Get it on Google Play
Download on the App Store

भीमथडीची तट्टे नर्मदापार

इतिहासकारांच्या दृष्टिने बाजीरावाचं मूल्यमापन प्रचंड मोठं आहे. मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच धुरंधर. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच रणसेनानी. बाजीराव हा जगाच्या इतिहासातला संभाजी महाराज यांच्या नंतरचा एकमेव अजेय योद्धा मानला जातो. अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल, असं त्याचं वर्णन केलं जातं. 

       

आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावाने ३५ महत्त्वाच्या लढाया केल्या आणि सर्व लढायांमध्ये तो जिंकला. त्याला हरवणं त्याच्या काळातल्या मातब्बर शत्रूंनाही जमलं नाही. पराक्रमासाठी आणि विजयासाठी बाजीहा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला.

       

बाजीराव जर उत्तरेत घुसला नसता आणि त्याने गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व मार्ग आपल्या कब्जात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा औरंगजेबासारखा उत्तरेतला शासक प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरला असता आणि संभाजी राजाच्या हत्येची किंवा राजारामाच्या पळापळीची दुसरी आवृत्ती निघाली असती. बाजीरावाने आपल्या पराक्रमाने ही आपत्ती कायमची दूर केली.


बाजीरावाने भीमथडीची तट्टे नर्मदापार नेल्यापासून उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत यायचे कायमचे बंद झाले. बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार, खेर हे मराठा सरदार वसवले आणि त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं उदयास आली.