Get it on Google Play
Download on the App Store

श्रावण महिन्याच्या गावाकडील काही आठवणी


१) श्रावण पाळणारे केस कापत नसत. त्याचा परिणाम आम्हा बिगर-श्रावण्यांवर होत असे. न्हावी गावात यायचा नाही, त्यामुळे आमचे केसही कानावर येईपर्यंत वाढायचे.

२) शाळेला श्रावणानिमित्त दर सोमवारी 'श्रावण सोमवार' या नावाखाली हाफ डे सुट्टी मिळत असे. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर घरी जायला मिळायचं. म्हणून श्रावण वर्षभर असावा, असं वाटायचं.

३) बाकी श्रावणाचं महत्त्व घंटा काही माहित नव्हतं. गावतली मंडळी शेताच्या कामात गुंतलेली असतात. कुणी गाई-बैलांना चारा-पाण्यासाठी शिवारात घेऊन गेलेला असायचा, तर कुणी शेताच्या बांधावरचं गवत काढायला. बेनणी करायला. हे या महिन्याची कामं असायची आणि आजही आहेत.

४) बाजूच्या गावातून एक ज्येष्ठ वारकरी आपली जुनीपुराणी चोपडी घेऊन यायचा. बळीराम असं त्याचं नाव. गावकीच्या घरात हा बळीराम लोकांना रामायण-महाभारात-श्रावण बाळ इत्यादींच्या कथा ऐकवत असे. हे सारं दहिहंडीपर्यंत चालत असे. आम्हीही तिथे जायचो. चहा पिण्यासाठी.

५) आणखी एक श्रावणाचा उल्लेख म्हणजे दहावीपर्यंत कधीतरी बालकवींची श्रावणमासी.. वगैरे कविता परीक्षेपुरती वाचली होती. तीही परीक्षेनंतर विसरलो.


बस्स. एवढ्या आठवणी आहेत श्रावणाच्या. बाकी विशेष काही नाही.