुन्हेगार असल्याने साध्या वेशातील पोलीस त्यांना लगेच ओळखू येतात. क्षणाचाही विलंब न करता आपल्याजवळील बंदुका बाहेर काढून ते शिक्षकांच्या वेशातील पोलीसांवर गोळ्या झाडायला सुरुवात करतात.

तिथे उपस्थित पोलीस पूर्णतः गोंधळून जातात. अचानक झालेल्या हल्ल्यात जवळपास सर्व पोलीस अधिकारी मारले जातात. त्यातील काही प्रतिहल्ला करतात, पण तोवर उशीर झालेला असतो. एक आरडीएक्स त्यांच्या जिप्सीच्या खाली येऊन फुटतो.

शोएबला आता पूर्ण खात्री झालेली असते, आपल्यासोबत शिक्षक नाही तर, पोलीस अधिकारी आहेत. तो आणि त्याचे साथीदार लगेच सक्सेनाला ताब्यात घेतात. हल्ल्यातून बचावलेले उर्वरित पोलीस शोएबच्या बस भोवताल घेराव घालतात.

"तुम्हारा एक आदमी अभी भी हमारे साथ है।" शोएब बसमधूनच ओरडतो.

बाहेर उभे असलेल्या पोलीसांना सक्सेना आत असल्याची पूर्ण कल्पना होती, म्हणून कोणीही अतिरेक्यांवर हल्ला करत नाही. दुसरीकडे आत असलेल्या शोएबला एक गोष्ट चटकन समजते, ती म्हणजे आपल्या बसमध्ये कोणी सामान्य पोलीस अधिकारी नसून त्यांचा एखादा प्रमुख अधिकारी आहे. एका सामान्य पोलीसाची बोलीभाषा आणि एका विशेष अधिकाऱ्याची बोलीभाषा  न समजण्याइतका तो मूर्ख नव्हता. एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी कारवाई करणाऱ्या दहशतवाद्याला एवढं तरी माहित असतंच.

"बाहर बैठे तुम्हारे चेले देखकर लगता है के, कोई बडी मछली हमारे जालमें फस गई है।" सक्सेनाकडे वळून, "आपकी तारीफ?"

"रणवीर सक्सेना, रॉ..." सक्सेना पुढे काही बोलणार तेवढ्यात शोएब त्यांना अडवतो. "रॉ? बस्स... इसमें ही सब कुछ आ गया। मुझे मेरे हमले कि शुरुवात एक रॉ अफसर को मारकर करने में बडा सुकून मिलेगा।" शोएब म्हणतो.

"गलती कर रहा है तू... सरेंडर कर ले… तुझे और तेरे मुल्क को कुछ नही होगा... लेकीन अगर मेरे देश का एक भी आम आदमी मारा गया... तो तू ऐसी मौत मरेगा, जिसकी दास्तान सुनाते वक्त हर एक आतंकवादी शर्म के मारे मर जायेगा।" सक्सेना म्हणतो.

"अच्छा! तो ये बात है? चलो, में भी तो देख लु, तुम लोग मेरा क्या उ*** लेते हो। मेरे मुल्क से में यहा तेरे मुल्क आया और तेरे सामने तेरी मौत बनके खडा हु,  और तेरी सिस्टम कुछ भी नही कर सकती। " शोएब आपला राग व्यक्त करत मोठ्याने ओरडत म्हणतो. त्याचं बोलणं ऐकून झाल्यावर सक्सेना सर मिश्किलपणे हसतात आणि एक वाक्य म्हणतात.

"तू यहा आया नही, लाया गया है। मैने लाया है तुझे। तू मेरी मौत बनके आया है? आ, मार मुझे और आगे निकल। तेरी मौत तेरा इंतेजार कर रही है।" म्हणत सक्सेना सर तिथेच बसून राहतात. शोएबला आता काय करावे आणि काय करू नये, हे सुचत नव्हते. बसबाहेर त्याला पोलीसांचा घेराव दिसतो.

"आज १५ अगस्त है ना! तेरे मुल्क के आजादी का दिन? आ जा, आज फिर आपने मुल्क को बचा ले।" मनाशी काहीतरी ठरवून तो सक्सेनाकडे बघून विचारतो.

"तू शुरू तो कर।" सक्सेना सर म्हणतात.

"हमें हमारे हथियार लेने दो, फिर हम आपके आदमी को छोड देंगे।" सक्सेनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शोएब बाहेर उभे असलेल्या पोलीसांना ओरडून सांगतो.

पोलीसांना अतिरेक्यांपेक्षा सक्सेना महत्वाचे होते, म्हणून ते हत्यारं अतिरेक्यांजवळ पोहोचवतात. पण ज्याच्यावर विश्वास ठेवावा तो अतिरेकी कसला? बंदूक हातात आल्यावर शोएब आधी सक्सेनाला मारतो आणि सुरु होतो मृत्यूचा तांडव…

---x---x---

जीवितहानी होऊ नये म्हणून पोलीसांनी आधीच सांताक्रूझमधील रहिवाश्यांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला होता. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीसांचा सर्व ठिकाणी पहारा होता. मात्र दहशतवाद्यांना या गोष्टींचा फरक कुठे पडतो.

बस सांताक्रूझवरून निघून दादरपर्यंत पोहोचते, वाटेत मिळेल त्या ठिकाणी ते गोळीबार करतात. दादर रेल्वेस्थानकावर उतरून पुन्हा गोळीबार सुरु होतो. आनंदाच्या धुंदीत असलेले बरेच जण रेल्वेस्थानकावर उभे होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त तिथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. अचानक झालेल्या हल्ल्यात तिथे उपस्थित सगळे घाबरून सैरावैरा पळू लागतात. चेंगराचेंगरी होते. रक्तदान शिबीराचा मंडप कोलमडून पडतो. रक्तदान करत असलेले काहीजण हाताला टोचलेल्या सुया तशाच ठेवून पळत सुटतात. दहशतवाद्यांना अंधाधुंद गोळीबार करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नव्हती. रेल्वेस्थानकावर होत असलेल्या हल्ल्यात  अनेक प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी मारले जातात.

दुसरीकडे व्हाट्सअप आणि बातम्यांच्या माध्यमातून देशभर दहशतवादी हल्ल्याची बातमी पसरते. लोक घराबाहेर पडत नाही, जे घराबाहेर असतात ते सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात.

दादर रेल्वेस्थानकावर रक्ताचा सडा पडलेला असतो, तिथे आता दहशतवाद्यांशिवाय कोणीही नसतं. शोएब प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाणार नव्हता, आणि एका प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन येऊन थांबते. तो लगेचच सर्व दहशतवाद्यांना ट्रेनमध्ये चढायला सांगतो. बंदुकीचा धाक दाखवून शोएब आपल्या २ साथीदारांसोबत मोटरमनजवळ जातो.

"ये गाडी कहा जानेवली है।" शोएब मोटरमनला म्हणतो.

"कल्याण." मोटरमन म्हणतो.

"कल्याण? चलो। लेकीन याद रहे, कल्याण तक गाडी किसी भी प्लॅटफॉर्म पर रुकनी नहीं चाहियें।" शोएब मोटरमनच्या डोक्याजवळ बंदूक नेत म्हणतो.

"मुझे मेरे सिनियरसे बात करनी होगी। रास्ते में कोई और ट्रेन रहेंगी तो मैं कुछ नहीं कर सकता।" मोटरमन म्हणतो.

शोएब त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलू देतो. ते शोएबला कल्याणपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार होतात. इथे ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघते आणि तिथे कल्याण स्थानक दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होतं. मुंबईवरून सैनिक आणि अतिरिक्त दल कल्याण स्थानकावर धाव घेतं. डोंबिवलीपासून ते बदलापूरपर्यंतचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कल्याण स्थानकावर लगेच उपस्थित राहतात. संपूर्ण रेल्वे स्थानक पोलीस आणि सैनिकांनी भरुन सज्ज होतं.

शोएब इंटरनेटवर कल्याणपर्यंतच्या सर्व स्थानकांची माहिती मिळवतो.

"ठाणे स्टेशनपर गाडी रोक दो।" शोएब म्हणतो.

"ठाणे तो पिछे रह गया।" मोटरमन म्हणतो, खरं तर ठाणे स्थानक अजून आलेलं देखील नसतं. शोएब बाहेर बघतो तर, मुलुंड स्थानक येत असतं.

"तुम झूठ बोल रहे हो, अगला स्टेशन ठाणे है।" शोएब म्हणतो.

मोटरमनला कळून चुकतं, आता आपली खैर नाही. शोएब काही बोलणार एवढ्यात तोच चालत्या गाडीमधून बाहेर उडी मारतो.

उडी मारल्याने मोटरमन जखमी होतो, पण त्याचे प्राण वाचतात. मात्र चालू ट्रेनमध्ये शोएबची पंचाईत होते. कारण समोरच्या बाजूला मोटरमन नसतो. मुंबई लोकल रेल्वेच्या पुढच्या आणि मागच्या डब्यांच्या सुरुवातीला मोटरमन असतात हे त्याला माहित होतं. तो लगेच शेवटच्या डब्यात असलेल्या आपल्या साथीदाराला फोन करतो आणि ठाणे स्टेशनवर ट्रेन थांबवायला सांगतो, पण बोलत असतानाच ठाणे स्टेशन निघून जातं.

"ठाणे स्टेशन तो निकल गया। अब कल्याण के पहले कौनसा स्टेशन आयेगा?" शोएब विचारतो.

"ड… ड… डो… डोंबिवली…" दुसरा मोटरमन घाबरत म्हणतो.

"ठीक है। हमें वहा उतारो।" शोएब म्हणतो.

मागच्या डब्यातील मोटरमन शोएबला रेल्वे कशी थांबवायची हे सांगतो, त्याप्रमाणे शोएब बटन दाबून डोंबिवली स्थानकावर गाडी थांबवतो. ट्रेन डोंबिवलीला थांबेल याची कुणालाही पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्यामुळे डोंबिवलीमध्ये नेहमीप्रमाणे रेलचेल होती. पूर्व आणि पश्चिम डोंबिवली जोडणारा एक महत्त्वपूर्ण पूल रेल्वेस्थानकावरून जात असल्याने लोकांची नेहमीची गर्दी होतीच, पण कल्याणला जाणारी दहशतवाद्यांनी भरलेली ट्रेन बघण्यासाठी, मोबाईल, कॅमेरे घेऊन बरेच जण गर्दी करून होते. सर्वांच्या नकळत प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबते आणि आणि पुन्हा एकदा मृत्यूचा तांडव सुरु होतो.